http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, November 29, 2020

132 BahujanNama Elect Candidate 29Nov20

बहुजननामा-132 ************** प्रा. श्रावण देवरे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील सत्यजित, बंडगर, पांचाळ व खोब्रागडे यांची ‘भुमिका’ विजयी करा! -1- महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघ व पद्वीधर मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असून 1 डिसेंबरला ‘मतदेण’ संपन्न होणार आहे. मागील आठवड्यात आम्ही जाहिर केले होते की, Obc+Sc+St+Ntvj+Dnt+Sbc+Muslim Obc या प्रवर्गांच्या संयुक्त आरक्षण मंचातर्फे ‘फुलेशाहूआंबेडकरवादी’ जी भुमिका जाहीर केली आहे, तीच भुमिका घेऊन जे उमेदवार निवडणूक लढवतील, त्यांना पाठींबा देण्याचा आम्ही विचार करू. भुमिकेतील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत- 1) OBC,SC,ST,VJ/NT SBC व मुस्लीम ओबीसी या संवैधानिक प्रवर्गात मराठा जातीसारखी कोणतीही उच्चजातीय घुसखोरी सहन केली जाणार नाही. 2) शैक्षणिक अभ्यासक्रमात फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचे धडे व पुस्तके समाविष्ट करायला सरकारला भाग पाडणार 3) शिक्षणक्षेत्रातील सरंजामशाही व ब्राह्मणशाहीविरोधात सतत संघर्ष करणार 4) असंख्य पद्वीधर मुले कर्ज काढून MPSC व UPSC परीक्षांची तयारी करीत असतांना महाराष्ट्र शासनाने या परीक्षा अचानक पुढे ढकलल्यात. या सर्व परीक्षार्थिंना नुकसानभरपाई म्हणून किमान 1 लाख रूपये देण्यात यावेत व लवकरातलवकर परीक्षांचे आयोजन करावे. 5) थांबवलेली नोकरभरती त्वरीत सुरू करून पद्वीधर बेरोजगारांना लवकरात लवकर नोकरीत समावून घ्यावे. 6) ऍट्रॉसिटी ऍक्ट अधिकाधिक कडक करून या ऍक्टचे संरक्षण ओबीसीमधील बलुतेदार जातींनाही मिळाले पाहिजे. त्यासाठी या ऍक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी 7) जात-पोटजातनिहाय जनगणना करायला लावून आरक्षणाची वर्गवारी लोकसंख्येनुसार करायला सरकारला भाग पाडणार. 8) जात-पोटजातनिहाय जनगणना केल्यानंतर त्यातील आकडेवारीच्या आधारे सर्व मागास कॅटेगिरीतील अतिअल्पसंख्य जातींसाठी आरक्षणाचे विभाजन करायला सरकारला भाग पाडणार. 9) निती आयोग बरखास्त करून प्लॅनिग कमिशनचे पुनर्गठण करणे व संवैधानिक आरक्षणाच्या प्रवर्गांना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये निधीची तरतूद केली पाहिजे असे काही महत्वाचे मुद्दे घेउन ही निवडणूक लढवली गेली पाहिजे. ही भुमिका जाहीर केल्यानंतर या भुमिकेला बर्‍याच मतदार-कार्यकर्त्यांनी फोन करून पाठींबा दिला. आपण उमेदवारांची नावे जाहीर करा, त्याप्रमाणे आम्ही मतदान करू, असेही त्यांनी सांगीतले. पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत जानराव, पुणे पद्वीधर मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव बंडगर, औरंगाबाद पद्वीधर मतदारसंघातील उमेदवार नागोराव पांचाळ व नागपूर मतदारसंघातील उमेदवार अतूल खोब्रागडे यांनी संपर्क केला व आपण मांडलेली भुमिका घेऊनच आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत, असे सांगीतले. त्याप्रमाणे पुणे येथे 25 नोव्हेंबर 20 रोजी जाहीर कार्यक्रम घेऊन या उमेदवारांनी आपली भुमिका जाहिर केली व प्रचारयंत्रणा सुरू झाली. -2- गेल्या 10 वर्षात ओबीसी कॅटेगिरीत राजकीय व सामाजिक जागृती वाढलेली आहे. त्यामुळे ब्राह्मण-मराठ्यांसारखे प्रस्थापित शोषक असलेले जात-सनेते भयभीत होणे स्वाभाविक आहे. कनिष्ठ मागास जातीतील जागृती विकाऊ असते, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. एखाद्या मतदारसंघात एखादा शोषित-पिडित समाजघटक संख्येने जास्त असेल तर त्यांचाच प्रतिनिधी निवडूण येण्याची खात्रीही असते. असे अनेक मतदारसंघ आहेत, ज्यात तेली, माळी, धनगर, बौद्ध यापैकी एका-एका जातीची लोकसंख्या निम्म्यापेक्षाही जास्त आहे. अशावेळी अल्पसंख्य असलेला ब्राह्मण-मराठा नेता असेकाही षडयंत्र रचतो की जेणेकरून उच्चजातीय उमेदवार अल्पसंख्य असूनही सहजपणे निवडून येतो. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांना समजतच नाही. उदाहरण पुढीलप्रमाणे- 2019 च्या नागपूर लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्य जातीचे नितीन गडकरी भाजपातर्फे उभे होते. या मतदारसंघात बौद्धांची संख्या जास्त आहे. नितीन गडकरी यांची इमेज अशी आहे की ते जणू संघ-भाजपाचे ‘नाक’ आहेत. संघ-भाजपाचे हे नाक कापण्याची फार मोठी संधी यावेळी बौद्धांच्या हातात होती. मात्र शत्रूचे नाक कापण्याऐवजी आपले स्वतःचेच नाक कापून घेण्यात आमच्या काही आंबेडकरवाद्यांना मजा वाटते. या निवडणूकीत 18 बौद्ध उमेदवार उभे राहीलेत. त्यामुळे बहुसंख्य असलेली आंबेडकरी मते विभागली गेलीत व अल्पसंख्य असलेले नितीन गडकरी सहजपणे जिंकून आलेत. 18 बौद्ध उमेदवार एकाच मतदारसंघात उभे करण्याचे षडयंत्र गडकरींचेच होते, हे वेगळे सागण्याची गरज नाही. शत्रूचे षडयंत्र यशस्वी करण्यात बौद्ध इतके पुढे आहेत, तर मग ओबीसींनी का म्हणून मागे राहावे? शिक्षक व पद्वीधर मतदारसंघात 50-50 पेक्षाही जास्त उमेदवार उभे आहेत. कोण आहेत हे बहुसंख्य उमेदवार? हे ओबीसी व दलित उमेदवार आहेत. या उमेदवारांमध्ये ओबीसी-दलित चळवळीशी संबंध नसलेले अनेक हौसे-नौसे-गौसे आहेत. कोणी उभे केले या हौस्या-गौस्यांना? अर्थातच प्रस्थापीत मराठा समाजाच्या नेत्यांनी अक्षरशः पैसे देऊन हे उमेदवार केले आहेत. जे षडयंत्र नितीन गडकरींनी नागपूर लोकसभा निवडणूकीत यशस्वी केले, तेच षडयंत्र शिक्षक व पद्वीधर निवडणूकीत मराठा उमेदवार करीत आहेत. मराठा समाज हा राजकीयदृष्ट्या जागृत राज्यकर्तावर्ग असल्याने अनेक मराठा उमेदवारांमधून ‘नेमका’ मराठा उमेदवार कोण व त्यालाच कसे निवडून आणले पाहिजे, याचे प्रशिक्षण मराठा समाजाला देण्याची गरज नाही, कारण प्रदिर्घ काळातील सत्तेतून हे शहाणपण सहजपणे येत असते. असे शहाणपण ओबीसी व दलितांकडे नाही. त्यांची राजकीय जागृती आजही जातीतच अडकलेली आहे. ‘राज्यकर्ता वर्ग’ बनण्याची फिलॉसॉफिकल क्षमता त्यांच्यात अजून आलेली नाही. त्यामुळे 5-25 हजार रूपयात ते आपल्या जातीला सहजपणे विकून टाकतात व त्याबद्दल त्यांना कुठेही लाज-लज्जा वाटत नाही. आताही या निवडणूकांमध्ये प्रस्थापित मराठा नेत्यांकडून 5-25 हजार रूपये घेऊन ओबीसी व दलित जातीतील काही उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. ते वेगवेगळ्या जातींचे असल्याने त्यांना त्यांच्या जातीची मते मिळतील व मतांची विभागणी होऊन एकमेकात पाय अडकवून पडतील. आपण पराभूत झालोत तर आपल्या समाजाचे ‘नाक’ कापले जाईल, याचीही त्यांना पर्वा नसते. 