http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, April 12, 2020

108 BahujanNama Change 12 April 20


बहुजननामा-108
करोनाः आमूलाग्र बदलाची संधी!
-1-
      मानव प्राणी हा अत्यंत चिवटपणे परंपराप्रिय असतो. नवी परंपरा मान्यताप्राप्त होत नाही, तोवर तो जुनी परंपरा त्यागत नाही. त्यालाच अलिकडे काही लोक धार्मिक कट्टरता वगैरे म्हणतात. खरे म्हणजे परंपराप्रिय असणे हे मानवाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे त्या कट्टरतेचा धर्माशी काहीही संबध नाही. महाभारत युद्धात मृत्यु पावत असलेला भिष्म आपला प्राण उत्तरायणसाठी 58 दिवस रोखून ठेवतो, कारण त्याला नरक टाळून स्वर्गात जायचे असते. साक्षात मृत्युच्या दारात असतांनाही लोक आपल्या श्रद्धा, सण-उत्सव व यात्रा-मेळावे सोडायला तयार नाहीत, हे करोनाच्या जीवघेण्या संकटानेही सिद्ध केले आहे. त्याबाबत सर्वधर्मसमभावच म्हटले पाहिजे.
        परंतू कोणतीही नियमित सामुदायिक कृती ही परंपरा बनण्याच्या प्रक्रियेत असतेच! जोपर्यंत ती वैचारिक पाळीवर असते तो पर्यंत माणूस तीच्यापासून प्रेरणा घेत असतो. आपल्या समुदायाचे वेगळेपण त्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणतीही नियमित कृती प्रथा-परंपरा बनत असतांना ती वैचारिक व प्रतिकात्मक अशा दोन्ही आघाडीवर सातत्य ठेवत असेल तरच त्यातून येणार्‍या पुरोगामी कट्टरतेमुळे काही चांगले नवे बदल घडून येतात व समाज पुढील नव्या उच्चतर पातळीवर जातो. परंतू जर ती कृती वैचारिकता गमावून केवळ प्रतिकात्मक राहात असेल तर त्यातून येणारी कट्टरता प्रतिगामी बनते व समाज नवे मिळविलेलेही गमावतो.
          मरकज, ईस्टर, रामनवमी, कृष्णाष्टमी, यात्रा-जत्रा व शब्बे बारात वाले हे जेवढे कट्टर आहेत तेवढेच कट्टर फुलेआंबेडकरवादीपण आहेत. मात्र दोघात एक महत्वाचा फरक आहे. या दोघांच्या कट्टरतेत पुरोगामी व प्रतिगामीची विभागणी-रेषा आहे. करोनाच्या काळात बहुतेक सर्वच पुरोगाम्यांनी जाहीर आवाहन केले आहे की, 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी घरात राहूनच फुले आंबेडकर जयंती साजरी करायची आहे. त्याला अजून कुठेही विरोध झालेला नाही, उलट वेगळे वेगळे उपक्रम घरातूनच राबविले तरी ते समुदायिकपणाच्या अभावाची भरपाई करणारे आहेत. त्यापैकी काही उपक्रम पुढीलप्रमाणे- 1) 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी घराबाहेर पिवळ्या व निळ्या रंगाची गुढी उभारून फुले आंबेडकरांना अभिवादन करता येईल.
2)
घरातील फुले आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती वा दिवा लावून जयंती साजरा करा.
3)
फुले आंबेडकरांच्या ग्रंथांचे वाचन करून जयंती साजरा करता येते.
                              -2-
       असे अनेक कार्यक्रम सूचविले जात असतांना फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठाचे एक परीक्षाप्रमुख राजू कांबळे (मुंबई) यांनी 5 एप्रिल रोजी मला फोनवरून विनंती केली की, ‘‘तुमचे बरेचसे कार्यक्रम करोनामुळे रद्द झालेले आहेत. आता त्याला पर्याय म्हणून 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी आपण किमान एक तासाचे व्याख्यान फेसबुकवर लाईव्ह द्या, महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी कार्यकर्ते व श्रोते त्या व्याख्यानाचा लाभ घेतील.’’ त्यावर मी विचार करतो’, असे फोनवर सांगीतले. गेल्या 30-35 वर्षांपासून जे काम अथकपणे करत आहोत, तेच व्याख्याने देण्याचे काम करोना काळातही करावे, हे फारसे पटत नव्हते. नवे काहीतरी करावे जेणेकरून लोकांचाही त्यात सहभाग असावा. त्याच दिवशी एरंडोल-जळगावचे निलेश देवरे व लातूरचे दत्ता माळी यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणेसंबंधात माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी चंद्रपूरचे कार्यकर्ते हरिदास गौरकर व अजित साव यांनी माझ्याशी फोनवरून निबंध स्पर्धा आयोजन करण्याबद्दल चर्चा केली. मला हे दोन्ही कार्यक्रम आवडलेत. याच कार्यक्रमांना सक्रिय मदत करून राज्यस्तरावर नेले तर आपली व लोकांचीही करोना काळातील बळजबरीची सुट्टी सार्थकी लागेल व घरात बसूनच फुले आंबेडकर जयंती साजरा करण्याचा आनंदही घेता येईल.
