चौसष्ठावी खेप ......! ( दै.
लोकमंथन, रविवार 31 मार्च 2019 च्या अंकात प्रसिद्ध)
बहुजननामा-64
आठवले ते अंधारे व गायकवाड ते मातोंडकर....!
बहुजनांनो!,
निवडणूकीच्या
धामधुमीत पुरोगामी चळवळीत काही व्यक्ती विशेष चर्चेत येत आहेत. त्यात माननीय आठवलेसाहेब, सुषमाताई अंधारे,
प्रविणदादा गायकवाड यांच्या निमित्ताने काही महत्वाच्या मद्द्यांवर चर्चा करू या!
संभाव्य मंडल
अमलबजावणीला गाडण्यासाठी संभाव्य बाबरी मस्जिद भंजनाचा कार्यक्रम
ठरविला जात असतांना संघ-भाजपाने नव्वदिच्या दशकात ओबीसी-बहुजनांमधून अनेक नेत्यांची निर्मिती
केली. उमा भारती, गोपीनाथ मुंडे अशी अनेक नावे सांगता येतील.
कल्याणसिंगांसारखे काही 2-3 ओबीसी नेते 1967 पासूनच जनसंघात होते. मात्र त्यांना
हिंदुत्वाच्या आडून ‘ओबीसी नेते’ म्हणून फोकस करायची सुरूवात 85 नंतर झाली. जसेजसे
मंडल आंदोलन पुढच्या टप्प्यावर जात होतं तसेतसे या नेत्यांचं ओबीसीकरण गर्द होत
गेलं. वरचा मुलामा हिंदू असला तरी ओबीसी जातीतल्या या नेत्यांना फोकस करण्याचा
एकमेव उद्देश ‘त्यांच्या ओबीसी जातींना मंडल ऐवजी कमंडलच्या दिशेने वळविणे,’ हाच होता.
1992 ला बाबरी मशिद पाडून तिच्या ढिगार्याखाली काही अंशी मंडलचे अवशेष दफन
करण्यात आले. त्यानंतर संघ-भाजपाच्या दृष्टिने या ओबीसी नेत्यांचं अवतार-कार्य
संपलेलं होतं. लालू-मुलायमच्या प्रभावी ओबीसी राजकारणाच्या प्रभावात संघी-भाजपाई
ओबीसी नेत्यांना ‘नेता म्हणून कन्टिन्यु’ करणं तारेवरची कसरत होती. त्यामुळे बहुतेक सर्वच ओबीसी
नेत्यांचं नेतेपद नियंत्रित व प्रभावहिन करण्यात आलं. मेव्हणे प्रमोद महाजनांच्या मुळे गोपीनाथजींना प्रदिर्घ काळ मिळाला, परंतू नंतर काय
झालं ते मी सांगण्याची गरज नाही. जे जे ओबीसी नेते संघाच्या वैचारिक प्रभावातून
निर्माण झालेत त्यांना जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक प्रभावहीन करण्यात आले. 2010-11
च्या दरम्यान ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर ‘खरेखुरे’ ओबीसी नेते
बनण्याच्या प्रयत्नात काही जेलमध्ये गेलेत, काही अपघातात तर काही दवाखान्यातूनच
परस्पर वर गेलेत.
एकमात्र मोदी आहेत की ज्यांना जीवदान देण्यात आलं. अर्थात त्यांना संपविण्याचे
अनेक प्रयत्न झालेत. परंतू मोदींच्या त्यांच्या स्वतःच्या काही अंगभूत गुणांमुळे
ते संघ-भाजपाला मात देत राहीलेत. पहिला गुण हा की, त्यांच्या तोडीचा फर्डा वक्ता
संघ-भाजपात कोणीच नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा हा की त्यांनी स्वतःला ‘ओबीसी’ म्हणून
डिक्लेयर करणं. मोदींच्या विरोधात राहूनही मोदींचा खुबीने वापर करण्यात संघ-भाजपा
कुठेच मागे राहीले नाहीत. 2014 ला निर्णायकपणे जागृत झालेली ओबीसी व्होटबँक
लुटण्यासाठी ‘टोळीचा सरदार’ म्हणून मोदींचा वापर केला
गेला, जोडीला त्यांचे फर्डे वक्तेपण उपयोगी ठरलं! विशिष्ट हेतू ठेवून मानसं निर्माण करणं, त्यांचा वापर करणं व नंतर त्यांचे अवतार-कार्य संपवणं, ही सगळी कामे तेच
करू शकतात, जे व्हिजन बाळगूण असतात व आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असतात.
