बहुजननामा-114
क्रिमी लेयरः अट आहे कि तत्व?
-1-
क्रिमी लेयर ही संकल्पना मुख्यतः सुप्रिम कोर्टच्या मंडल जजमेंटनंतर मोठ्या प्रमाणात चर्चेला आली. सुप्रिम कोर्टाचे हे जजमेंट नोव्हेंबर 1992 ला आले. या जजमेंटचे विश्लेषण करणारे पुस्तक लवकरात-लवकर काढण्यासाठी मी लिहीण्याचे काम हाती घेतले. ‘‘मंडल आयोग व आधुनिक पेशवाई’’ हे माझे दुसरे पुस्तक मुख्यतः क्रिमी लेयर या विषयावरच आहे. नागपूरच्या कायजेन मिडियाने ते सप्टेंबर-1993 ला प्रकाशित केले. हे पुस्तक प्रकाशित होऊन आज 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणी मधल्या काळात ओबीसी चळवळीचे प्रायोरिटीचे प्रश्न बदलत गेलेत. त्यामुळे नंतर-नंतर क्रिमी लेयर हा विषय ओबीसी चळवळीच्या जाहिरनाम्यात तळाशी गेला.
आता 27 वर्षानंतर क्रिमी लेयरचे तत्व (सिद्धांत) दलित-आदिवासींच्या सवलतींना लावण्यात आल्यानंतर या कॅटेगिरीतील बुद्धिवंत जागृत झालेत व क्रिमी लेयरवर लिहू-बोलू लागलेत, त्यांचे स्वागतच आहे. परंतू बहुतेक सर्वच बद्धिवंत क्रिमी लेयरला ‘अट’ म्हणतात. क्रिमी लेयरला सर्वसामान्य माणसांनी ‘अट’ म्हणणं स्वाभाविक आहे, कारण विशिष्ट सोयीचा वा सवलतीचा फायदा घेतांना काही अटी ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ वयाची अट, शैक्षणिक पात्रतेची अट वगैरे.....तशी आर्थिक उत्पन्नाची अट म्हणजे क्रिमी लेयर, असे साधे सरळ सोपे विश्लेषण सर्वसामान्य माणसाने केले तर ते आपण सहज समजू शकतो. मात्र बुद्धिवंतांचे काम तेथून पुढे सुरू व्हायला हवे. बुद्धीवंतांनी काही प्रश्न उपस्थित करून त्याच्या उत्तरात सैद्धांतिक मांडणी केली पाहिजे, जी चळवळीला पोषक ठरेल.
क्रिमी लेयर ही केवळ अट नसून तो सत्ताधार्यांचा शोषणाचा एक सिद्धांत कसा आहे व सत्ताधारी त्याचे समर्थन कसे करतो आहे व सत्ताधार्यांच्या या समर्थन मुद्यांना भले-भले पुरोगामी म्हणविणारे दिग्गज कसे बळी पडत आहेत, अशा सगळ्यांचे विवेचन मी ‘‘मंडल आयोग व आधुनिक पेशवाई’’ (1993) या पुस्तकात विस्ताराने केले आहे. या पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन झाले पाहिजे, असा आग्रह 2009 मध्ये माननीय कालकथित हनुमंतराव उपरे यांनी केला होता व त्यासाठी त्यांनी दहा हजार रूपयांची तरतूदही केली होती. परंतू काही अ-प्रस्तूत कारणास्तव ते काम नंतर थांबले.