        त्या पैकी एक वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम मी व माझ्या मित्र-कार्यकर्त्यांनी या आधीच सोशल मिडियावरून व्हायरल केलेला आहे. 15 एप्रिलपासून मी निबंध स्पर्धेचाही कार्यक्रम जाहीर करणार आहे. आपला मूळ विषय आहे, प्रथा परंपरा साजरा करण्याचा व जतन करण्याचा! रामजन्मोत्सव, कृष्णाष्टमी, बळीराजा श्राद्धपक्ष, खंडोबा, जोतिबा, नवरात्र, कूलमातांच्या यात्रा वगैरे हे सर्व सण-उत्सवांच्या परंपरा व फुले आंबेडकरांच्या जयंती-स्मृतीदिनाच्या परंपरा यात एक मोठी तफावत हीच आहे की, फुलेआंबेडकरांच्या नावाने होणारे कार्यक्रम अजूनही वैचारिक पातळी जपून आहेत, त्यांचे अजून दैवतीकरण झालेले नाही. आणी म्हणूनच करोनाच्या संकटातही कट्टरता कायम ठेवून सुरक्षितपणे सण-उत्सव साजरा करण्याचा आदर्श घालून देता येतो. 
          मानव समाजाच्या सांस्कृतिक प्रवाहात अनेक सार्वत्रिक उलथा-पालथी झालेल्या आहेत. कॉलरा, पटकी, प्लेग सारख्या असंख्य वेगवेगळ्या साथीच्या रोगांनी जगाच्या पाठीवर अनेकवेळा धुमाकूळ घातलेला आहे. त्यावर मात करीत माणूस आपले अस्तित्व आपल्या संस्कृतीसह अखंडपणे प्रवाही व वर्धिष्णू ठेवीत आहे. आधुनिक काळातही पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध ही मानवनिर्मित जागतिक संकटे आलीत, या संकटांना संधी समजून अनेक राष्ट्रांनी परिश्रम घेऊन प्रगतीचे शखर गाठले व महासत्ता म्हणून नव्याने उदयास आलेत. करोना हे दोन्ही महायुद्धांपेक्षा जास्त गंभीर व जास्त परिणामकारक आहे. या महायुद्धात अमेरिका, फ्रान्ससारख्या जागतिक महासत्ता करोनासमोर सपशेल चीत झाल्यात, तेथे भारतासारखा महाकाय अविकसित देश मात्र शर्थीने लढतो आहे व करोनाला नियंत्रित करतो आहे. तुर्कमेनिस्थानसारखा छोट्या व अत्यंत गरीब देशात आजही शून्य करोनाग्रस्त आहेत व त्यांनी एक दिवसाचाही लॉकडाऊन पाळला नाही. आजही तेथे सर्व सण-उत्सव प्रचंड उत्साहत लाखोंच्या संख्येने एकत्र येत साजरा करीत आहेत. कारण त्यांनी करोनाशी दोन हात करतांना जे उपाय केलेत ते उपाय इतर कोणताही देश अमलात आणू शकला नाही.
          असे म्हणतात की आपणच पैदा केलेले पोरगे आपल्या जीवावर उठते. चीनने करोना व्हायरसचे सत्य दोन महिने दडपून ठेवले, ते का? अमेरिकेने अजूनही अधिकृतपणे लॉकडाऊन जाहीर केलेला नाही, का? बहुतेक सर्वच प्रगत देश करोनाग्रस्त होत असतांना कडक उपाय योजना लागू करायला घाबरत होते, का? कारण आपणच पैदा केलेल्या पोराला एकूलता एक लाडका म्हणून आपण त्याला वाढवतो, आपल्या म्हातारपणी आपलं पोरगं आपल्याला सुखात ठेवील, या आशेने आपण नको ते अनैतिक व अवैध कृत्ये करीत त्याला खूश करण्याचा प्रयत्न करतो व शेवटी पोरगं बिघडतं, गुन्हेगार बनतं व आपल्याच जन्मदात्यांचा खून करतो. जगातील मूठभर भांडवलदारांनी जी अर्थव्यवस्था देशपातळीवर व नंतर जागतिक पातळीवर (LPG) उभी केलेली आहे, ती जगविण्यासाठी, वाढविण्यासाठी व वाचविण्यासाठी महायुद्धे लादली जातात. करोनासारख्या जागतिक संकटातही ते अमानवीपणे वागतात. अमेरिकेत एक लाख लोक मेलेत तरी काही हरकत नाही, असे निवेदन करणारे ट्रम्फ जागतिक साम्राज्यवादाच्या क्रूरतेचे खरेखूरे प्रतिक ठरतात.