हे काम पुरोगामी म्हणविणार्या चळवळीत का होऊ शकत नाही, असा प्रश्न पडतो.
कॉंग्रेस-भाजपासारख्या पक्षांना ब्राह्मण-क्षत्रिय व भांडवलदार जात-वर्गांकडून
‘रसद’ परविली जात असल्याने ते आपल्या जात-वर्ग ध्येयाशी अ-प्रामाणिक होण्याचा
प्रश्नच उद्भवत नाही. मात्र आमच्या पुरोगामी चळवळीतून निर्माण झालेले नेते अ-प्रमाणिक
होऊन शत्रूपक्षाकडे कसे जातात, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. डाव्या-समाजवादी
वगैरे पक्षांना त्यांच्या कामगार युनियन काही प्रमाणात रसद पुरवीतात. मात्र दलित,
आदिवासी, ओबीसी कॅटेगिरीतील नेत्यांना व त्यांच्या पक्षांना रसद कोणी पुरवायची? आरक्षणामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनेक
उद्देश होते, त्यापैकी हाही एक उद्देश होता. आरक्षणाचा फायदा
घेऊन जे अधिकारी कर्मचारी बनतील त्यांनी आपल्या पगारातून किमान 5-10 टक्के रक्कम
समाजकार्याला द्यावी, हे बाबासाहेबांचे सांगणे केवळ ‘जयंती-पुण्यतीथीच्या पावत्या फाडण्यापुरते
मर्यादित नव्हते. मान्यवर कांशिराम साहेबांनी अशा कर्मचार्यांचे संघटन करून
त्यातून बहुजन समाज पक्षाची उभारणी यशस्वीपणे केली. जे रिपब्लिकन नेत्यांच्या
बाबतीत होऊ शकले नाही. त्यामुळे अशा दलित नेत्यांना रसद पुरवीण्याचे काम कॉंग्रेसी
सरंजामदारांनी व भाजपाई कलम-कसायांनी केले. त्यामुळे हे सर्व नेते त्यांच्या
आश्रयाला गेले आहेत.
पँथर, नामांतर, रिडल्स सारख्या चळवळी
सर्वसामान्य जनतेने संघटित होऊन कराव्यात, त्यातून निर्माण झालेल्या नेत्यांना
मध्यमवर्गीय कर्मचारी अधीकार्यांनी ‘रसद’ पुरवावी व त्यांचे राजकारण यशस्वी
करावे, एवढे साधे-सोपे सूत्र होते. आरक्षणाच्या माध्यमातून अनेक अधिकारी गडगंज
श्रीमंत झालेत, मात्र त्यासोबत त्यांनी आठवलेसाहेब, कवाडेसाहेब आदि नेत्यांना
राजकारणासाठी आवश्यक असलेली साधन-सामुग्री पुरवीली असती तर, हे नेते
कॉंग्रेस-भाजपाच्या आश्रयाला गेले नसते.
नेते आसमंतातून टपकत नाहीत. त्यांच्या काही अंगभूत गुणांमुळे व चळवळीमुळे ते
घडतात. त्यांना टिकवून ठेवणे गरजेचे असते. परंतू असे होत नाही. काही चुकीचे
गृहितके आमचे डोक्यात असतात. सुषमाताई अंधारे यांच्याबाबतही असेच काहीतरी घडले.