5-25 हजार रूपये मिळालेत, यातच त्यांना आनंद वाटत असतो. पैसे खाऊन स्वतः घसरतात व समाजालाही ‘आडवे’ पाडतात. अशावेळी ओबीसी-दलित समाजातील मान्यवर नेत्यांनी व विचारवंतांनी उमेदवार निवडणूकीत हस्तक्षेप केला पाहिजे व चळवळीशी कट्टर नाते असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांनाच निवडूण आणण्याचे आवाहन केले पाहिजे. परंतू बरेचसे ओबीसी-दलितेनेते व विचारवंतही प्रस्थापित मराठा-ब्राह्मण जातीशी ‘‘बांधील’’ असल्याने ते असे ‘कार्य’ करू शकत नाहीत. म्हणून आमच्यासारख्या ‘गल्ली-बोळात’ काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी हे काम शिरावर घेतले आहे. आम्ही गेल्या आठवड्यात निवडणूकीची तात्विक भुमिका जाहिर केली व या भुमिकेला जाहीरपणे मान्यता देणार्‍या चार उमेदवारांची नावे प्रथम पसंतीची म्हणून घोषित करीत आहोत. हे चारही उमेदवार दलित-ओबीसी चळवळीत काम करणारे आहेत व ‘भुमिका’ घेऊन उभे आहेत. -3- ओबीसी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रदिप ढोबळे यांनी ‘मतदेण’ प्रक्रियेत भाग घेतांना एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. ती मी सर्व सोशल मिडियावर व्हायरल केलेली आहे. त्याप्रमाणे पुणे शिक्षक मतदारसंघातील सत्यजित जानराव यांना पहिल्या पसंतीचं ‘मतदेण’ करतांना त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 असा आकडा लिहा. त्यानंतर डॉ. राजेंद्र कुंभार यांना दुसर्‍या पसंतीचं मतदेण करतांना त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 2 असा आकडा लिहावा. रविंद्र सोलंकर यांना तिसर्‍या पसंतीचं मतदेन करतांना 3 असा आकडा लिहा. सुरेश नारायण वाघमारे यांना चौथ्या क्रमाकाचे मत द्या! पुणे पद्वीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदेण करतांना शिवाजीराव बंडगर यांना पहिल्या पसंतीचं मत द्या व त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 असा आकडा लिहा. त्यानंतर सोमनाथ जनार्दन साळूंखे यांच्या नावासमोर 2 असा आकडा इंग्रजीत लिहा. औरंगाबाद पद्वीधर मतदारसंघातील प्रा. नागोराव पांचाळ यांना पहिल्या पसंतीचं मतदेण करा. त्यानंतर सचिन अशोक निकम यांना दुसर्‍या पसंतीचं व शेख सलीम शेख इब्राहिम यांना तिसर्‍या पसंतीचं मतदेण करा. नागपूर पद्वीधर मतदारसंघातील अतूल खोब्रागडे यांना पहिल्या पसंतीचं मतदेण करा. वरीलपैकी प्रत्येक उमेदवाराने स्वतःसाठी प्रथम पसंतीचं मत मागावे व आपल्या वैचारिक जोडीदार उमेदवारांसाठी दुसर्‍या, तिसर्‍या क्रमांकाची मते मागायची आहेत. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा व मनसे या पाच पक्षांच्या उमेदवारांना मते देऊ नका. या पक्षांच्या उमेदवारांच्या नावापुढे कोरी जागा ठेवावी, तेथे काहीही लिहू नये. कारण या पक्षातर्फे निवडून गेलेले आमदार-खासदार हे ओबीसी-दलितांचे शत्रू म्हणूनच काम करतात. हे उमेदवार आपल्या दलित-ओबीसींच्या मोर्च्यात-मेळाव्यात येऊन क्रांतिकारक भाषणे करून टाळ्या मिळवितात, मात्र विधानसभेत-लोकसभेत गेल्यावर मराठा-ब्राह्मणांच्या हिताचेच काम करतात. पक्षांच्या बैठकीत आपल्या उच्चजातीय मालकांपुढे दलित-ओबीसींच्या प्रश्नांवर बोलण्याची यांची हिम्मतही होत नाही. त्यामुळे या पाच पक्षांतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार कोणत्याही जातीचे असोत, त्यांचा सपशेल पराभव करा व आम्ही सांगीतल्याप्रमाणे फुलेशाहूआंबेडकरी ‘भुमिका’ स्पष्टपणे घेणार्‍या उपरोक्त चार उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांच्या भुमिकेला विजयी करा. सत्य की जय हो!.......  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this article:- 1) https://shrwandeore.blogspot.com/2020/11/132-bahujannama-elect-candidate-29nov20.html 2) https://deoreshrawan.blogspot.com/2020/11/132-bahujannama-elect-candidate-29-nov.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

Saturday, November 21, 2020

131 BahujanNama election Bhumika 22Nov20 Lokmanthan

बहुजननामा-131 ************** प्रा श्रावण देवरे भुमिका घेऊन ‘उभे’ राहा, म्हणजे समाज ‘आडवा’ होणार नाही!! (महाराष्ट्रात पद्वीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असून त्याबाबत OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc या कॅटेगिरींच्या वैचारिक भुमिकेबद्दल या लेखात चर्चा केली आहे, ती आपल्या वाचकांसाठी सादर करीत आहोत. ----- संपादकीय) -1- ‘सहकार हा एक उच्चवर्णियांचा गट आहे.....! लुटके लाओ, बाटके खाओ, हा त्यांचा कट आहे!!’’ ----- माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडेंच्या कवीतेतील दोन ओळी
डॉ. नारायणराव मुंडे उपाख्य दादा यांच्याशी चर्चा करीत असतांना त्यांनी एक अनुभव शेअर केला. त्यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील एक मित्र आमदार होते. ते ओबीसीमधील अतिअल्पसंख्यांक जातीतील होते. पवारसाहेबांचे पाठीराखे असल्यामुळे त्यांनी एक साखर कारखाना मिळविला. कारखान्याची परवानगी मिळविणे वेगळे आणी तो उभा करून चालवून दाखविणे वेगळे. प्रस्थापित व सत्ताधारी जातींसाठी ते फारसे कठीण नसते. हे आमदार महाशय अतिअल्पसंख्यांक व त्यात पुन्हा शूद्ध ओबीसी होते! जेथे तेली, माळी सारख्या बहुसंख्य (मोठ्या) ओबीसी जातीतील आमदार कारखाना काढण्याची हिम्मत करीत नाही, तेथे ओबीसीमधील अतिअल्पसंख्य असलेल्या नाभिक, धोबी, विणकर, कोष्टी जातीच्या आमदाराने कारखाना उभा करून चालवून दाखविला, हे खूप मोठे ‘जातीय आश्चर्यच’ म्हणावे लागेल. अर्थात याचे श्रेय त्या ओबीसी आमदारालाच दिले पाहिजे कारण त्यांनी अत्यंत चिकाटीने व सर्वस्व पणाला लावून कसाबसा कारखाना उभा केला व व्यवस्थीत चालूही केला. कारखान्याचे सभासद नोंद करतांना किमान 40 टक्के