बहुजननामा-47
चला! ...... कामाला लागा!!
बहुजनांनो.... !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे
की, निवडणूका या सामाजिक प्रबोधनाचे उत्तम साधन असतात. निवडणूकांच्या काळात
सभा-समेलनं, जाहिराती-लेख, जाहिरनामे-अभिवचने , सूचक ईशारे-उघड गुपिते, असा
सगळा माहोल असतो. या काळात लोक अधिक सतर्क होतात. बहुतेक सर्वच नेत्यांच्या सभांना
गर्दी करतात, ते काय बोलतात ते कान देऊन ऐकतात. वर्तमानपत्रे-साप्ताहिके काळजीपूर्वक
वाचतात. कार्यालयात, चौकात, हॉटेलात, पान ठेल्यावर त्यावर खडाजंगी चर्चाही करतात.
सोशल मिडिया तर भरभरून वाहत असतो. अशा काळात सामाजिक वैचारिक जनजागृती नाही करायची,
तर कोणत्या काळात करायची?
बाबासाहेबांच्या सिद्धांताचा पूरेपूर
उपयोग आर.एस.एस.-भाजपा करते आहे. 1991 पासूनच्या सर्वच निवडणूकीत भाजपाने
राममंदिर-बाबरी मशिदिच्या नावाने भरपूर (कु) प्रबोधन केलं. त्या कुप्रबोधनाच्या
परिणामी देशभर धार्मिक दंगलीही घडवून आणल्यात! म्हणजे ते केवळ वैचारिक कु-प्रबोधन
करून थांबत नाहीत, तर दंगलींचा कृती-कार्यक्रमही राबवितात. परिणामी त्यांचे
सत्तेवर येणे अटळ असते.
1991 च्या निवडणूकीत मसिहा व्हि.पी.
सिंग यांनी ‘मंडल आयोगावर’ भरपूर प्रबोधन
केलं. मंडल आयोगाची एक शिफारस लागू करून
कृती कार्यक्रम आधिच सुरू केलेला असल्याने त्यांच्या वैचारिक प्रबोधनाला
भारदस्तपणाही होता. मात्र ज्या सरदारांच्या सोबतीने ते ही निवडणूक लढवीत होते, ते
या लढाईत कमी पडलेत. परिणामी केंद्रात पराभूत झालेत. परंतू, तरीही व्हि.पी.
सिंगांचे प्रबोधन कामी आलेच! नंतरच्या काही राज्यातील निवडणूकांमध्ये याच
सरदारांचे दलित-ओबीसी पक्ष सत्तेवर आलेत. ती केवळ आणी केवळ मसिहा व्हि.पी.
सिंगांची ‘’पुण्याई’’ होती. हे दलित-ओबीसी पक्ष अनेकदा आलटून पालटून सत्तेवर आलेत,
परंतू मंडल आयोगाची एकही शिफारस आपल्या राज्यात लागू करू शकले नाहीत. मंडल आयोगावर
एकही सभा-परिषद-मेळावा घेऊ शकले नाहीत. मंडल आयोग लागू करण्यासाठी ज्या
प्रधानमंत्र्याने सत्ता कूर्बान केली व राजकीय करियर बरबाद झालं, त्या व्हि.पी.
सिंगांचे स्मारक-पुतळा उभारला नाही व जयंती-पुण्यतिथीही साजरी केली नाही.
कॉंग्रेस-भाजपाच्या मदतीने अल्पकाळाचे प्रधानमंत्रीपद आपल्याकडे चालून येऊ शकते या
खोट्या आशावादापोटी मायावती, लालू, मुलायम, नीतीश वगैरे नेते मंडल आयोगाच्या पुढील
शिफारशी लागू करीत नव्हते. कारण मंडल आयोगाची अंलबजावणी केली तर
कॉंग्रेस-भाजपा-आर.एस.एस. हे नाराज होतील व आपले संभाव्य प्रधानमत्रीपद धोक्यात
येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. व्हि.पी. सिंगांच्या पुण्याईवर सत्ता भोगणारे
हे सर्व दलित-ओबीसी पक्ष कृतघ्न निघालेत, आणी म्हणूनच दलित-ओबीसी मतदारांनी या
गद्दारांना 2014 साली चितपट करून सातवं आसमान दाखविलं.
भारतात निवडणूका जवळ आल्यात की फक्त
धार्मिक प्रबोधनच होत असतं व फक्त दंगलींचाच कृती-कार्यक्रम राबविला जातो. स्वतःला
फुले-आंबेडकरवादी, लोहियावादी, मार्क्सवादी लेबलं लावून मिरविणारे पक्ष कधीच
सामाजिक विषय घेऊन प्रबोधन करीत नाहीत. प्रत्येक निवडणूकीत यांचा एकच अजेंडा असतो.