त्यांच्याकडे उपजतच उत्कृष्ट वक्त्याचा गुण आहे. अभ्यास करून बोलणे, ठासून मांडणे, कोणत्याही दहशतीला भीख न घालता घणाघाती आरोप करणं हा त्यांचा विशेष गुण आहे. मात्र आपण त्यांच्या या गुणाची कदर न करता
त्यांच्या मानधनावरच बोलत राहीलो. कार्यक्रमाच्या ‘डी.जे. वरील व
अवांतर ‘‘खाण्या-पिण्या’’वरील अनावश्यक खर्चावर कधीच चर्चा होत नाही. मात्र
वक्त्याच्या मानधनावर जमके चर्चा होते. जर सुषमाताई राखीव जागेचा फायदा घेऊन एखाद्या सरकारी पदावर असत्या तर त्यांनी एवढं मानधन
घेतलच नसतं. आणी मग ‘सरकारी’ म्हणून त्या एवढ्या घणाघाती बोलूही शकल्या नसत्या. फुले-आंबेडकरी चळवळीचा कोणताही फायदा न घेता सुषमाताई जर आपले अंगभूत गुण, जीव धोक्यात घालून उत्स्फुर्तपणे समाजासाठी उधळत असतील, तर काय त्यांनी
ते उपाशीपोटी उधळायचे का? दरम्यानच्या काळात त्यांना अनेक घटनांवरून व मानधनाच्या
विषयांवरून मोठ्याप्रमाणात ‘ट्रोल’ करण्यात आलं. अशावेळी प्रतिगामी लोक पुढे येतात
व आपणच तयार केलेली आपली माणसं हातोहात पळवतात. मानधन हा भीखेचा विषय नसून तो चळवळीच्या लढवैय्यांना रसद पुरविण्याचा विषय असतो, हे
आपण कधीच लक्षात घेत नाही.
तशीच काहीसी गोष्ट घडते आहे प्रविण दादा गायकवाडांच्या बाबतीत! मराठा सेवा संघ
व संभाजी ब्रिगेड च्या सुरूवातीच्या पुरोगामी चळवळींतून जे काही 2-4 वैचारिक नेते
पुढे आलेत, त्यात इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व प्रविण दादा गायकवाडांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे
लागेल. ते स्वतः सरंजामदार असले तरी
सरंजामदाराची कुठलीही ऐट त्यांच्यात दिसत नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून
आजही त्यांची ओळख कायम आहे. अभ्यासपूर्ण मांडणी व
मुद्देसूद बोलणे हे त्यांचे विशेष गुण म्हटले पाहिजेत. प्रवीण दादा मराठ्यांचे वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात ते सहजपणे जाऊ
शकले असते. मात्र पुरोगामी पींड असलेल्या दादाने शेकापसारखा
फुले-शाहू-आंबेडकरवादी पक्ष निवडला. मात्र आज त्यांच्यावर कॉंग्रेसकडे
तिकीट मागण्याची वेळ आलेली आहे. वास्तविक शेकाप ने महाआघाडीत
सामील होतांना किमान एक जागा हक्काने मागून ती प्रवीण दादाला दिली असती तर,
शेकापचंही पुरोगामी म्हणून चांगभलं झालं असतं. पण नाही. पुरोगामी वैचारिक लोकांना
पुढे येऊ द्यायचे नाही, असे धोरण कॉंग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे शेकापचंही आहे की
काय, अशी शंका येते. त्यातही
नागडं-उघडं नाचणार्या सिलीब्रटीजसाठी पायघड्या अंथरणार्या कॉंग्रेसने प्रवीण
दादा सारख्या वैचारिक नेत्याला तिकीट नाकारणं संशयास्पद आहे. राजकारणाची पतच एकूण घसरत चाललेली आहे. अशा वेळेस मराठा आरक्षणासारख्या
चूकीच्या मागणीसाठी लाखोंचे मोर्चे काढणारे लोक आपल्यातील एका वैचारिक नेत्याला ‘मोरल
रसद’ पुरवायला तयार नाहीत. सरंजामदार व त्यांचे मिसरूड न
फुटलेली पोरं संसदेत जावेत म्हणून जीव काढणारा मराठा समाज, वैचारिक नेतृत्व म्हणून प्रवीण दादांना सपोर्ट करायला तयार नाही. अर्थात अशा
घटना कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजात घडत असतात. पण लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत
अशा काही ठळक घटना लक्ष वेधून घेतात. शेकापसारख्या पुरोगामी पक्षाला एकही जागा न
देणारे पक्ष-कारभारी कोणतीही विचारसरणी नसलेल्या राजू शेट्टीसारख्यांना डोक्यावर
घेऊन नाचत आहेत.