          भांडवल श्रेष्ठ, श्रम कनिष्ठ, भांडवलदार हेच देशाचा विकास करतात, श्रमिक मात्र नेहमीच आंदोलने करून विकासाला अढथळा आणतात. धरण बांधणारे विकासपूत्र आणी धरणग्रस्त हे विकासाला अपशकून ठरतात. पूजापाठसारखी थोतांडे करून पोट भरणारे भिखारी भूदेवम्हणून मान्यता पावतात व कष्ट करून दुसर्‍्यांचीही पोटे भरणारे शूद्रादिअतिशूद्र हे अपवित्र-अस्पृश्यठरतात! अशा कृत्रिम व अनैतिक सिद्धांतांवर उभी असलेली ऐतखाऊंची वर्ग-जातव्यवस्था टिकून राहावी म्हणून देश अनेकवेळा धोक्यात टाकला गेला व आजही टाकला जात आहे.
करोना संकट हे देशाबाहेरून आणले गेले आहे. कोणाच्या प्रेमापोटी? अर्थातच आपल्या लाडक्या पूत्रांसाठी व नातेवाईकांच्या प्रेमापोटी! परकीय देशात काहीही संकट आले की हे लगेच आपल्या पोरा-बाळांसाठी विमाने पाठवितात व त्यांना आपल्या देशात घेऊन येतात. कारण ही लाडकी मुलं डॉलर-पौंड पाठवीत असतात. त्यांच्यासाठी आख्खा देश करोनाग्रस्त झाला तरी चालेल, परंतू आपले पूत्रप्रेम जागविले पाहिजे.
                               -3-
         कोणतेही देशव्यापी अथवा जागतिक संकट आले की समाजातला प्रत्येक घटक त्यातून वाट काढीत आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करतो. आपल्याच देशाचे उदाहरण द्यायचे तर वाढत्या सजातीय असंतोषातून आपले उच्चजातीय राजकारण टिकवून ठेवण्यासाठी ईव्हीएम आणण्यात आलं. जातीय लुटीची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी टॅक्स सिस्टीम दिल्ली-केंद्रीत (GST) करण्यात आली. आपली लूटीची व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी कृत्रिम उपाय-योजना करण्यातून तब्ब्येत अधिकच बिघडत गेली व त्यावर उपाय म्हणून नोटबंदीचा जालीम उपाय योजला गेला. तोही जातीय लूटीचाच एक प्रकार सिद्ध झाल्याने अर्थव्यवस्था डबघाईस गेली. रिझर्व बँकेचा रिझर्व फंडही वापरून झालेला आहे. त्यात करोना संकट आलं आणी त्याला एक संधी समजून आता आर्थिक आणीबाणी लादण्याचा घाट घातला जात आहे. ईव्हीएम आणून राजकीय आणीबाणी लादली गेलेली आहे, हिंदू-मुस्लीम धृवीकरणातून समाजिक आणीबाणी सुरूच आहे, त्यात आता आर्थिक आणीबाणी आणून देशातील SC+ST+OBC च्या 85 टक्के जनतेला देशोधडीला लावण्याचे काम सुरू होणार आहे. राजकीय आणीबाणी+सामाजिक आणीबाणी+आर्थिक आणीबाणी याचा अर्थ देशपातळीवरची पेशवाई भक्कम करणे होय!
           करोना संकटाला एक संधी म्हणून उच्चजातीय वापर करू शकतात तर आपण शूद्रादिअतिशूद्र का करू शकत नाहीत? ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य या शेठजी+भटजी+लाटजी विरोधात लढा उभारण्यासाठी SC+ST+OBCयांनी व श्रमिकवर्गाने एकत्रितपणे विचार केला पाहीजे. समोरून जोरात वाहन (संकट) येत असेल तर कुत्रं-मांजरही जीव वाचविण्यासाठी उडी मारून रस्ता बदलतो. आपण तर जीते-जागती माणसं, त्यात मार्क्सवादी+फुलेवादी+आंबेडकरवादी! आपल्यालाही थोडंफार नव्हे आमूलाग्रबदललंच पाहिजे! आपले सिद्धांत, आपले महापुरूष व आतापर्यंतचे कृती-कार्यक्रम मूर्ती-रूढी-परंपरा स्वरूपात प्रतिगामी प्रतिके बनण्याआधी त्यात क्रांतीकारी बदल केला पाहिजे.
        तसा आमूलाग्र बदल करण्याची बुद्धी या फुले आंबेडकर जयंतीपर्वात सर्वांना               यावी, अशी अपेक्षा करुन जयजोती जयभीमचा कडक सॅल्युट मारतो व सत्य की जय हो चा घोष करून निरोप घेतो.
             (लेखनः 11 एप्रिल 2020)
                                                                               ------ प्रा. श्रावण देवरे
                                                                              Mobile – 88 301 270                      
                              Blog ब्लॉग  https://shrwandeore.blogspot.in/                             Email- s.deore2012@gmail.com


1 comment: