http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, October 21, 2018

46 BahujanNama, Shram-Shramik, 21 Oct 18, Lokmanthan


बहुजननामा-46
श्रम व श्रमिकाची प्रतिष्ठा!
   बहुजनांनो.... !   
     सृष्टीच्या विकासाचे अनेक लहान-मोठे, मुख्य आणी उप असे विकासाचे विविध टप्पे असतात. या विकासात अनेक बदल होत असतात. काही मोठे होतात. काही लहान आणी काही नामशेष होतात व काही नवेही जन्म घेतात. सृष्टीचाच एक लहानसा परंतू महत्वाचा एक घटक असलेला हा मानव प्राणी! शारिरिक श्रम व बौद्धिक श्रमाच्या सुंदर संयोगातून रानटी मानव हा ‘’माणूस’’ बनला. जो पर्यंत शारिरिक श्रम व बौद्धीक श्रम यांच्यात तणाव नव्हता, तो पर्यंत तो ‘मानवतावादी’ होता. या दोन श्रम प्रकारात जसजसा तणाव वाढत गेला तसतसा त्याच्यातील मानवतावाद घटत गेला.
अन्नासाठी वण वण भटकणार्‍या मानव प्राण्यांच्या टोळ्या या इतर रानटी
प्राण्यांइतक्याच रानटी होत्या. कारण सर्जनशिल विचार-प्रक्रिया निर्माणच झाली नव्हती. अन्नाचं कृत्रिम पद्धतीने पुनरुप्तादन करण्याचा विचार सर्वप्रथम स्त्रियांच्या डोक्यात आला. याचं कारण मानवी समाजाचं पुरूत्पादन स्त्रिया करीत होत्या व त्यासाठी लागणारे शारिरिक कष्टही त्याच घेत होत्या. पोटात गर्भाशयात जीवाचं पुरुत्पादन व त्यानंतरच्या 9 महिन्यातील गर्भ विकासाचे श्रम, आणी सगळ्यात शेवटी जीवघेण्या प्रसव-वेदना. एवढे सारे श्रम-कष्ट करून स्त्री मानवाचं पुरूत्पादन करीत असते, म्हणूनच सर्वप्रथम तिच्या मेंदूत अन्न-धान्याचं कृत्रीम पुनरूत्पादन करण्याचा विचार आला व प्रत्यक्ष कृतीतून तीने शेतीचा शोध लावला. शेती करतांना शारिरिक श्रम व बौद्धिक श्रमाचा तीने सुंदर मिलाफ घडवून आणला.
अन्न-धान्याच्या पुनरूत्पादनाची व्यवस्था निर्माण करण्यातून तीने गणसमाजव्यवस्था उभी केली. त्याच्या पायाशी लागणारी अर्थव्यवस्थाही निर्माण केली जी समतेवर आधारित होती. गण सभासदांना धान्याचे समान वाटप करण्याचे तीचे धोरण होते. जरी पुरूष शेतीत श्रम करू शकत नव्हते, समाजव्यवस्थेत त्यांचे स्थान दुय्यम असले तरी त्यांचे ‘शोषण’ होत नव्हते. स्त्री-पुरूष भेद नैसर्गिक असतांना व तो पुढील समाजविकासात ‘’क्षत्र व ब्रह्मण’’ या द्वै-वर्णव्यवस्थेत दृढ झाल्यावरही तो शोषणाचा आधार बनला नाही. याचे कारण एकतर ‘वरकड’ उत्पादन होत नव्हतं व दुसरं कारण उत्पादनाची साधनं गणराज्याच्या मालकीची होती. आणी तिसरे धान्याचे समान वाटप. या तीन कारणांमुळे क्षत्र व ब्रह्मण द्वै-वर्णव्यवस्थेत हे दोन्ही वर्ण अशत्रूभावी राहीलेत.
समाजविकासाच्या पुढील टप्प्यात उत्पादनाची साधने विकसित झालीत. ‘स्फ्य’ काठीच्या ठिकाणीं ‘नांगर’ आला व या नांगराला ओढण्यासाठी पाळीव रानटी प्राणी जुंपला गेले, तेव्हा समाजव्यवस्थेने ‘कूस’ बदलली. या नव्या विकसित उप्तादन साधनांचा जनक पुरूष असल्याने तो ‘कर्ता’ झाला. क्षत्र म्हणजे शेती स्त्रीयांच्या नियंत्रणातून निघून गेल्याने स्त्रीया ‘वर्णहीन’ झाल्यात. ब्रह्मण वर्ण पुरूषांचा होता तोही विभाजित होऊन त्यातून ‘दास’ वर्णाची निर्मिती झाली. बौद्धिक श्रम ‘ब्रह्मण’ वर्णाची मक्तेदारी झाली व शारिरीक श्रम दास व पाळीव प्राण्यांच्या वाट्याला आलेत. बौद्धिक श्रम व शारिरीक श्रमाची विभागणी होऊन त्यात तणाव निर्माण होताच माणसाच्या ‘मानवतावादाला’ तडा गेला. शोषण व्यवस्थेचा जन्म झाला.