विधान परिषद व राज्यसभा या केवळ विचारवंत, अभ्यासक, साहित्यिक यासारख्या विशेष
व्यक्तींसाठी आहेत. मात्र तेथेही आता केवळ नाचणारे, खेळणारे सिलिब्रटीज जातात. मेटेंसारखे लोक या जागा अडवून ठेवत आहेत. विचारक, अभ्यासक
वगैरे लोक निवडणूकीच्या राजकारणात वापरता येत नाहीत, उलट ते अडचणीचेच ठरतात. त्यामुळे ते सर्वच राज्यकर्त्यांना नकोसे झाले आहेत.
याचा अपरिहार्य परिणाम आपण आज बघतो आहोत व भोगतही आहोत. हुकुमशाही हिटलरची असो की पेशव्यांची, तीच्या आगमनापूर्वी वैचारिकतेचा
खून होत असतो, तो आज भारतात अगदी ठरवून, शांतपणे, नियोजनबद्ध पद्धतीने सर्वपक्षीय कार्यक्रम म्हणून राबविला जात आहे. या
वैचारिक खून सत्राचे उद्घाटन 1978 साली जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित कॉ.
शरद पाटील यांची मार्क्सवादी पक्षातून
हकालपट्टी करून करण्यात आले. त्यानंतर सफ्दर हाश्मी, शंकर गुहा नियोगी, शहीद जगदेवप्रसाद कुशवाह, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी,
गौरी लंकेश अशी ही रांग बरीच पुढे जाणार आहे.
हे लिहित असतांनाच मला दोन कार्यकर्त्या अभ्यासकांचे फोन आलेत. लिहीत असतांनाच
माझ्या या लेखातले मुद्दे त्यांना कसे कळलेत माहीत नाही., मात्र ते याच मुद्यांवर
माझ्याशी फोनवर बोलत होते. त्यात एक होते ऍड. संजय भाटे व दुसरे डॉ. लता
प्र.म.! लता मला फोनवरून सांगत होत्या की, आप पक्षाच्या कार्यालयातून फोन आला. मला
लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह करीत होते. मी त्यांना विचारले की, आत्ताच अचानक
माझी आठवण तुम्हाला कशी आली? मी त्यांना नकार दिला. आमच्या दोघातील चर्चेचा
निष्कर्ष असा आहे की, आपसारख्या संघटना व पक्ष अधूनमधून येतात व जातात. या
पक्षांची निर्मिती पडद्याआडून संघ-भाजपा करीत असते पण अशा पक्षांचे पालन-पोषण
समाजवादी करीत असतात. त्यांचा एकमेव उद्देश समाजातील विचारक व वलय प्राप्त झालेले कार्यकर्ते
नेते संपविणे! प्रचंड वैचारिक क्षमता असलेल्या योगेंद्र यादवांपासून ते आक्रमक
वलयांकीत मेधा पाटकरांपर्यंतचे अनेक छोटो-मोठे लोक यांनी पद्धतशीरपणे संपवलेत.
सगळ्यांनाच गोळ्या घालून संपवता येत नाही. म्हणून हे राजकीय निवडणूकांचे जाळे
पसरवीले जाते. आज जातीअंताची राजकीय वाट महामार्ग बनण्याच्या प्रयत्नात असतांना हे
वलयांकीत अभ्यासक-विचारक लोक त्या वाटेवर गेलेत तर, आपलं साडेतीन टक्क्यांचं काय
होईल हे सांगण्याची गरज नाही.
बहुजनांमध्ये लता मॅडम, संजय भाटेंसारख्या सतर्कता असलेल्यांची संख्या वाढत
राहो, अशी अपेक्षा व्यक्त करून माझा जयभीम-जयजोती घ्या व ‘सत्य की जय हो’ चा नारा द्या!!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
ईमेल- s.deore2012@gmail.com
लोकमंथन लिंक….
http://www.lokmanthan.com/2019/03/64.html?m=1
https://www.readwhere.com/read/m5/2090875#issue/4/1
http://www.lokmanthan.com/2019/03/64.html?m=1
https://www.readwhere.com/read/m5/2090875#issue/4/1