मागील निवडणूकीत ‘’कॉंग्रेस नको’’ चा अजेंडा होता, आता 2019 च्या निवडणूकीत ‘’मोदी
नको’’ चा अजेंडा आहे. 2024 लाही असाच काहीतरी अदला-बदलीचा अजेंडा असणार आहे. भाजपा
सत्तेवर आला तर तो कपडे काढून झोडपतो, कॉंग्रेसवाले झोडपतांना निदान कपडे तरी
काढून घेत नाहीत, एवढाच काय तो फरक!
सर्व पुरोगामी म्हणविणार्या पक्षांनी
सत्तेवर येताच केवळ मंडल आयोग व फुले-आंबेडकरी प्रबोधन या दोनच मुद्द्यांवर लक्ष
केंद्रीत केले असते, तर 20 वर्षांपूर्वीच कॉंग्रेस-भाजपा-आर.एस.एस. खतम झाली असती
व देशात-राज्यात आलपटून-पालटून दलित-ओबीसी पक्षच सत्तेवर येत राहिले असते.
सत्तरीच्या दशकातच तामिळनाडूतील पुरोगामी पक्षांनी तेथील ओबीसी जागृत केला व
ब्राह्मणी पक्ष खतम करण्याची क्रांती केली. त्यांच्या निवडणूकांच्या प्रबोधन
अजेंड्यात दोनच मुद्दे असायचे! एक ओबीसी-दलित आरक्षणाचा व दुसरा स्वामी
पेरियारांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रचार-प्रसार! गेल्या 45 वर्षांपासूनचे
ओबीसींचे यशस्वी क्रांतीकारी तामिलनाडू-मॉडेल समोर असतांनाही, जर देशातील
दलित-ओबीसी पक्ष त्याकडे दुर्लक्ष्य करीत असतील, तर त्यांना ‘गद्दार’पेक्षा आणखी
कोणती कडक उपमा असेल तर तीही अपूर्ण पडेल.
हे सर्व पुरोगामी म्हणविणारे पक्ष ढोंगी
असतात, हे सर्वांनाच माहित असते. परंतू आपले ढोंग उघडकीस येऊ नये म्हणून ते नवीन
काही तरी ढोंग शोधून काढतात व त्यावर निवडणूका लढवितात. आता ‘’संविधान बचाव’’ चे
नवे कातडे अंगावर घेऊन ते निवडणूकीला सामोरे जात आहेत. आणी या संविधान बचाव
मोहिमेचं नेतृत्व कोण करतंय? ज्या पक्षांनी गेल्या 65 वर्षात संविधानाची प्रचंड
मोडतोड केली त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोक या मोहीमेचं नेतृत्व करणार व
त्यांच्या मागे सर्व पुरोगामी म्हणविणारे दलित-ओबीसी-कम्युनिस्ट पक्ष फरफटत जाणार!
वास्तविक या पुरोगामी पक्षांना आपले स्वतःचे अजेंडे आहेत. दलित-ओबीसी पक्षांजवळ
जातीअंताचा अजेंडा आहे. ऍट्रॉसिटी एक्टचा मुद्दा आहे. ओबीसी जनगणना वा जातनिहाय
जनगणनेचा मुद्दा आहे. शबरीमला, पडदा पद्धत, तीन तलाक आदि स्त्री-मुक्तीचे मुद्दे
आहेत, विद्यार्थी शिष्यवृती वगैरे मुद्दे आहेत. कम्युनिस्टांचा स्वतःचा वर्गीय
अजेंडा असतो. पण नाही. आपलं स्वतःचं कमरेचं सोडून दुसर्याची लंगोटी घेऊन लाज
झाकण्याचा हा प्रकार आहे. हमाम मे सब नंगे!
बरे, ‘संविधान बचाव’ चा मुद्दा तरी
प्रामणिक आहे काय? म्हणजे हा प्रश्न मी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला नाही विचारीत! मी
हा प्रश्न फुले-आंबेडकरवादी व मार्क्सवादी लेबल लावलेल्या पक्षांना विचारत आहे.
संविधानाचं काय प्रबोधन आहे यांच्याकडे? कोणता कृती कार्यक्रम आहे यांच्याकडे?
5-25 डोक्यांचा एकच धरणे कार्यक्रम सोडला तर, यांच्याकडे सांगण्यासारखं काय आहे?
म्हणून आजच्या बहुजननामा तर्फे मी एक कृती कार्यक्रम या ‘संविधान बचाव’वाल्यांना
देत आहे.
निवडणूका जवळ आल्यात की सर्वच
उमेदवारांची लगबग सुरू होते. पक्षश्रेष्ठी 6 महिने आधीच आदेश देतात, ‘’कामाला
लागा!’’ पण कोणते काम? एकच काम- दररोज आपलं थोबाड वर्तमानपत्रात छापून आलं पाहिजे,
चौकाचौकात फ्लेक्सबोर्ड झळकले पाहिजेत, यासाठीची धडपड म्हणजे कामाला लागणे.
त्यासाठी ते काहीही फंडे करायला तयार असतात. निवडणूकीच्या शेवटच्या 10 दिवसात करोडो
रूपयांचा अक्षरशः चुराडा करीत जिंकतात किंवा हरतात.