जी स्त्री समतेची पुरर्स्कर्ती होती होती ती नव्या पुरूषसत्ताक त्रैवर्ण्यिक गणराज्यात वर्णहीन झाली, दुय्यम झाली व घरात कायमची कोंडली गेली. परंतू कोणतेही परिवर्तन शांततामय मार्गाने होत नाही. समाजव्यवस्थेचा गाडा स्त्रीयांच्या नियंत्रणातून निघून पुरूषांच्या ताब्यात येत असतांना काही रक्तमय संघर्ष घडणे स्वाभाविक होते. याच स्त्री-पुरूष संघर्षाचे प्रतिबिंब ‘’दुर्गा-महिषासूर’’ लढाईत स्पष्टपणे दिसते. मात्र हे संघर्ष नंतर मिथके बनतात व प्रत्येक युगात प्रस्थापितांच्या हितासाठी या मिथकात तोड-फोड केली जाते. दुर्गा व महिषासूरातील संघर्ष हा क्षत्र-ब्रह्मण संघर्षाचा भाग होता व तो क्षत्र-शेती नियंत्रणासाठीचा होता. राम-ताटका व लक्ष्मण-शूर्पणखा या लढाईत तो अधिक स्पष्ट होतो. रामाचा वनवास हा एक बकवास आहे. मुळात रामाची ती युद्ध मोहीम होती.
तत्कालीन ब्रह्मण ऋषींच्या मार्गदर्शनाखाली रामाने क्षत्र (स्त्री) वर्णाविरूद्ध युद्ध पुकारले व ते भारतव्यापी करण्यासाठी तो उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाला होता. या युद्ध मोहीमेचा मुख्य उद्देश होता चातुर्वर्ण्यक पुरूषस्त्ताक गणसमाज निर्माण करणे. त्यामुळे रस्त्यात त्याला जी गणराज्ये स्त्री-सत्ताक वा मातृवंश-सत्ताक असलेली दिसलीत ती त्याने युद्ध करून नष्ट केलीत. ही गणराज्ये मागास उत्पादन-साधनाने शेती उत्पादन करीत होत्या. त्यामुळे ती युद्धात हरणे स्वाभविक होते. रामाने तेथे विकसित उत्पादन साधनांची पुर्तता केली ज्यातून पुरूषसत्ताक चातुरवर्ण्य समाज निर्माण झाला. दण्डकारण्यात शूर्पणखेचं स्त्रीसत्ताक गणराज्य होतं. रावण या दण्डकारण्यात ‘ब्रह्मण’ म्हणून दुय्यम स्थानावर होता. त्याला शूर्पणखेच्या जागी राजा होता येत नव्हतं. कारण ते स्त्रीराज्य होतं. म्हणून रावण श्रीलंकेला निर्यात झाला. तेथे मंदोदरीचं मातृवंशसत्ताक राज्य होतं. या गणसमाजात स्त्रीराणीशी जो लग्न करेल तो ‘राजा’ होत असे. या गणसमाजात रावण ‘ब्रह्मण’च राहीला. परंतू रामाचा गण चातुर्वर्ण्यक पुरूषसत्ताक झालेला असल्याने तेथे पुरूषांचे चारवर्ण स्थापीत झालेले होते. ‘ब्रहमण’ चे ‘ब्राह्मण’ झाले, क्षत्र-शेती धारक ‘क्षत्रिय झालेत व तिसरा वर्ण ‘वैश्य’ व दासांमधून चौथा वर्ण ‘शूद्र’ झाला!
रावण हा ब्रह्मण म्हणूनच लंकेत निर्यात झाला! ते मंदोदरीचं मातृंवंशसत्ताक गणराज्य त्रैवर्णिक होते. ब्रह्मण, क्षत्र व दास! त्यालाही चातुवर्ण्यिक पूर्ण पुरूषसत्ताक गणराज्य बनविण्यासाठी रामाने रावणाशी युद्ध पुकारलं. अशा प्रकारे ताटिकेचे व शूर्पणखेचे स्त्रीसत्ताक गणराज्य, बली व रावणाचे मातृवंशसत्ताक गणराज्य नष्ट करून संपूर्ण भारतात चातुर्वर्ण्यक पुरूषसत्ताक गणराज्ये स्थापन झालीत. मात्र या सर्व विकास प्रक्रियेत एक महत्वाची घटना घडली. बौद्धिक श्रम व शारिरिक श्रमाची पूर्णपणे फारकत झाली व मानव प्राण्याची ‘मानवता’ आटत गेली. दास-शूद्रांच्या गुलामगिरीचे जोखड अधीकाधिक असह्य होत गेले. त्यातून नवे ताण-तणाव निर्माण होऊन विद्रोह झालेत. अनेक गणराज्ये नाहीशी झालीत, नवी उदयास आलीत. महाभारतीय युद्धे झालीत. या विद्रोहाचे मूळ सूत्र होते मानवतावादाची पुनर्स्थापना म्हणजे बौद्धिक श्रम व शारिरिक यांची एकाच देहात पुनर्जोडणी! या समतावादी विद्रोहाचे ज्या ज्या महामानवांनी नेतृत्व केलं ते सर्व या मूळसूत्राचे प्रतिपालक होते.
