http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, November 6, 2018

48 BahujanNama, Lokmanthan, 4 Nov 2018, Dish Badal & Dishabhul


अठ्ठेचाळीसावी खेप ......!        ( दै. लोकमंथन, रविवार4 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-48
     दिशाबदल व दिशाभूल
बहुजनांनो.... !   
दिशाबदल व दिशाभूल ह्या अनुक्रमे प्रतिक्रांती व क्रांतीच्या कार्यक्रम पत्रिका आहेत. पुर्वी क्रांती प्रतिक्रांती म्हटली की मैदानी युद्ध वा हिंसक कारवाया वगैर करावी लागत असत. बौद्धकाळापर्यंत याच पद्धतीने क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात. ब्राह्मणी-वैदिक धर्मातील दशावतराचे मिथक अशा हिंसक क्रांत्या-प्रतिक्रांत्यांचेच प्रतिक आहे. अर्थात ते मिथक ब्राह्मणी धर्माच्या ग्रंथात लिहिलेले असल्याने तेथे ब्राह्मण विजय दाखविलेला आहे. अब्राह्मणी धर्मग्रंथात याच्या अगदि उलट लिहिलेले आहे. उदाहरणार्थ जैन धर्मग्रंथात लिहिले आहे की, क्षत्रियांनीच 21 वेळा पृथ्वी निःब्राह्मण केली आहे.
परंतू बौद्धकाळात हिंसात्मक क्रांती-प्रतिक्रांतीचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. एक नंदराजाचा व दुसरा बृहद्रथ राजाचा कपटाने खून करून झालेल्या प्रतिक्रांत्या सोडल्यात तर संपूर्ण भारतात जे काही मूलभूत समाज-व्यवस्था बदल झालेले आहेत, ते दिशाबदल व दिशाभूल या दोन कृती-कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेले आहेत.
चातुर्वर्ण्यव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती ज्या बौद्धधम्माच्या नेतृत्वाखाली
झाली त्या धम्माला शस्त्र उचलण्याची गरज भासली नाही. कारण समाजाच्या दिशा बदलातूनच जर परिवर्तन शक्य असेल तर शस्त्र का हाती घ्यायचे? या काळात लोखंडाचा शोध लागला होता. त्यामुळे शेतीची लाकडी अवजारे जाऊन लोखंडी नांगर वगैरे येत होती. मात्र शूद्रांचे शोषण व गुलामी आतितिव्र व असह्य करणारा ब्राह्मणी चातुर्वर्ण्याचा धर्म कर्मठ झाला होता. समाज करवट बदलण्याच्या परिस्थितीत होता. हीच परिस्थिती महापुरूष वा महान स्त्री घडवत असते. ही समाजस्थिती समजून घेऊन तिचा अभ्यास करून तीला शास्त्रशूद्ध पद्धतीने योग्य दिशेने बदलण्याचे काम जी कोणी व्यक्ती करते, ती व्यक्ती महापुरूष वा महान स्त्री म्हणून सिद्ध होते. चातुर्वर्ण्याचा ब्राह्मण-श्रुतींचा धर्म अतिकर्मठ झाल्याने त्याला आव्हान देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. बौद्ध व जैन धर्माने हे आव्हान पेलले. मात्र केवळ धर्माला आव्हान देऊन भागत नाही. कर्मठ झालेल्या भौतिक व्यवस्थेलाही दिशाबदल करायला भाग पाडले पाहिजे. सिद्धार्थ गौतम बुद्धाला त्याचाही मार्ग सापडला. मेंढक श्रेष्ठीच्या घरी धम्माचे प्रवचन देत असतांना बुद्धाने जे पाहिले, त्याचे त्याने निरिक्षण केले व चिंतन-मनन करून एक नवा ‘पंचधम्म’ तयार केला. मेंढक श्रेष्ठीच्या घरातले लोक ज्या पद्धतीने आपसात व्यवहार करीत होते, त्यातूनच बुद्धाला ‘पंचधम्म’ सापडला. काय होता हा पंचधम्म?
1)  गुलामाला वेतन द्या.
2)  गुलामाला तुम्ही जे खातात तेच अन्न खायला द्या.
3)  गुलामाला आठवड्यातून एक दिवस सुटी द्या.
4)  गुलाम आजारी पडल्यास त्याची शुश्रुषा करून त्याला बरे करा.
5)  दासाला त्याच्या वय व शारिरिक कुवतीनुसार काम द्या.