आज सत्तावीस वर्षानंतरही मोठमोठे दलित अधिकारी व बुद्धिवंत शिष्यवृत्तीला लावलेल्या क्रिमी लेयर तत्वाचे ‘अट’ म्हणून समर्थन करतात. 27 वर्षांपूर्वी सुद्धा आमचेच ओबीसी प्राध्यापक, साहित्यिक, विचारवंत क्रिमी लेयरचे समर्थन करीत होते. त्याकाळी (1990-93) महाराष्ट्र स्तरावरची सर्व राजकीय पक्षांची आरक्षण समिती स्थापन झालेली होती. त्यात रिपब्लीकन, समाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप, सकप, भाजप असे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सदस्य होते. शेकापचे तत्कालीन खासदार दि.बा. पाटील हे या समितीचे अध्यक्ष होते. कॉ. प्रभाकर संझगिरी, आमदार दत्ता पाटील, रा.सू गवई आदि बरेच दिग्गज नेते या समितीचे सदस्य होते. मी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या आरक्षण समितीत सदस्य होतो. कर्मवीर ऍड. जनार्दन पाटील हेही या समितीचे सदस्य होते व सर्व बैठकांना ते आवर्जून हजर असत. या समितीच्या बहुतेक सर्वच बैठका मुंबईत मंत्रालय परिसरात होत असत. यातील काही बैठकांचा वृतांत ‘‘सत्यशोधक मार्क्सवादी’’ या तत्वज्ञानिक मासिकात छापून आलेला आहे. या समितीच्या बैठकीत अनेकवेळा क्रिमी लेयरवर चर्चा झाली होती. एका बैठकीत रिपब्लीकन पक्षाचे नेते माननीय रा. सू. गवईसाहेबांनी क्रीमी लेयरचे समर्थन केले. तेव्हा मी त्यांना ईशारा दिला की, ‘आज ओबीसी जाती क्रिमी लेयर तत्वाच्या जात्यात भरडले जात आहेत, उद्या त्याच जात्यात दलित-आदिवासी जनताही भरडली जाणार आहे.’ 27 वर्षांपूर्वी मी दिलेला ईशारा आज खरा ठरत आहे.
समाजवादी, कम्युनिस्ट वगैरे पक्षांनी क्रिमी लेयर तत्वाला पाठिंबा दिला, कारण त्यांच्या दृष्टीने क्रिमीलेयर तत्व त्यांच्या ‘शूद्ध वर्ग’ तत्वाला समर्थन करते. एखाद्या दलित, आदिवासी व ओबीसी नेत्याने क्रिमी लेयरचे ‘अट’ म्हणून समर्थन केले तर ते आपण समजू शकतो. कारण तत्वज्ञानाच्या पातळीवर ते शासक-शोषक जातवर्गाच्या भूलभूलय्यैला समजू शकले नाहीत किंवा सत्ताधार्यांकडून संभाव्यपणे मिळू शकणार्या व्यक्तीगत अमिषाला ते बळी पडलेले आहेत, असे आपण म्हणू शकतो. मात्र ज्या समाजवादी व कम्युनिस्ट पक्षांच्या तात्विक निष्ठा अढळ आहेत, ते क्रिमी लेयर तत्वाचे समर्थन तत्वज्ञानाच्या पातळीवरूनच करतात, यात कोणतीही शंका नाही. मग हे असे कोणते तत्वज्ञान आहे की, जे एकाचवेळी ब्राह्मणांच्याही हिताचे आहे व समाजवादी-कम्युनिस्टांच्याही हिताचे आहे? अर्थातच ‘शूद्ध वर्गीय’ तत्वज्ञान! कॉंग्रेस पक्ष 1967 पासून देशातील जात-वर्गीय समस्यांनी ग्रस्त झाल्यामुळे फुटला व कमजोर झाला. त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजींनी ‘शूद्ध वर्गीय’ सुधारणा करून पक्षाला सावरले. बँकाचं राष्ट्रीयकरण, गरीबी हटाव वगैरे वर्गीय-सुधारणा होत्या, मात्र तत्कालीन कम्युनिस्ट पक्षाच्या डांगेसारख्या नेत्यांना वर्गीय क्रांती झाल्याचा साक्षात्कार झाला व त्यांनी उघडपणे इंदिराजींना पाठिंबा दिला. भारतातील कम्युनिस्ट पक्षाचा ‘शूद्ध वर्गवाद’ हा असा ब्राह्मणी भांडवलशाहीला पूरक आहे. क्रिमि लेयर तत्वाला कॉंग्रेस, भाजपा, समाजवादी व कम्युनिस्ट पक्ष अशा सर्व प्रतिगामी व पुरोगामी पक्षांनी पाठिंबा देणे, ही या देशात होऊ घातलेल्या जात्यंतक क्रांतीमधील मोठी अडचण आहे.
