बहुजननामा-97
डावे-पुरोगामी
व आमचे आदिवासी पूर्वज
-1-
स्वातंत्र्याच्या
70 वर्षात ज्या काही घटना घडत आहेत, त्यावरून एक खात्री होते की, आमच्या देशातील
डाव्या-पुरोगामी म्हणविणार्या लोकांपेक्षा आमचे आदिवासी पूर्वज निश्चितच जास्त
हुशार होते व आहेत. आमचे
आदिवासी आजही जंगलात पाड्यांवर राहतात. फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्रचंड वृक्षतोडीचा
कार्यक्रम राबवूनही आमच्या आदिवासींनी जंगल शाबूत ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला
आहे. आपली पारंपरिक शस्त्रे वापरून वाघ, सिंह, लांडगे वगैरे प्राण्यांपासून आजही
ते आपला बचाव करतात. हजारो वर्षांपूर्वी घनदाट जंगल असेल, तेव्हा हिंस्त्र
पशूंपासून ते कसे संरक्षण करून घेत असतील, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण त्या
काळात अणकुचीदार दगड वा लाकूड या पलिकडे कोणतेही शस्त्र नव्हते. ही प्राचिन
शस्त्रे आक्रमणकारी वाघ-लांडग्यांच्या जवळ जाऊन वापरावी लागत होती. त्यात पराभव
होऊन वाघ-लांडग्यांचे भक्ष्य होण्याचीच दाट शक्यता होती. अशावेळी तत्कालीन आदिवासी
पूर्वजांनी काही चिंतन केले असेल व अस्तित्वाच्या गरजेपोटी काही संशोधन केले
असावे.
शत्रू
जेव्हा बलवान असतो व मैदानी लढाईत अजिंक्य असतो, त्यावेळी भौतिक पातळीवरची मैदानी
शस्त्रे-अस्त्रेंच्या पलिकडे जाऊन बौद्धिक पातळीवर ते युद्ध येऊन ठेपते. या
बौद्धिक लढाईची सुरूवात वास्तवाच्या अतिसुक्ष्म अभ्यासापासून सुरूवात होते. कार्ल
मार्क्सच्या आधी समाजवादाची मांडणी करणारे अनेक विचारवंत होते. बलाढ्य
भांडवलदार वर्ग व त्याचे क्रूर शोषण पाहून काही कामगार व बुद्धिमान लोक भांडवलशाही
विरोधात लढण्याची भाषा करीत होते. नवा पर्याय म्हणून नवी समाजवादी व्यवस्था
निर्माण करण्याचा विचार करीत होते. मात्र त्यांना स्वप्नाळू समाजवादी
म्हटले गेले. कारण त्यास कोणत्याही अभ्यासाचा, सिद्धांतांचा आधार नव्हता. ती एक
समाजवाद नावाची कवी कल्पना होती, जी कधीच अस्तित्वात येऊ शकत नव्हती. परंतू कार्ल
मार्क्सने आपल्या इंटिक्सटच्या उजेडात वास्तव समाजव्यवस्थेचा अभ्यास केला. अनेक
कारखान्यांचे कामगारांवरील अहवाल वाचून काढलेत, टिपणे तयार केलीत,
गुलामगिरीपासूनच्या समाजव्यवस्थांचा बारकाईने अभ्यास केला. त्यातून ऐतिहासिक
भौतिकवादाची मांडणी केली. भौतिक व रसायन शास्त्रासारख्या विज्ञानशाखांचा
अभ्यास करून द्वंदात्मक भौतिकवादाची मांडणी केली. समाजव्यवस्था बदलत
असतांना उत्पादन साधने, उत्पादक शक्ति व त्यातून निर्माण होणारे वरकड मुल्य आदिंचा
शोध घेऊन ‘शोषणाचा सिद्धांत’ मांडला. समाजवाद व साम्यवादाचे मॉडेलही तयार
केले. ते प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करून त्याचा
जाहीरनामाही लिहीला. त्यानंतर हा मार्क्सवाद जग बदलायला निघाला व त्यात तो
यशस्वीही झाला. या बलाढ्य भांडवलदार वर्गाचे सामर्थ्य ‘शोषणात’ होते
व त्या शोषणातून तयार झालेला ‘कामगारवर्ग’ भांडवलदारांची कमजोरी
होती. मार्क्सने कामगारवर्ग हेरला आणी बलाढ्य भांडवलदारांना अक्षरशः पळता भूई थोडी
केली.
आपल्या
हिंस्त्र शत्रूंना आपण मैदानी लढाईत पराभूत करू शकत नाहीत, हे लक्षात आल्यावर
तत्कालीन आदवासींनी हिंस्त्र पशूंचा असाच अभ्यास केला असावा, या हिंस्त्र पशूंचे
सामर्थ्य कशात आहे व कमजोरी कशात आहे, तेही शोधून काढले असेल. शत्रूच्या
सामर्थ्याविरोधात लढता येत नसेल तर त्याच्या कमजोर्यांचा फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे
न लढताही विजय मिळवीता येतो. अभ्यासांती आमच्या आदिवासी पूर्वजांच्या असे लक्षात
आले की, हे शक्तिशाली लांडगे-वाघ वगैरे हिंस्त्रप्राणी ‘अग्नी’ला घाबरतात.
वाघ-लांडगे हल्ले करण्यासाठी आलेत की, आमचे आदिवासी पूर्वज जळता पलिता, जळता टेंभा
अथवा मशाल हातात घेऊन वस्तीबाहेर फक्त उभे राहायचे. अग्नीच्या प्रचंड ज्वाला पाहून
ते हिंस्त्रपशू पळून जायचे. अशा प्रकारे न लढताही शत्रू मैदान सोडून पळुन जात होता
व आपला विजय होत होता.