सभासद ओबीसी व दलित असतील याचीही काळजी त्यांनी घेतली. डॉ. नारायणराव मुंडेंच्या त्या ओबीसी-आमदार मित्राने सर्वस्व पणाला लावून 20-25 वर्षात कसाबसा कारखाना उभा केला आणी सुरू झाल्यावर एका वर्षाच्या आत कारखान्याच्या निवडणूका लागल्यात. त्या निवडणूकीत डॉ. मुंडे यांना मित्र म्हणून प्रचारासाठी बोलावले. पहिल्याच प्रचारसभेत डॉक्टरांनी ओबीसी चळवळ, दलित चळवळ, फुलेआंबेडकर सांगीतला व अतिअल्पसंख्य ओबीसी आमदाराच्या धारिष्ट्याचे कौतूकही केले. अशा जिगरबाज नेत्यालाच कारखान्याचा चेअरमन म्हणून निवडून द्या, असे आवाहनही डॉ. मुंडे यांनी केले. डॉ. मुंडेंच्या भाषणाने आमदारसाहेब अस्वस्थ झालेत. कसाबसा कार्यक्रम आटोपता घेऊन आमदार गाडीत बसले व डॉक्टरांनाही गाडीत बसण्यास सांगीतले. गाडी गावाबाहेर आल्यावर आमदार डॉ. मुंडेंना म्हणाले, ‘‘अहो! मुंडेदादा, ही बाबासाहेबांच्या जयंतीची सभा नव्हती! माझ्या कारखान्याच्या निवडणूकीची सभा होती. तुम्ही भाषणात ओबीसी-ओबीसी केले, तर सर्व पॅनलमधील प्रस्थापित मराठे एकत्र होतील व मला पराभूत करतील.’’ दादा हसले आणी ईशारा देत म्हणाले, ‘‘तुम्ही जर आपल्या लोकांना फुलेआंबेडकर सांगीतला नाही व चळवळही सांगीतली नाही, तर एक दिवस तुमचा कारखाना तुमच्या हातातून निघून जाईल व तुम्हाला कारखान्याच्या गेटवर जायलासुद्धा अपमान वाटेल.’’ दादासाहेब डॉ. नारायणराव मुंडेंनी दिलेला हा ईशारा लगेच खरा ठरला. आज हा कारखाना मराठ्यांच्या ताब्यात आहे व कारखान्याचे संस्थापक असलेले आमचे ओबीसी आमदार कारखान्याकडे फिरायला जाण्याचीही हिम्मत करीत नाहीत. -2- हे उदाहरण द्यायचे कारण असे की, निवडणूका या गल्लीतल्या असो की दिल्लीतल्या! प्रस्थापित क्षत्रिय(?) जातीच्या विरोधात बोलण्याची हिम्मत ना ओबीसी नेत्यांमध्ये असते, ना दलित नेत्यांमध्ये! त्यामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षात गुलामगिरीशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही. एरवी हे ओबीसी-दलित नेते प्रस्थापित जातींच्या विरोधात खाजगीत भरपूर बोलतील, 25-30 हजार रुपये मानधन घेऊन दलित-ओबीसी-भटके विचारवंत क्रांतिकारक भाषणे करतील. मात्र ऐन मोक्याच्या वेळी, निवडणूकांच्या काळात यांची अक्कल गहाण पडते. आता ताजे उदाहरण म्हणून विधान परीषदेच्या जाहिर झालेल्या पद्वीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकांचे बघा! OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc या कॅटेगिरींची 9 नोव्हेंबरला मुंबईत राष्ट्रीय मागासवर्गीय आरक्षण गोलमेज परिषद (पहीली) संपन्न झाल्यानंतर, नंतरच्या परीषदा या निवडणूका जाहिर झालेल्या मतदारसंघात झाल्या पाहिजेत, जेणे करून तेथील ओबीसी, एस्सी उमेदवाराला त्या परीषदेचा लाभ होईल, या उद्देशाने आम्ही अनेक ईच्छुक उमेदवारांना ही दुसरी परीषद घेण्यासाठी आग्रह केला. मात्र बर्‍याचजणांचा अशी भुमिका घेऊन निवडणूका लढण्यास विरोध होता. निवडणूकांच्या काळात प्रस्थापित जातींना उघडपणे विरोध केला, तर त्यांची मते मिळणार नाहीत व ते नाराज होतील. काही उमेदवार म्हणाले की, ‘‘आमचे बरेचसे मित्र मराठा आहेत, ब्राह्मण आहेत. त्यांना आम्ही नाराज करू ईच्छित नाहीत.’’ आम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला की, ‘‘हे तुमचे प्रस्थापित मित्र जेव्हा मराठा ओबीसीकरणाची भुमिका मांडतात, तेव्हा त्यांना तुमच्यासारख्या ओबीसी मित्रांच्या नाराज होण्याची भिती का वाटत नाही?’’ अर्थात हे सत्य आहे की, या प्रस्थापित जातींना दलित-ओबीसी मित्र नाराज होण्याची भिती अजिबात वाटत नाही, कारण या दलित-ओबीसी मित्रांची लाचारी ते गृहित धरूनच असतात. खरे म्हणजे ते एकमेकांचे मित्र नसतातच! मैत्रीच्या नावाने त्यांच्यात गुलाम-मालकाचेच नाते असते. असेच लाचार मैत्रीचे नाते ब्राह्मणांसोबतही असते. असे लाचार ओबीसी-दलित उमेदवार निवडूनभी आलेत तरी ते प्रस्थापितांच्या वाड्यावर पाणी भरण्याचेच काम करतात, याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मराठा ओबीसीकरणाचे विधेयक मंजूर होतांना अनुभवला. त्या काळात (म्हणजे 15 नोव्हेंबर 2018 ते 29 नोव्हेंबर 2018 या 15 दिवसात) आम्ही विधानसभेच्या व विधानपरीषदेच्या बर्‍याच दलित-आदिवासी-ओबीसी आमदारांना भेटलो व मराठा ओबीसीकरणाच्या विधयेकाच्या बाजूने मतदान करू नका, असे पटवून दिले. बर्‍याच आमदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या, निवेदनं दिलीत, टिव्हीवरून, प्रिंट मिडियावरून वारंवार आवाहन केले, आझाद मैदानावर आंदोलने केलीत. मात्र एवढे सर्व परिश्रम घेऊनही या सर्व दलित-ओबीसी-आदिवासी-भटक्याविमुक्त आमदारांनी 29 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा ओबीसीकरण करणार्‍या विधेयकाला एकमताने ‘‘जल्लोषात’’ मतदान केले व सच्च्या ओबीसी जातींच्या आरक्षणावर मरणाचा घाव घातला. ज्या जातीत आपला जन्म झाला, त्या जातीबद्दल यांना अजिबात चाड नाही. वैचारिक भुमिका न घेणारे कणाहीन ओबीसी नेते नेहमीच प्रस्थापित जातींसाठी ‘‘उभे’’ राहतात व आपल्या स्वतःच्या समाजाला ‘‘आडवा’’ पाडून खड्ड्यात घालतात. आता पद्वीधर व शिक्षक मतदारसंघातून एखादा ओबीसी वा दलित उमेदवार आमदार म्हणून निवडून आला, तर तो विधान परिषदेत जाऊन ओबीसींना खड्ड्यात घालण्याचेच काम करणार आहे. कारण
त्यांचे प्रस्थापित जातीतील मित्र नाराज होणार नाहीत, याची ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत असतात. शिक्षक मतदारसंघातील काही उमेदवार शिक्षणव्यवस्थेवर डझनभर भाषणे देत आहेत. परंतू शिक्षणव्यवस्थेतील जातीव्यवस्थेवर ते बोलणार नाहीत, कारण त्यांचे ब्राह्मण-मराठा मित्र नाराज होतील, अशी त्यांना भिती वाटते. असे शिक्षणतज्ञ लोक आमदार झाल्यावर प्रस्थापितांच्या वाड्यावर जाऊन मुजरा घालण्याचेच काम करतात. जोपर्यंत शिक्षणव्यवस्थेतील जातीयवाद नष्ट होणार नाही, तो पर्यंत शिक्षणाचे तत्वज्ञान कुचकामीच राहणार आहे. जो पर्यंत शिक्षणव्यवस्था शाहूराजे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव विचारे यासारख्या सत्यशोधकांच्या ताब्यात होती, तो पर्यंत शाळा-कॉलेजात अब्राह्मणी विचारसरणी जाणीवपूर्वक शिकविली जात होती. मात्र नंतर याच संस्था सरंजामदारांच्या ताब्यात गेल्यावर ते