मी देत असलेला कृती कार्यक्रम अत्यंत
सोपा व सहज करता येण्यासारखा आहे. आम्ही फुलेआंबेडकर विद्यापीठ संचलित सत्यशोधक
छत्रपती ज्ञानपीठातर्फे या वर्षी ‘भारताचे संविधानः जसेच्या तसे’ या
अभ्यासग्रंथावर परीक्षा आयोजित केलेली आहे. या अभ्यासग्रंथात भारताचे संविधान सर्व
दुरूस्त्यांसह जसेच्या तसे छापलेले आहे. शिवाय संविधान समजून सांगणार्या तज्ञांचे
लेख आहेत. न्यायमुर्ती पी. बी. सावंतांची प्रस्तावना आहे. संविधानाची जडण-घडण
उकलणार्या चर्चा व संविधान सभेतील बाबासाहेबांची भाषणेही मराठीत छापली आहेत.
केद्र सरकार व राज्य सरकारे संविधान छापतांना त्यातील फक्त 395 कलमे छापते. आणी
तरीही सरकार हा ग्रंथ 400 ते 500 रूपयाला विकते. केवळ कलमे वाचून संविधान अजिबात
समजत नाही. आम्ही जो संविधानाचा अभ्यासग्रंथ छापला आहे, तो वाचून संविधान पूर्णपणे
समजते. असा हा परिपूर्ण ग्रंथ बाजारात 500 ते 600 रूपयात विकला जाऊ शकतो. परंतू
संविधान गौरव परिक्षा देणार्या व्यक्तींना हा ग्रंथ आम्ही फक्त 200 रूपयात घरपोच
देणार आहोत. 20 हजार संविधान ग्रंथ छापून त्यावर किमान 50 हजार परीक्षार्थी
बसविण्याचा आमचा मानस आहे.
तर, 2019 च्या निवडणूका लढविणार्या
प्रत्येक पुरोगामी उमेदवाराने आपल्या मतदारसंघातील 5 ते 10 कॉलेजेस निवडावीत.
विधानसभा मतदारसंघ असेल तर किमान 5 कॉलेज व लोकसभा मतदारसंघ असले तर किमान 10
कॉलेज निवडावेत. प्रत्येक कॉलेजमधील 18 वर्षे व त्यावरील वयाची 1,000 मुलं-मुली
निवडायची! त्यांना आपल्या विद्यापीठाने छापलेले 500 संविधानग्रंथ सप्रेम भेट
द्यायचे! एका ग्रंथावर दोन परिक्षार्थी अभ्यास करतील व परीक्षा देतील. एका कॉलेजला
500 ग्रंथ तर पाच कॉलेजांसाठी 2,500 ग्रथ उमेदवारास विकत घ्यावे लागतील. लोकसभा
मतदार संघासाठी 10 कॉलेजांना 5,000 ग्रंथ लागतील. 5 किंवा 10 लाख रूपयांच्या या
कार्यक्रमात पुढील फायदे होऊ शकतात. आपल्या मतदारसंघासाठी जो संविधान अभ्यासग्रंथ
छापला जाईल, त्या ग्रंथाच्या शेवटच्या कव्हरपानावर उमेदवाराचा रंगीत फोटो छापला
जाईल व त्याचे कार्य-परीचय ठळकपणे छापले जाईल. या प्रकल्पाचे फायदे
पुढीलप्रमाणे--------
1) निवडणूकपूर्व
मशागत आपल्या मतदारसंघाची होते.
2) प्रत्येक
कॉलेजात ग्रंथ वाटप समारंभ मोठ्या थाटामाटात करता येईल व त्यास प्रसिद्धी मिळेल.
3) परिक्षेस
बसलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षापूर्व तयारी करून घेण्यासाठी किमान दोन शिबीरे
आयोजित करता येतील व त्यातून तुमची प्रसिद्धी होईल.
4) परीक्षेच्या
दिवशी तुमच्या हस्ते सीलबंद प्रश्नपत्रिकेची पाकीटे फोडून उद्घाटन होईल.
5) परीक्षा
झाल्यावर भला-मोठा बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करता येईल
व या कार्यक्रमास पक्षश्रेष्ठींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावता येईल.
विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या प्रमाणपत्रांवर आपला फोटो असेल.
6) एवढे सर्व
कार्यक्रम जर निवडणूक जाहीर होण्याआधीच संपन्न झालेत, तर तो खर्च आपल्या निवडणूक
खर्चात येणारच नाही.
7) याच तरूण
विद्यार्थ्यांमधून तुम्हाला वैचारिक कार्यकर्ते मिळतील व ते तुमचा प्रचार करतील
8) हा
प्रकल्प जर राबविला तर तुमचे 5 ते 7 टक्के मतदान पक्के समजायचे.
असा संविधान बचाव मोहिमेचा कृती कार्यक्रम राबविला तर खर्या
अर्थाने आपण लोकशाही निवडणूक लढवीली असे, म्हणता येईल.
चला तर,
कामाला लागू या!...........
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile
– 88 301 27 270
पुढील
लिंकवर क्लीक करा....