-2-
क्रिमि लेयर म्हणजे दुधावरची साय! ही साय आपोआप निर्माण होते काय? तर नाही. ती आपोआप निर्माण होत नाही. दलित, आदिवासी व ओबीसींमध्ये ही साय कशी निर्माण झाली? अनेक कारणांपैकी एक मोठे कारण आहे- प्रतिनिधीत्वाचे तत्व, प्रस्थापितांच्या भाषेत सांगायचे तर- आरक्षणाची सवलत. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या दबावाखाली भारतीय ब्राह्मणी जात-वर्गीय सत्ताधार्यांना विशेष प्रतिनिधीत्वाचे तत्व स्वीकारवे लागले. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी त्याची तत्वज्ञानाच्या पाळीवर मांडणी केली. छत्रपती शाहू महाराजांनी या क्रांतीकारी तत्वाची ठोस अमलबजावणी आपल्या संस्थानात करून या तत्वाचा पाया मजबूत केला. त्यानंतर या चळवळीचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 ते 1950 पर्यंत प्रदिर्घ संघर्ष करून प्रतिनिधीत्वाच्या या तत्वाला कायद्याचे अखिल भारतीय मूर्त स्वरूप संविधानात दिले. तर दलित आदिवासी व ओबीसी जातीतून जे काही क्रिमि लेयर आज सत्ताधार्यांना दिसते आहे ते केवळ या फुले-शाहू-आंबेडकरी जात्यंतक चळवळीचे एक फलित आहेत.
तर, साय दुधावर आपोआप येत नाही, त्या दुधाला तापवावे लागते व ते उतू जाण्याच्या आत थांबवावे लागते. तापविण्याची ही प्रक्रिया प्रसूती वेदनांपेक्षाही जास्त वेदनादायक असते. थंड होण्याच्या प्रक्रियेत त्यावर ‘साय’ जमा होते. ही साय दुधातून बाहेर काढली जाते व तिच्यावर आणखी काही प्रक्रिया करून तिचे तुप बनविले जाते. आणखी एक वेगळा मार्ग असतो- दुधातून ‘लोणी’ काढण्याचा! दुधाचे प्रमाण जास्त असल्यास दुध एका मोठ्या भांड्यात घेऊन त्याची घुसळन केली जाते. समुद्र मंथनातून अनेक मोती-रत्ने निघालीत, तशी दुधाच्या घुसळनमधून लोणी निघते व त्याच्यावरही प्रक्रिया करून तुप बनविले जाते. दलित+आदिवासी+ओबीसी जातींची घुसळून होऊन जी क्रिम नावाची साय-लोणी तरंगत वर आली आहे, ती साचली किती व नासली किती, याची चर्चा आपण पुढच्या बहुजननाम्यात करू या! पुढील चर्चेतील बरेचसे मुद्दे हे माझ्या 1993 च्या पुस्तकातील असण्याची शक्यता जास्त आहे. हे पुस्तक आता आऊट ऑफ प्रिन्ट आहे. माझ्याकडे एकमेव प्रत आहे व आता हे क्रिमी लेयरचे लेख लिहीतांना मी या पुस्तकापासून दूर 400 किलेमिटरवर आहे. चळवळीच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे ते असेल. बहुजननामाच्या वाचकांनी हे पुस्तक मिळवून वाचले तर आपली या विषयावरची चर्चा अधिक सखोल व व्यापक होऊ शकते.
तो तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 30 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 31मे20)
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27270
Mobile – 88 301 27270
Link-