शिक्षणसम्राट बनलेत. या शिक्षणसम्राटांचे ‘गुरू’ सत्यशोधक न राहता ब्राह्मण-भटजी झालेत. परिणामी त्यांच्या शाळा-कॉलेजात शिवजयंतीऐवजी ‘‘गणपती-उत्सव’’ साजरे व्हायला लागलेत. शिक्षणक्षेत्रातील या सरंजामशाहीविरोधात व ब्राह्मणशाहीविरोधात बोलण्याची हिम्मत ज्या उमेदवारांमध्ये आहे, असे उमेदवार आम्ही शोधत आहोत. MPSC परीक्षा व नोकरभरती बंद पाडून लाखो पद्वीधारकांना नोकरीपासून वंचित करणार्‍या लोकांना धडा शिकविण्याची हिम्मत ज्या पद्वीधर उमेदवारामध्ये आहे, असाच उमेदवार आम्ही शोधतो आहोत. त्यासाठी दिलेला कृती-कार्यक्रम ‘‘भुमिका’’ म्हणून ज्यांना मान्य असेल, ते आमचे सच्चे मित्र असतील. पद्वीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातून उभे असलेले जे उमेदवार स्पष्टपणे सरंजामशाही व ब्राह्मशाहीच्याविरोधात भुमिका घेतील, त्यापैकी एक-एक सक्षम उमेदवार आम्ही जाहिर करणार आहोत. आम्ही समस्त संवैधानिक आरक्षणवादी (OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc) मतदारांना आवाहन करतो की, आम्ही जाहीर करीत असलेल्या दोन उमेदवारांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. ही दोन नावे कोणती, याबद्दलचे निवेदन आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. तो पर्यंत, जयजोती, जयभीम, इडा पिडा जाओ! बळीचं राज्य येवो!! सत्य की जय हो! (लेखनः 19 नोव्हेंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन, 22 नोव्हेंबर 2020------- -- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270 Links for this Article:- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/11/131-bahujannama-election-bhumika-22nov.html 2) Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/ ई मेलः- s.deore2012@gmail.com

Saturday, November 14, 2020

130 Bahujannama Divali 15Nov20 Lokmanthan

बहुजननामा-130 दिवाळीः हिंदूंची व वैदिकांची!! आमच्या आजच्या सांस्कृतिक संघर्षाचे प्रेरणास्थान असलेले दोन राजे आहेत. एक ‘महासम्राट बळीराजा’ व दुसरा ‘छत्रपती शिवाजी राजा’! या दोघांचा सांस्कृतिक संघर्ष प्रा. श्रावण देवरे यांनी एका पुस्तकाद्वारे मांडलेला आहे. हे पुस्तक तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या स्मृतीदिनी 28 नोव्हेंबर 2020 रोजी ‘अखिल भारतीय ओबीसी महासभेतर्फे’ त्यांच्या पहिल्या अधिवेशनात प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकातील एक प्रकरण बलीप्रतिपदेच्या निमित्ताने आपल्या वाचकांसाठी देत आहोत----- संपादकीय -1- हिंदू कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी बलीप्रतिपदा दाखविलेली असते. दिवाळीच्या पूर्ण आठवड्यात आपण गायगोरस-बारस, धनतेरस म्हणजे धनाच्या लक्ष्मीच्या पूजेचा दिवस साजरा करतो. नरक चतुर्थी व दिवाळीही साजरी करतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी येणारा भाऊबीजेचा दिवसही साजरा करतो. मात्र ज्याच्या बलीदानाने हे सर्व घडले त्या बळीराजाची बलीप्रतिपदा मात्र साजरी करीत नाहीत.
भालदेव म्हणजे बलीदेव आणि बळीदेव म्हणजे बळीराजा होय. आजही ग्रामीण भागात दिवाळी-दसर्‍याच्या सणांमध्ये आमच्या आया-बहिणी आपल्या नातेवाईक पुरूषांना ओवाळतांना मोठ्या प्रेमाने म्हणतात, ‘ईडापीडा जाओ, आणि बळीचं राज्य येवो!’. पाच हजार वर्षांनंतरही बळीच्या राज्याची मागणी होत आहे. आजही शेतकर्‍याला बळीराजा म्हटले जाते. तसेच बळीराजा म्हणजे शेतकर्‍यांचा राजा असे म्हटले जाते. पाच हजार वर्षानंतरही ज्या बळीराजाची आठवण आम्ही आजही करतो, बळीचं राज्य नवखंडांचं! अफगाणीस्थानच्या बलुचीस्थानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत म्हणजे पूर्ण अशिया खंडच समझा! ईशान्येकडील राज्यांना बालेय प्रदेश म्हटले जाते. म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले भारत खंडाला बलीस्थान म्हणतात. पृथ्वीतलावरचा हा पहिला सम्राट, पहिला चक्रवर्ती, पहिला राजर्षी आणि पहीला छत्रपतीसुद्धा! कारण पाच हजार वर्षांपुर्वी पृथ्वीतलावर कोणत्याही भागात सुशासित राज्य स्थापन करण्याइतपत प्रगती केलेला माणूस अस्तित्वात नव्हता. पृथ्वीवर जेथे जेथे मानवी वस्ती होती, ती रानटी अवस्थेतील मानवांचीच होती. भारतात मात्र सहा हजार वर्षांपूर्वीच सिंधू संस्कृती जन्माला आली होती. आपण चौथ्या इयत्तेतील इतिहासाचं पुस्तक वाचलंच असेल, त्यातील एका पानावर मोहेंजोदडो व हडप्पा या दोन शहरांची चित्रं दिसतात. ही दोन्ही गावे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या भरभराटीची साक्ष देतात! सिंधू नदीच्या खोर्‍यात फुललेली-बहरलेली ही संस्कृती होती. इतिहास काळात कधीतरी जमिनीत गाडली गेलेली. ही शहरे आधुनिक शहरांसारखीच आहेत. बळीराजा हा अशा प्रगत सिंधू संस्कृतीचा वारसदार होय. सिंधू संस्कृतीची संस्थापक निऋति होय. तीने हाताच्या साहाय्याने शेती करण्याचे तंत्र शोधून काढले. त्यानंतर बळीच्या राज्यात शेतीचे तंत्र विकसित झाले. बळीराजा हा आपल्या प्रगत शेती तंत्राचा व कृषी संस्कृतीचा प्रचारक होता. नांगराच्या व बैलाच्या साहाय्याने शेती करण्याचे नवे तंत्र बळीराज्यात शोधले गेले. त्यामुळे शेतीचा विस्तार झाला व उत्पादनही शेकडो पटीने वाढले. ज्या ज्या रानटी मानव समुहांनी हे प्रगत तंत्र स्वीकारले त्यांचा विकास झाला. त्यांनी स्वतःहूनच बळीराजाला आपला राजा मानलं. त्यामुळे बळीराजाला राज्याचा विस्तार करण्यासाठी कधीच युद्ध करावं लागलं नाही. बैल या प्राण्याची पूजा ‘नंदी’ म्हणून होऊ लागली. त्याकाळच्या आदिवासी नायक असलेल्या महादेवाने आपले वाहन म्हणून ‘नंदी-बैल’चा स्वीकार केला, कारण बैल हा नव्या क्रांतीचा ‘सहनायक’ होता. आताच्या आशिया खंडाच्या आकाराएवढे बळीचं राज्य! मात्र तरीही या राज्यात कायदा व सुव्यवस्था अगदी उत्तम होती. आज जगातल्या सगळ्या देशांमध्ये शासन-प्रशासनाची जशी रचना आपणास दिसते अगदी तशीच किंवा त्यापेक्षाही सरस व कार्यक्षम शासन-प्रशासनव्यवस्था बळीने आपल्या राज्यात निर्माण केलेली होती. बलीस्थानचे नऊ खंड होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा या नावाने ओळखले जात होते. म्हणजे ज्याप्रमाणे भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसारखे राज्य आहेत, त्याप्रमाणे बळीच्या राज्यातही खंड (राज्य) होते. राज्याचा प्रमूख मुख्यमंत्री, तसा खंडाचा प्रमुख खंडोबा! आजचे आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या बलिस्थानातील महाराष्ट्राचे खंडोबा होय! राज्यात जसे जिल्हे असतात तसे बलीस्थानातील प्रत्येक खंडात अनेक जिल्हे असायचे व जिल्ह्याच्या प्रमुखाला जोतिबा म्हणायचे! म्हणजे आजचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय संजय यादव हे बलीस्थानातील महाराष्ट्र खंडाच्या धुळे जिल्ह्याचे जोतीबा होत. आज प्रशासकीय सोयीसाठी तीन चार जिल्हे मिळून एक महसूल विभाग तयार केला जातो. उदाहरणार्थ, आपला नाशिक महसूल विभाग घ्या. धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर व नाशिक अशा पाच जिल्ह्यांचा मिळून नाशिक महसूल विभाग तयार केलेला आहे. तसे बळीच्या बलीस्थानात महसूल विभाग होते. त्यांना महासुभा म्हणत व त्याच्या प्रमुखाला महासुभेदार म्हणत. या शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हसोबा झाला. आज आपल्या नाशिक महसूल विभागाचे प्रमुख (आयुक्त) माननीय राधाकृष्ण गमे हे आपल्या बलीस्थानातील नाशिक महसूल विभागाचे म्हसोबा आहेत. या प्रमाणे बलीस्थानात मल्हारी, भैरव असे काही दरबारी मंत्री व प्रशासकीय अधिकारी होते. हे सर्व मंत्री व अधिकारी इतके प्रामाणिक व कर्तव्यदक्ष होते की लोक त्यांना देव मानू लागले. आजही आपला बहुजन समाज जोतीबा, खंडोबा, मल्हार या दैवतांची पुजा करतात. पाच हजार वर्षांपूर्वी इतकी प्रगत समाजव्यवस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. बळीराष्ट्र इतके प्रगत होते. याचा आपल्याला अभिमान असला पाहीजे. बळीच्या राज्यात स्त्रियांना समान अधिकार होते. कारण बळीचं राज्य हे विंध्यावली राणीचं मातृवंशसत्ताक राज्य होते. तिने बळीशी लग्न केलं म्हणून बळी या राज्याचा राजा झाला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे आता जगभरचे शास्त्रज्ञ मान्य करतात. भारतखंडात शेतीचा शोध सर्वप्रथम सिंधू नदीच्या खोर्‍यातील स्त्रियांनी लावला. -2- वामनाने बळीराजाचा कपटाने खून केला, तो दिवस होता अश्विन शूद्ध दशमीचा! तेव्हापासून आर्यांनी हा विजयोत्सव ‘दसरा’ म्हणून साजरा करायला सुरूवात केली. दसर्‍याला बळीराजाचा खून झाल्यावर संध्याकाळी बाणासुराने आपल्या प्रजेची कशीबशी समजूत घालीत तीला शांत केलं. आपला बळीराजा आपल्याला 21 दिवसांनी पुन्हा भेटायला येणार आहे, असे सांगून प्रजेच्या मनात बळीराजा परत येईल, अशी आशा जागवली. दसर्‍यापासून तो एकविसावा दिवस म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ होय! आमच्यासारखे काही मूठभर फुलेआंबेडकरवादी गेल्या 20 वर्षांपासून बळीप्रतिपदा साजरी करायला लागलेत. त्याची धास्ती बामनवाद्यांनी घेतली आहे. बामनवाद्यांनी आता बळिप्रतिपदेच्याच दिवशी ‘पहाट-पाडवा’ नावाचा सनातनी कार्यक्रम सुरू केला आहे व आमचे बहुजन म्हणविणारे नगरसेवक-आमदार वगैरे राजकारणी लोक पैसे देऊन या सनातनी कार्यक्रमात समील होत असतात. या बहुजन राजकारण्यांना बलीप्रतिपदा साजरी करायला सांगीतली, तर त्यांची नानी मरते, नालायकांची! अश्विन वद्य दशमीस बळीराजाचा खून केल्यानंतर वामन व त्याच्या सैन्याने राज्यात हाहाःकार माजल्याची संधी साधली व प्रचंड लुटमार केली. ही लूटलेली संपत्ती घेऊन वामन आपल्या घरी परतला,
तेव्हा त्याच्या बायकोने कणकेचा बळीराजा बनवून घराच्या उंबरठ्यावर ठेवला. वामनाने त्या कणकेच्या बळीच्या पोटात पुन्हा तोच सुरा खुपसला व घरात प्रवेश केला. आपल्या नवर्‍याने महापराक्रमी असलेल्या बळीला मारले व संपत्ती लुटून आणली या आनंदाने तीने नवर्‍याला ओवाळले. तेव्हापासून दसर्‍याच्या दिवशी प्रत्येक आर्य-ब्राम्हणांच्या घरात बळीराजाचा खून केला जातो. मात्र बळीराजावर प्रेम करणारी जनता याच दिवशी ‘बळीचे राज्य येऊ दे’ असा आक्रोश करते. या दोन्ही परस्परविरोधी घटना एकाच दिवशी म्हणजे दसर्‍यालाच घडतात. या केवळ दोन विरोधी घटना नाहीत तर, दोन संस्कृतीमधला संघर्ष आहे. रणांगणावरच्या युद्धात आर्यलोक कधीच जिंकले नाहीत. मात्र आपण बहुजन नेहमीच इतिहासाच्या पानांवर पराभूत होत असतो. इतिहास निर्माण करीत असतांना तो लेखीस्वरूपात नोंदही करून ठेवायचा असतो. आम्ही शूद्रातिअतिशूद्रातील बुद्धीजीवी पोटभरू आहोत, त्यामुळे आम्ही पोटापुरते लिहीतो व बोलतो. त्याच्याने तुमचे पोट भरत असेल, मात्र तुमच्या पुढच्या अनेक पिढ्या तुम्ही दुःख दारिद्र्याच्या खाईत लोटतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही काहीच लिहीत नाहीत व बोलतही नाहीत. धन्यवाद! इडा पिडा जाओ! बळीचं राज्य येवो!! सत्य की जय हो! (लेखनः 07 नोव्हेंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 08 नोव्हेंबर 2020------- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270

Monday, November 9, 2020

129 BahujanNama ScStObc 8Nov20 Lokmanthan

बहुजननामा-129 आता संघर्ष पुढच्या टप्प्यावर... Sc+St+Obcआरक्षण परीषद मुंबईत संपन्न !! -1- आज घडीला देशात आरक्षणाच्या चार कॅटेगिरीज संवैधानिक बनलेल्या आहेत. एस्सी, एस्टी व ओबीसी या तीन कॅटिगिरीज संविधान निर्मिती करतांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आहेत. राज्यघटनेच्या 15 (4), 16 (4), 340, 341, 342 यासारख्या कलमांमधून त्यांनी या तीन कॅटेगिरीज संवैधानिकदृष्ट्या मजबूत केलेल्या आहेत. 7 जानेवारी 2019 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पार्लमेंट चालली ती केवळ आरक्षणाची चौथी Economical Weaker Section(EWS) कॅटेगिरी निर्माण करण्यासाठी! आजवर जे समाजघटक आरक्षणाच्या कोणत्याही कॅटेगिरीत आलेले नाहीत, त्या समाजघटकातील गरीब घटकासाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद करणारी घटनादुरूस्तीझाली व तसा कायदाही अस्तित्वात आला. आता ही घटनादुरूस्ती घटनासंमत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी सुप्रिम कोर्टात पिटीशन दाखल झालेल्या आहेत. या घटनादुरूस्तीला व त्यावर आधारित 10 टक्के आरक्षणाच्या कायद्याला सुप्रिम कोर्टाने स्टे दिलेला नाही. त्यामुळे आज ही चौथी कॅटेगिरी अस्तित्वात आहे व कार्यरतही आहे.