अशाच प्रकारे बुद्धाने दासांसाठीही पंचध्म्म सांगीतला. या पंचधम्मांचा प्रचार प्रसार करून बुद्धाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मूळ आधार असलेली शुद्रप्रथाक गुलामगिरी नष्ट केली. गुलाम स्वतंत्र झालेत. म्हणजे गुलामांचे रूपांतर वैतनिक मजूरात झाले. या निमस्वतंत्र मजुरांनी लोखंडी अवजारांच्या साहाय्याने शेती करून उत्पादन 10 पटीने वाढविले. त्याकाळातील कुंभार, लोहार, सुतार, साळी, कोळी आदि व्यवसाय करणारे लोक पुग व श्रेणी या दोन घटकात संघटित झालेत व त्यांचेही उत्पादन 10 पटीने वाढले. हे उत्पादन थेट पश्चिमेकडच्या देशांमध्ये विकले जाऊ लागले. समाजाची भरभराट करणार्‍या धम्मक्रांतीचा आश्रय मोठमोठे राजे व जमिनदारही घेऊ लागलेत. एरवी इतर धर्म राजाश्रय मिळाला तरच प्रसार पावतात. येथे स्वतः राजेच धम्माचा आश्रय घेत आपल्या राज्याच्या विकासाची वाट मोकळी करीत होते. याला म्हणतात दिशा बदलून केलेली क्रांती.
बुद्धाने अशा प्रकारे समाजाची दिशा बदल करून वर्णांतक क्रांती केली. आणी त्यासाठी त्याला व त्याच्या सैनिकांना (बौद्ध भिक्खूंना) कोणतेही हत्यार उचलण्याची गरज भासली नाही. या उलट अनेक राजे व सरदारांनी हत्यार टाकून बौद्ध धम्म स्वीकारला. किमान 700 वर्षे ही बौद्ध क्रांती वर्धिष्णू स्वरूपात जीवंत होती. मात्र प्रतिक्रांती दबा धरून बसलेली होतीच. शेवटचा मौर्य राजा बृहद्रथाचा भर सैन्य कवायतीत त्याच्याच ब्राह्मण सेनापतीने खून केला व समाजाची दिशाभूल करून त्याचा मार्गच बदलण्यास सुरूवात झाली. समाजाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बुद्धाच्याच कार्य-पद्धतीचा वापर केला. धम्माने सु-प्रबोधन करण्यासाठी भिक्खुसंघ संघटित केला व ब्राह्मणी धर्माने कु-प्रबोधन करण्यासाठी ब्राह्मण बुद्धीजीवी संघटित व प्रशिक्षित केला. पुश्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीमुळे राजाश्रय मिळालेला असल्याने अमलबजावणीत कुठेही अडथळा आला नाही. थोडेफार वैचारिक विद्रोह व काही तुरळक राजकिय उद्रेक झालेत, मात्र क्रूर ब्राह्मणांनी ते हिंसक मार्गाने मोडीत काढलेत.
बौद्ध धम्माने संपूर्ण देशालाच जी क्रांतिकारी विकासाची दिशा दिली होती, ती दिशा बदलणे इतके सोपे नव्हते. राजकिय क्रांती वा प्रतिक्रांती एका रात्रीतून होऊ शकते, मात्र मानसिक क्रांती वा प्रतिक्रांती करून लोकांच्या विचारांची दिशा बदलणे महाकठीण काम असते. बौद्ध धम्माला वर्णांतक क्रांतीसाठी जनमानसांच्या विचारांची दिशा बदलावी लागली व त्यासाठी लाखो बौद्ध भिक्खु रात्रंदिवस चारिका करीत सु-प्रबोधन करीत होते. तेव्हा कुठे ही क्रांती 700 वर्षे जीवंत राहीली. तिला नष्ट करण्यासाठी ब्राह्मणांना दस पटीने जास्त कष्ट घ्यावे लागलेत. आजही संभाजी भिडेंसारखे असंख्य ब्राह्मण रात्रंदिवस चारिका करीत कुप्रबोधन करीत फिरतात व दंगलींचे कार्यक्रमही घडवून आणतात.