स्वातंत्र्याची
70 वर्ष म्हणजे मोठा संक्रमण काळ होता. या संक्रमणकाळात प्रबोधनाच्या मैदानात
वैचारिक लढाई करून शत्रूला पराभूत करायचे असते. वैचारिक प्रबोधन, संक्रमणकाळ वगैरे
भानगड भारतीय डाव्या-पुरोगाम्यांना माहीतच नसल्याने प्रतिगाम्यांसाठी मैदान साफ
होते. त्याचा पुरेपूर फायदा घेऊन वैदिकी-ब्राह्मणांनी 1947 साली आधूनिक पेशवाईकडे
वाटचाल सुरू केली व 2014 साली ते मजबूतपणे दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसलेत. आता
तुम्ही त्यांच्याविरोधात कितीही मोर्चे काढा, धरणे धरा, भाषणे करा, त्यांच्यावर
काहीही परिणाम होत नाही, हे आपण 2019 च्या निवडणूकीनंतरही पाहात आहोत.
रस्त्यावरच्या मैदानी लढाईत तुम्ही त्यांचा पराभव करू शकत नाहीत, कारण
त्यांच्याकडे आता पोलीस आहेत, निमलष्करी दल आहे व गरज पडली तर ते सीमेवरची मिलिटरी
आणून माणसे, वस्त्या व गावं-पाडेही उध्वस्त करू शकतात. लोकशाही पद्धतीने वोटींग
करून तुम्ही त्यांचा पराभव करू शकत नाहीत, कारण आता त्यांच्याजवळ ‘ईव्हीएम’ नावाचे
मोठे लोकशाही-अस्त्र आहे. मग अशा बलाढ्य शत्रूच्या विरोधात लढणार तरी कसे व त्याला
पराभूत करणार तरी कसे? या लढाईचे नेतृत्व आमच्या आजच्या अदिवासींकडे असते तर
त्यांनी निश्चितच शत्रूचा अभ्यास करून काही तरी नवीन शोधून काढले असते. मात्र
आजच्या या क्रांती-प्रतिक्रांतीच्या युध्दात दोन्ही बाजूने नेतृत्व करणारी मंडळी
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्राह्मणच आहेत. दोन्ही बाजूच्या सैन्याचे काही नेते जातीने
ब्राह्मण आहेत, तर उरलेले सर्व भटाळलेले आहेत. त्यामुळे लढाई निर्णायक होण्याएवजी ‘नुरा-कुस्ती’प्रमाणे
लुटूपुटूचीच होत आहे व पुढेही ती तशीच होत होणार आहे. अशा लढाइचे नव्वदीच्या
काळातले उदाहरण मी बहुजननामा-96 मध्ये दिलेले आहे. मंदिर-मस्जिदचे युद्ध
हिंदू-मुस्लीम असे धार्मिक नव्हतेच. ते जात-युद्धच होते. परंतू क्रांती व
प्रतिक्रांतीचे नेते भट वा भटाळलेले असल्याने धर्मयुद्धाच्या पडद्याआड झालेल्या
जातीयुद्धात क्रांती पराभूत झाली व प्रतिक्रांती जिंकली.
त्या
ऐंशी-नव्वदिच्या आठ वर्षांच्या काळात (1985-1992) सर्व डाव्या-पुरोगामी सामजिक-राजकीय
पक्ष-संघटनांनी बाकीचे सर्व विषय बाजूला ठेवून फक्त आणी फक्त ‘मंडल आयोगासाठीचे ‘ओबीसी
प्रबोधन आंदोलन’ केले असते तर, अडवाणींच्या रामरथ यात्रेला उत्तर म्हणून मंडलरथ
यात्रा त्याचवेळी काढता आली असती. ओबीसींचे धार्मिक धृवीकरण रोखता आले असते व
पुढील बाबरीभंजन व धार्मिक दंगलींचा डावही उधळता आला असता. त्याकाळी आमच्यासारखे
गल्ली-बोळातील कार्यकर्ते व काही मुठभर ओबीसी संघटना वगळल्यात तर बाकि सर्व
डावे-पुरोगामी संघ-भाजपाच्या धार्मिक लाटेत कचर्यासारखे वाहून गेलेत.
आमच्या
वैदिकी-ब्राह्मणी शत्रूचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. हा शत्रू प्रत्यक्ष
सत्तेवर असो वा नसो, सतत कार्यरत असतो. सतत नवनवे मुद्दे उपस्थित करून तो तुम्हाला
लढाईचे आव्हान देत असतो. सत्तेत आल्यावर तो सुस्त होत नाही, सत्तेची उब घेत शांत
बसत नाही, तर त्या उबेचा भडका उडवून दंगलींचा वणवा पेटवतो. त्या वणव्यात तुमची
शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, धर्मनिरपेक्षता, संयम-सहिष्णूता या सर्व मानवी व
संवैधानिक मुल्यांना जाळून राख करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा बलाढ्य,
अति-हिंस्त्र, रानटी पशूंपेक्षाही कितीतरी जास्त पटीने रानटी असलेल्या या आधुनिक
शत्रूला खतम कसे करायचे, हा आजचा मोठा यक्षप्रश्न आहे. आमच्या आदिवासी पुर्वजांचा
आदर्श घेत हा बलाढ्य शत्रू कसा नष्ट करता येईल, यावर आता पुढील बहुजननामा-98 मध्ये
चर्चा करू! तोपर्यंत जयजोती, जयभीम, सत्य की जय हो!
(लेखनः
25 जानेवारी 2020)
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile
– 88 301 27 270