संविधाननिर्मिती होत असतांना समर्थन-विरोध करीत, साधक-बाधक चर्चा करीत सर्वसंमतीनेSc+St+Obc या तीन कॅटेगिरीज अस्तित्वात आल्यात. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशद केलेली वर्ण-जातीय सामाजिक शोषणाची भुमिका घटनासमितीने व नंतर देशाने मान्य केली. परंतू चौथीEWS कॅटेगिरीही आरक्षणाचीच आहे म्हणून त्या कॅटेगिरीत येणार्यास जाती या आरक्षणाच्या मूळ सामाजिक भुमिकेप्रमाणे शोषित ठरत नाहीत. कारण त्यांना मिळालेले आरक्षण हे निव्वळ आर्थिक निकषावरचे आहे. बरं हे आर्थिक निकष आर्थिक-गरीबीचे आहेत, आर्थिक-शोषणाचे नाहीत. म्हणूनच या आरक्षणाला पात्र असलेल्या व्यक्तींच्या समुहाला वर्ग वा जात (Classes or Castes) म्हटले गेले नाही, तर विभाग (Section) म्हटलेले आहे. सामाजिक शोषण झालेल्या समुहाला आरक्षण देतांना स्पष्टपणे जात वा वर्ग म्हटले गेले आहे. शेड्युल कास्ट व शेड्युल ट्राईब्ज या दोन सूचींमध्ये स्पष्टपणे जाती व जमातींचा उल्लेख आहे. 340 व्या कलमात वर्गांचा उल्लेख आहे. वर्गांचा उल्लेख करतांना सामाजिक व शैक्षणिक मागासलेले असा स्पष्ट उल्लेख आहे, त्यामुळे बाबासाहेबांच्या मतानुसार हे वर्ग म्हणजे जातींचेच पुंजके होत.Sc, St, OBC या तीन कॅटेगिरींचे आरक्षण वर्णीय-जातीय समाजिक शोषण नष्ट करण्यासाठी आहे व ते या समाजघटकांना शासन-प्रशासनात निर्णय-अमलबजावणीमध्ये संख्येप्रमाणे प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे. EWS कॅटेगिरीचे आरक्षण देतांना असा कोणताही सामाजिक शोषणाचा मुद्दा नाही व प्रतिनिधित्वाचाही मुद्दा नाही. मग, EWS कॅटेगिरीचे आरक्षण आर्थिक शोषणावर आधारित आहे काय? तर ते तसे स्पष्ट नाही आहे. वर्ग वा क्लास अशी संकल्पना या आरक्षणाच्या व्याख्येत नाही. उच्च वर्ण-जातीतील (ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य व तत्सम) एक सेक्शन जो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, तो गरीब का आहे? त्याचं शोषण झालं म्हणून का? तो उच्चजातीय असल्यामुळे त्याचं सामाजिक शोषण होणे शक्य नाही. मग आर्थिक शोषण झालं का? कारण गरीबीची अनेक प्रासंगिक-नैसर्गिक कारणेही असतात तशी व्यक्तिगत कारणेही असू शकतात. भूकंप, करोना, दुष्काळ वगैरेसारखी ‘‘ऍक्ट ऑफ गॉड’’ कारणीभूत असू शकतात. एखादी व्यक्ती कर्जबाजारी होते, त्यामुळेही ती गरीब होउ शकते. एखाद्या व्यक्तीला दारू, तमाशा, जुगाराचे व्यसन लागले तर तो गरीब होऊ शकतो. -2- जनता गरीब होण्याचे सर्वात मोठे कारण शासकीय धोरणेच असतात. साधनांचे, संधींचे व जमिनीचे केंद्रीकरण करण्यास प्रोत्साहन देणारी खाऊजासारखी धोरणे जगभर गरीबांच्या संख्येत भर टाकत आहेत. त्यावर आरक्षणसारख्या तुटपुंज्या सोयी-सवलतींची मलमपट्टी करणे म्हणजे गरीबांची फसवणूक करण्यासारखे आहे. खाउजा सारख्या आर्थिक धोरणांमुळे गरीबांची संख्या व गरीबीचे प्रमाणही वाढत असेल तर तो ‘वर्गकलह’ समजला पाहिजे, ‘जातीकलह’ नव्हे. मात्र भारतातील उच्चजातीय सत्ताधारी व त्यांचा गुलाम मिडिया सतत प्रचार करीत असतो की, ‘देशातील सर्व समस्या या आरक्षण धोरणातून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून EWS कॅटेगिरीचे आरक्षण देण्यात आले’, असे सांगण्यात येते. आग रामेश्वरी आणी बंब सोमेश्वरी, असा हा आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे. आर्थिक शोषणातून आलेली गरीबी हटविण्यासाठी पूर्वी किमान ‘बँकांचं राष्ट्रीयकरण’ करण्यासारखे तकलादू उपाय तरी योजले जात होते. आता तेही खाजगीकरणाच्या माध्यमातून रद्द केले जात आहेत. नोकरकपात, वेतनकपात, हक्क व सवलतीकपात असे अनेक कामगारविरोधी व शेतकरीविरोधी धोरणे राबवून गरीबी वाढवली जात आहे व तीच्यावर उपाय म्हणून EWS कॅटेगिरीचे आरक्षणही दिले जाते आहे. ही दिशाभूल आहे.EWS कॅटेगिरीचे आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की, गरीबीवर हा उपाय नाही. गरीबीचे मूळ कारण सत्ता, संपत्ती, साधने, संधी व सीता (म्हणजे जमिन) यांचे केंद्रीकरण हे आहे. म्हणजेचएस-फाइव्ह. जोपर्यंत या S-5चे विकेंद्रीकरण जातनिहाय व वर्गनिहाय होत नाही, तोपर्यंत गरीबीचे मूळ कारण असलेली जातीव्यवस्थाही नष्ट होत नाही व वर्गव्यवस्थाही नष्ट होत नाही. केवळ खाऊजासारख्या आर्थिक धोरणातून गरीबी वाढवली जात आहे असे नाही, तर एकूणच एस्सी, एस्टी व ओबीसी या तीन कॅटिगिरीजचे संवैधानिक आरक्षण कपात केले जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या बजेटमधील आर्थिक निधींची कपात सुरू आहे. शैक्षणिक व इतर सुविधा काढून घेतल्या जात आहेत. हे संकट केवळ जातीय नाही तर वर्गीयसुद्धा आहे. अशा वेळी जातींच्या व वर्गांच्या वेगवेगळ्या कॅटेगिरींनी वेगवेगळे लढणे उपयोगाचे नाही. एस्सी, एस्टी व ओबीसी या तीनही संवैधानिक कॅटिगिरीजमधील जनतेने किसान-मजदूर वर्गाला सोबत घेऊन वर्ण-जात-वर्गविरोधी लढा उभारणे गरजेचे आहे. -3- आज भारतात काय चित्र दिसत आहे? ओबीसी आपले आरक्षण वाचविण्यासाठी व जनगणनेसाठी स्वतंत्रपणे लढत आहेत. एस्सी कॅटेगिरी हाथरससारख्या जातीय अत्याचाराविरोधात स्वतंत्रपणे लढते आहे. आदिवासी कॅटिगिरी आपली जंगल-जमिन वाचविण्यासाठी स्वतंत्र लढा देत आहे. ओबीसींच्या लढ्यात एस्सी-एस्टी जात नाहीत, व आदिवासींच्या लढ्यात एस्सी-ओबीसी जात नाहीत. किसान-मजदूरांच्या लढ्याशी एस्सी, एस्टी व ओबीसींना काही घेणे-देणे नाही. मात्र सत्ताधारी जात-वर्ग एकजूटीत आहेत. ओबीसींचे आरक्षण घुसखोरी करून नष्ट करण्यावर ब्राह्मण-क्षत्रिय-सरंजामजातीमध्ये एकमत आहे. हाथरस पिडितेच्या विरोधात बलात्कारी सवर्ण मुलांना संरक्षण देण्यासाठी ब्राह्मण व सामंती-क्षत्रिय जातीत एकजूट आहे. मात्र आम्ही आपसात भांडण करण्यात मश्गूल आहोत. आरक्षणाच्या वाटा-हिस्स्यावरून आम्ही आपसातच लढत आहोत. मात्र जातनिहाय जनगणना करायला लावून त्यातून मिळालेल्या आकडेवारीवर आधरित आरक्षणाचे फेरवाटप व वर्गीकरण करणे सोपे