ब्राह्मण बुद्धीजीवींनी आधीचे अनेक ग्रंथ विद्रूप करीत नव्याने लिहून काढलेत. रोज नवनव्या पोथ्या, पुराणे लिहून त्या घरोघरी जाऊन वाचून दाखविणे, नवस, उपवास, पुजा-पाठ, कर्मकांड, यात्रा-जत्रांचे स्वरूप बदलणे अशी कितीतरी असंख्य कामे त्या काळात ब्राह्मणांनी अत्यंत मायक्रो लेव्हलवर केलीत व आजही डोळ्यात तेल घालून करीतच आहेत. भिडे गुरूजीला स्वतःला राज्यकर्ता होण्याची महत्वाकांक्षा नाही, मात्र काम असे करतो की, देशाचा राजा असलेला प्रधानमंत्री भिडेच्या घरी येतो व पायावर लोटांगणही घालतो. याला म्हणतात दिशाभूल करणारी प्रतिक्रांती. आणी आमच्या 85 टक्के दलित-आदिवासी-ओबीसीतून जे काही छटाकभर लोक ‘ज्ञानी’ बनतात ते सर्वच्या सर्व नगरसेवक पासून तर आमदार-खासदार-प्रधानमंत्री बनण्याच्या शर्यतीत उर फुटे पर्यंत धावतात, आणी शेवटी गरीब बिचार्‍या ब्राह्मणांच्या पायावर जाउन आडवे पडतात.
समाजाची दिशा बदलण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी मार्ग दिला, पण पोपटपंची शिवाय दुसरं काय नाही. धम्मही दिला, मात्र तेथेही कर्मकांडाशिवाय दुसरं काही दिसत नाही. जातीव्यवस्था नष्ट करण्याची कृतीशिल दिशा दाखविणारी अनेक ग्रंथ-पुस्तके महापुरूषांनी लिहलीत. परंतू हे सर्व ग्रंथ कपाटात बंदिस्त आहेत. ब्राह्मण त्यांची पोथी-पुराणे घरोघरी पोहोचविण्यासाठी जी मेहनत घेतात तेवढी मेहनत 85 टक्के वाले घेतात काय? ज्या संविधानाने मागासवर्गीय जनतेला गुलामीतून काढून प्रतिष्ठीत बनवले, ते संविधान घरोघरी पोहोचले काय? मग ते पोहोचविण्याची जबाबदारी कोणाची? भारतीयांच्या घरा-घरातून दिशाभूल करणारी पोथी-पुराणे बाहेर काढायचे असेल तर ‘’घर घर संविधान’’ पोहचलं पाहिजे. आम्ही आमच्या फेसबुकवरील 5,000 हजार मित्रांना आवाहन केले की, ‘घर घर संविधान’ पोहचविण्यासाठी ‘’संविधान गौरव परीक्षा’’ कार्यक्रमात सहभागी व्हा! आम्ही जो संविधान अभ्यासग्रंथ छापला आहे त्याच्या फक्त 25 प्रती विकत घ्या व जवळपासच्या कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सप्रेम भेट द्या! 5000 फेसबुक मित्रातून फक्त 20 मित्रांनी प्रत्येकी 25 ग्रंथ विकत घेतले आहेत. कशी होणार संविधानाची अमलबजावणी? संविधान अजूनही कागदावरच आहे. ते जनमाणसांच्या डोक्यात गेलंच नाही. आजवर जेवढं संविधान  राबविलं गेलं, ते केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. बाबासाहेबांच्या नंतरची पीढी नालायक निघाली. त्या पुण्याईत भर टाकलीच नाही. फक्त ओरबाडत राहीली. बाबासाहेबांची पुण्याई संपली आणी राज्यघटनेची अमलबजावणी थांबली. पेशवाई डोक्यावर बसली आणी मनुस्मृतीची अमलबजावणी सुरू झाली.
संविधानामुळे आज कितीतरी मागासवर्गीय व्यक्ती अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर झाले आहेत. लाखो रूपये कमावत आहेत. बंगले, गाड्या, महागड्या साड्या वगैरे खरेदी करीत आहेत, पण हे इतके नालायक आहेत की संविधानाच्या 25 प्रती विकत घेण्याची यांची दानतच नाही. कसा होणार क्रांतीकारी दिशा बदल? मात्र भिडे-एकबोटेसारखे त्यागी लोक समाजाची ‘दिशाभूल’ करून प्रातिक्रांतीला सुसाट वेगाने पुढे नेत आहेत. तोंडाला पुन्हा गाडगे-मडके व गांडीला झाडू बांधले जाण्याची वाट पाहू या, तोवर सर्वांना कडक जयजोती-जयभीम!!!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
( दै. लोकमंथन, रविवार28 ऑक्टोंबर 2018 च्या अंकात प्रसिद्ध)
पुढील लिंकवर क्लीक करा....And open page 5
https://www.readwhere.com/read/1882607/Lokmanthan-Mumbai/Mumbai#page/5/1

No comments:

Post a Comment