महामानव बुद्धाने चातुर्वर्णप्रथाक पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेतील गुलामगिरी नष्ट केली. बौद्ध विद्यापीठांमध्ये एक नियम होता. बौद्ध विद्यापीठातील विद्यार्थी कोणत्याही बौद्धीक क्षेत्रात पारंगत झालेला असो, त्याला किमान एकतरी कष्टाचे काम शिकावेच लागे. सुतारकाम, लोहारकाम, शिल्पकाम, शेतीकाम अशी सर्व समाजोपयोगी कला-कौशल्याची कामे बौद्ध विद्यापीठात शिकवीली जात होती. त्यामुळे त्या समाजात श्रमालाही प्रतिष्ठा मिळाली व श्रमिकालाही मानसन्मान मिळाला. एका जातक कथेत लिहिले आहे. बौद्ध विद्यापीठातून शिकून बाहेर पडलेला सुतार जेव्हा राजाच्या दरबारात प्रवेश करतो तेव्हा राजासकट सगळे दरबारी उठून उभे राहून त्याला प्रणाम करतात. केढा मोठा सन्मान कष्टकर्‍यांचा! त्यावेळचे सर्व कष्टकरी घटक पुग व श्रेणी गटात विभाजित होते व ते श्रेष्ठी म्हणून सन्मानीत होते.
दक्षिणेकडील बसवआण्नाची क्रांती ही सुद्धा समता प्रस्थापित करणारीच होती. जातीजातीत झालेली बौद्धिक व शारिरिक श्रमाची विभागणी नष्ट करणारी ही क्रांती होती. बसवआण्णांच्या अनुभव-मंटपाचा एक काटेकोर नियम होता- ‘प्रत्येकाने स्वतः श्रम करून आपली रोजची भोजनव्यवस्था करावी. काश्मिरच्या एका राजाच्या कानावर अनुभव-मंटपची ख्याती गेली व तो अनुभव-मंठपात दाखल झाला. परंतू प्रवेश द्वारावर त्याला द्वारपालने अडविले व खडसावले की, ‘जेवण फुकटात मिळणार नाही.’ राजा प्रवेश द्वारातूनच परतला, जंगलात गेला, लाकडं गोळा केली, ती बाजूच्या गावात जाउन विकली व मिळालेल्या पैशातून तांदूळ खरेदी करून अनुभव-मंटपात दाखल झाला. ही खरी श्रमाची व श्रमिकाची प्रतिष्ठा!
ब्राह्मणी वैदिक धर्माच्या पुनरूज्जीवनाने पुन्हा बौद्धिक श्रम व शारिरिक श्रम यांची शोषणाधिष्ठीत विभागणी केली, त्यातून जातीव्यवस्था निर्माण झाली. श्रम करणार्‍या जाती हिन झाल्यात, अस्पृश्य झाल्यात! म्हणजे श्रमाचीही प्रतिष्ठा नष्ट केली व श्रमिकाचीही प्रातिष्ठा नष्ट केली गेली. ज्या सुतार-लोहार-कुंभाराला बौद्ध काळात श्रेष्ठी (शेठ) म्हणून मानसन्मान मिळाला, त्याला आज ब्राह्मणी-वैदिकांच्या प्रतिक्रांतीमुळे कुंभारड्या, धोबड्या, न्हावड्या अशी अपमानजनक नावाने हाक मारली जाते. कारण जातीव्यवस्थेत बौद्धीक व शारिरिक श्रमाची शत्रूभावी विभागणी झाली आहे. शोषणाचा मुख्य आधार झाली आहे. कष्टाचे काम निषिद्ध समजणारा ब्राह्मण तुपाशी खातो व कष्टकरी-शेतकरी उपाशी आत्महत्त्या करतो, ही या ब्राह्मणी प्रतिक्रांतीची देण आहे.
पुन्हा एकदा मानवतावादी-समतावादी क्रांतीची दस्तक दरवाज्यावर पडते आहे. तीला साद देण्याची वेळ आलेली आहे. आपण त्यासाठी किती तयार आहोत, ते प्रत्येकाने स्वतःच ओळखायचे आहे व कोणती तरी एक जबाबदारी घेऊन या क्रांती-युद्धात सहभागी व्हायचे आहे. धन्यवाद!
Page-4

------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/


No comments:

Post a Comment