जाईल, असे सांगीतले तर ते कोणी ऐकायला तयार नाही. आज जातनिहाय जनगणनेसाठी फक्त ओबीसीच लढतो आहे. जातनिहाय जनगणाना केवळ ओबीसींच्या हितासाठी नाही, तर एकूणच जातीव्यवस्थेचं कंबरडं मोडण्यासाठी आवश्यक आहे. कोणतीही व्यवस्था नष्ट करायची असेलत तर तीचा आर्थिक कणा मोडल्याशिवाय ती नष्ट होत नाही. जातनिहाय जनगननेतून जी आकडेवारी व डेटा मिळेल, त्यातूनच जातीव्यवस्थेचं अर्थशास्त्र निर्माण करता येईल व जातअंताचे धोरण ठरविता येईल. यास्तव केवळ आरक्षण व सोयीसवलती वाचविण्यासाठीच नव्हे तर जातनिहाय जनगननेसाठीसुद्धा आपण सर्व एस्सी, एस्टी व ओबीसी जनतेने एकत्र आले पाहिजे. केवळ इश्यु-बेस्ड लढे न करता मूलभूत पायालाच हात घालनारे लढे हाती घेतले पाहिजे. या नव्या मांडणीसाठी व बांधणीसाठी उद्या दिनांक 9 नोव्हेंबर सोमवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावरील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात एक दिवसाची एस्सी, एस्टी व ओबीसी आरक्षण गोलमेज परिषद (पहिली) आयोजित केली आहे. एस्सी, एस्टी व ओबीसी चळवळीत काम करणारे निवडक अभ्यासक, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा संपन्न होत आहे. ही चर्चा व त्यात ठरणारे कृती कार्यक्रम याबद्दल आपण पुढील बहुजननामात वाचू या! तुर्त येथेच थांबू या! पुढील मुद्दे पुढील बहुजननामात!! सत्य की जय हो! (लेखनः 07नोव्हेंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 08नोव्हेंबर2020) --------------- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270 Link for this article https://shrwandeore.blogspot.com/2020/11/129-bahujannama-scstobc-8nov20.html ई मेलः- s.deore2012@gmail.com Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/

Sunday, November 1, 2020

128 BahujanNama Buddhiman 1 Nov 20 Lokmanthan

बहुजननामा-128 बुद्धिमंतांनो ! बाहेर पडा आणी तोंड उघडा !! -1- झी-24 तासचे एंकर आशिष जाधव यांनी परवाच्या म्हणजे 28 ऑक्टो 20 च्या रोखठोख कार्यक्रमात मराठा आरक्षणावर चर्चा घेतली. या चर्चेत त्यांनी प्रवीणदादा गायकवाडांना अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. ‘‘प्रवीणदादा तुम्ही मराठा समाजाच्या ईडब्ल्युएसकरणाची भुमिका मांडत आहात. परंतू मराठा समाजाचा एकही नेता तुम्हाला पाठींबा द्यायला तयार नाही, असे का?’’ आता ही वस्तुस्थीती आहे की, प्रवीण गायकवाड हे मराठा समाजात एकटे पडलेले आहेत. त्यांच्या सामंजस्याच्या भुमिकेला कुणीही नेता पाठींबा द्यायला तयार नाही. नेत्यांचं जावू द्या, ते तर राजकीय स्वार्थाने प्रेरीत असतात, त्यांना जातीच्या हितापेक्षा व्यक्तीगत स्वार्थाची पडलेली असते. त्यांना पक्षाने दिलेली आमदारकी-खासदारकी टिकवायची असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाने सांगीतलेली ‘ओबीसी-मराठा भांडण वाढविण्याची भुमिका’ पार पाडावीच लागते. मात्र प्रवीणदादा गायकवाड यांना कोणत्याही आमदारकी-खासदारकीचा हव्यास नाही. ते दलित-मराठा-ओबीसी मध्ये सख्य सांधण्याची भुमिका मांडतात व त्यातही मराठा समाजाला टिकाऊ व मजबूत आरक्षण कसे मिळू शकते, हेही ते सिद्ध करतात. तरीही मराठा जातीतील विचारवंत, बुद्धिमान म्हणविणारे लोक प्रवीण गायकवाडांच्या भुमिकेवर काहीही बोलायला तयार नाहीत. प्रवीण गायकवाडांची भुमिका चूक असेल तर चूक सांगा, बरोबर असेल तर बरोबर सांगा. तोंडात गुळणी धरून बसू नका. प्रविणदादा हे काही सर्वसामान्य कार्यकर्ते नाहीत. मराठा आरक्षणाची चळवळच मुळात त्यांच्यापासून सुरू झालेली आहे. अर्थात यात मी माननीय पुरूषोत्तम खेडेकरांचं श्रेय नाकारीत नाही. खेडेकरांच्या संघटन-कौशल्यापुढे व विचार-सामर्थ्यापुढे तत्कालीन मराठेच काय दलित-ओबीसीसुद्धा नतमस्तक झाले होते. विदर्भातले तिरळे-कुणबी असूनही खेडेकरसाहेबांना मराठा-नेतृत्व म्हणून मान्य करणे, हा सुद्धा एक धाडसाचा प्रयोग होता. हे धाडस प्रवीणदादा, श्रीमंत कोकाटेंसारख्या मराठा तरूणांनी दाखविले व ब्राह्मणवादाला धडकी भरण्याइतपत मोठे संघटन उभे केले, हे या मराठा तरूणांचे श्रेयही नाकारून चालणार नाही. -2- मराठा समाजाला आरक्षणवादी बनविणे, हे काम अत्यंत जिकीरीचे, कष्टाचे व डोकेफोड होते. सत्तेची गुर्मी, क्षत्रियत्वाची बाधा आणी त्यात पुन्हा ब्राह्मणवादाची चेटकीण या दुहेरी-तिहेरी जंजाळात
अडकलेल्या मराठा समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून व भांडारकर-तोडफोडसारख्या आक्रमक कार्यक्रमातून धक्क्यावर धक्के द्यावे लागले. वीजेचे शॉक द्यावेत त्याप्रमाणे ब्राह्मणवादाला झटके देऊन मराठा समाजाला फुले-शाहू-आंबेडकरवादाकडे आणावे लागले. हे काम म्हणजे महाकाय डोंगराला भूईसपाट करण्यासारखे होते. दाभोळकर, पानसरेंसारख्या दिग्गजांचे खून पडत असतांना जीवावर उदार होऊन गायकवाड-कोकाटेसारखे मराठा तरूण ब्राह्मण-धर्माविरोधात शिवधर्माचे काम उभे करीत होते. हेच काम आम्ही ओबीसींमध्ये करीत असल्याने आम्हाला या मराठा तरूणांच्या साहसाची व तळमळीची पूर्ण जाणीव आहे व कदरही आहे. हे माझे म्हणणे काही अंशी तुम्हाला अतिशयोक्त वाटेल. परंतू आठवा तो काळ 1981-82चा! या काळात संघ-भाजपाने आण्णा पाटलांना पुढे करून मराठा महासंघ स्थापन केला व संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर सभा घेऊन मंडल आयोगाविरोधात व ओबीसी-जातींच्या विरोधात अक्षरशः महाराष्ट्र पेटविण्याची भाषा केली होती. आठवा तो 1988-89 चा काळ! दैनिक लोकसत्ताच्या समाजवादी ब्राह्मण संपादकाने मराठा समाजाला चिथावणी दिली आणी मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली शशीकांत पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘‘रिडल्स’’ ग्रंथाची जाहीर होळी केली. मराठा समाजाने महाराष्ट्रभर दंगली-सदृश्य परिस्थिती निर्माण केली होती. त्याकाळीही प्रचंड मोर्चे व प्रतिमोर्चे काढले गेलेत. अशा हिंसक, जातीयवादी व ब्राह्मण्यग्रस्त मराठा नेत्यांच्या पार्श्वभुमीवर माननीय पुरूषोत्तम खेडेकरसाहेबांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा ‘मराठा सेवा संघ’ स्थापन केला, आणी त्याचे जंगी स्वागत दलित-ओबीसींनी केले. बामसेफ, ओबीसी सेवा संघ व मराठा सेवा संघ यांचे संयुक्तपणे कितीतरी प्रबोधनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झालेत. प्रवीणदादाच्या नेतृत्वाखाली ‘संभाजी ब्रिगेडची’ स्थापना झाली व जेम्सलेनविरोधी, पुरंदरेविरोधी, भांडारकर-फोड, गडकरी पुतळा-तोड, दादू कोंडदेव पुतळा-उखाड यासारखी आक्रमक आंदोलने घेण्यात आलीत. याच आक्रमक आंदोलनांमुळे मराठा समाज जागृत झाला व आज आरक्षण मागायला पात्र झाला. त्यापूर्वी मराठा समाज ब्राह्मणांच्या नादी लागून ‘आरक्षणविरोधीच’ झालेला होता. संभाजी ब्रिगेडच्या या कार्यक्रमांमुळे मराठा समाज पुरोगामी वळणाला लागला. यामुळे मराठा समाजातून विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी, व्याख्याते निर्माण होण्याची साखळीच तयार झाली. मा.म. देशमूख व डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्या काळात अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घातला. -3- परंतू मराठा, ओबीसी व दलितांच्या या संयुक्त सामाजिक संसाराला दोन ब्राह्मण पेशव्यांची दृष्ट लागली आणी उभा महाराष्ट्र विस्कळीत झालेला आज आपण पाहात आहोत. फुले शाहू आंबेडकरी विचारांकडे जाणारा मराठा समाज आज अचानक ‘यु-टर्न’ घेऊन पुन्हा संघ-भाजपाच्या आहारी गेलेला आहे. मराठा समाजातील गायकवाड-कोकाटेंसारख्या पुरोगामी तरूणांनी मराठा आरक्षण चळवळ उभी केली आणी आज ही चळवळ पेशव्यांनी हायजॅक केली आहे. भोसले-मेटे त्रिकूटाला खासदारकी-आमदारकी देऊन खांद्यावर बसवून घेतले आहे. हे त्रिकूट संघ-भाजपाच्या खांद्यावर बसून मराठा आरक्षणाची चळवळ ब्राह्मणवादाच्या घशात घालत आहेत. मराठा आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरत आहेत व दंगली-सदृश्य हिंसक वातावरण निर्माण करीत आहेत. मनुवादी मिडीया ‘‘मराठा-फोबीया’’ निर्माण करीत आहे. या गंभीर समस्येच्या काळात केवळ मराठा समाजातीलच नव्हेत तर दलित-ओबीसी कॅटेगिरीतील भलेभले विद्वान कोमात गेल्यासारखे सूम्म झाले आहेत. काय बरोबर आहे व काय चूक आहे, हे सर्व त्यांना स्पष्टपणे दिसत असूनही एक शब्द यांच्या तोंडातून निघत नाही. ही कोणती दहशत काम करते आहे? न्यायमुर्ती पी. बी. सावंत, न्यायमुर्ती बी. जी. कोळसेपाटील, मा. म. देशमुख, डॉ. आ. ह. साळुंखे, श्रीमंत कोकाटे, व्याख्याते बनबरे, हलकारे असे असंख्य विद्वान आज संकटकाळात कुठे लपून बसले आहेत, हे कळायला मार्ग नाही. ओबीसींमधले हरि नरके, कोत्तापल्ले! दलितांमधले खोब्रागडे, मच्छिंद्र सकटे, पोळके! भटक्यांमधले दोघे लक्ष्मण, माने, गायकवाड, अंधारे! मुसलमानातले आय.पी.एस. मुश्रीप, इनामदार, अजीज नदाफ हे कोणत्या फोबीयाला बळी पडलेले आहेत? ही कोणती दहशत काम करीत आहे? एरवी शांततेच्या काळात व सुगीच्या दिवसांमध्ये हेच विचारवंत-बुद्धीमान शेकड्याने व्याख्याने देत फिरतात. पत्रकार परिषदा घेऊन शासनाला कडक ईशारे देण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. मग आता काय लकवा मारला गेला की काय यांना? आज प्रवीण गायकवाडसारखा एकमेव नेता संघभाजपाच्या दहशतीला झुगारून उघडपणे भुमिका घेतो आहे व ओबीसी-मराठा-दलित सख्य सांधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला साधा सपोर्ट देण्यासाठी तरी बीळातून बाहेर या! तुमची मूक-संमती हीच संघभाजपाची फार मोठी ताकद बनलेली आहे. त्यामुळे संघभाजपाचे लोक उघडपणे मराठा नेत्यांना चिथावणी देउन परीक्षा बंद पाडणे, नोकरभरती बंद पाडणे यासारखी बेकायदेशीर कृत्ये करीत आहेत व बेरोजगारीची विषारी फळे महाराष्ट्रातील करोडो तरूणांना भोगावी लागत आहेत. मुख्यमंत्री हतबल होउन यांच्या झुंडशाहीला बळी पडत आहेत. विचारवंतांनो! तुमच्यासारखे बुद्धीचे प्रखर सुर्य अंधारात लपून बसल्यामुळे काजव्याचीही लायकी नसलेले लोक आपली बे-अक्कल पाजळतांना दिसत आहेत. तुम्ही चुप्पी साधल्यामुळे लायकी नसलेले लोक वाटेल ते बरळत आहेत व समाजाचे स्वास्थ्य बिघडवीत आहेत. कोणी तलवार काढण्याची भाषा करतांना दिसतो आहे, ‘‘आम्हाला नाही, तर कोणालाच मिळू देणार नाही’’, अशी मद्यधुंद बडबड दुसरा कोणीतरी ‘बिनडोक’ करतांना दिसतो आहे. अशा परिस्थितीत या विचारवंतांनी किमान एकदा तरी बाहेर यावे व पत्रकार परिषद घेऊन ‘जे चालले आहे ते चूकीचे चालले आहे’ एवढे तरी म्हणण्याची हिम्मत दाखवावी. औरंगाबदहून मराठा समाजातील अविनाश खापे, मुंबईतून बंजारा समाजातील अनिल राठोड, सातारा-कराडमधून नाभिक समाजाचे संपतराव पवार यांच्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आपापल्या जातीच्या चूकलेल्या नेत्यांना जाहीरपणे जाब विचारत आहेत. आणी तुम्ही सगळे दिग्गज म्हणविणारे बुद्धिमान मेंदूला कडी-कुलूप लावून घरात बसलेले आहेत. थोडी हिम्मत करा, बाहेर निघा, मुंबईत या, पत्रकार परिषद घ्या, भुमिका मांडून समाजाला मार्गदर्शन करा, हतबल झालेल्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांत्वन करा, त्यांना धीर द्या. राज्यपालांना भेटा, पवारसाहेबांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. शांततेच्या काळात प्रसिद्धीच्या झोतात वावरतांना गुदगुदल्या होतात, परंतू संकटाच्या काळात, संघर्षाच्या भोवर्‍यात सापडलेल्या महाराष्ट्राला तुमची गरज असतांना पळ काढू नका! बाहेर पडा आणी तोंड उघडा! तुर्त येथेच थांबू या! पुढील मुद्दे पुढील बहुजननामात!! सत्य की जय हो! (लेखनः 30 ऑक्टोंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 01 नोव्हेंबर 2020) ------- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270 ई मेलः- s.deore2012@gmail.com Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/