बहुजननामा-89
फुले महामार्ग व जातीअंताची दिशा........!
बहुजनांनो....
!
-1-
माळी समाजाच्या दोन
वेगवेगळ्या सत्ता संपादन मेळाव्याविषयी मी लिहिले. त्यापैकी नागपूरच्या
संघ-भाजपाप्रणित माळी मेळाव्याच्या आयोजकांनी मला निमंत्रण दिले होते. निमंत्रण
स्वीकारण्याचे कारण फार अजब होते. संयोजकांनी मला फोनवर सांगीतले की, ‘‘तुम्ही जे
बहुजननामात कडक भाषेत लिहीतात, तेच तुम्हाला इथे भाषणात बोलायचे आहे. पेशवा आणी
सरंजामदारांच्या नादी लागलेले माळी व त्यांचे नादाड नेते या सर्वांची चंपी
करण्याची हिम्मत फक्त तुमच्यातच आहे. तुम्ही अवश्य या.’’ त्यांनी
ठरविल्याप्रमाणे माझे दोन्हीकडच्या प्रवासाचे रेल्वेचे एसी बुकींग करून पाठवीले,
विशेष प्रयत्न करून त्यांनी दोन्ही तिकीटांचे रिझर्वेशन कन्फर्मही करून दिले.
राहण्याचीही व्यवस्था केली. एवढं सगळं झाल्यावर मी त्यांना कार्यक्रम पत्रिका
व्हाट्सपवर पाठविण्याची विनंती केली. त्यांनी ती एकदिवस आधी पाठवली. कार्यक्रम
पत्रिकेत माझे नावच कुठे छापलेले नव्हते. अर्थात माझे जाणे रद्द झाले.
कार्यक्रम
पत्रिकेतून माझे नाव गायब करण्याचे उद्योग यापूर्वीही झालेले आहेत. महाराष्ट्रातील काही सरंजामदार व
पेशवा यांच्या हिट-लिस्टमध्ये माझे नाव आहे. त्यामुळे
माझ्यावर, माझ्या कार्यक्रमावर, माझ्या नावाचा समावेश असलेल्या कार्यक्रम-पत्रिकांवर, माझ्या
फेसबुकवर व माझ्या इतर सोशल मिडियावर 24*7*12 असा जागता पहारा असतो. आता काही मित्र
म्हणाले, ‘कार्यक्रम पत्रिकेत नाव नसले तरी, जा आणी चंपी करा!’ कार्यक्रम पत्रिकेत
नाव नसतांनाही अनेक हवसे-नवसे स्टेजवर येऊन बसतात व भाषणही करून जातात. त्यांच्याबद्दल
कोणीही आक्षेप घेत नाही, कारण ते नेहमीच ‘लाळघोटे’
बोलत असतात. चाटूगिरीचं भाषण सर्वांनाच आवडतं. पण
माझ्यासारख्या वक्त्याचे ‘कडक’ भाषेत भाषण चालू असतांना, पत्रिकेवर बोट ठेऊन माझे भाषणच बंद केले
जाऊ शकते. असा काही प्रकार घडला तर संयोजकांची अडचण होईल, एवढ्या एका कारणास्तव मी
नागपूरच्या पेशवा-प्रणित माळी मेळाव्याला जाणे टाळले.
तर मुख्य मुद्दा आहे माळी समाज
‘चिपळूणकर-गोळवलकर’ मार्गावरून फुले महामार्गावर
येण्याचा! 2018 च्या एप्रिल-मे महिन्यात 45
अंशापेक्षा जास्त तापमान असतांना डॉ. ज्ञानेश्वर गोरे, मायाताई गोरे, सुनिता काळे,
माचनवार, विलास काळे आदि फुले-आंबेडकरवादी ओबीसी नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्यस्तरीय ओबीसी जनगणना यात्रा
संपन्न केली. राज्य-यात्रेचा दौरा पूर्ण झाल्यावर
11 मे रोजी समारोपाचा कार्यक्रम आझाद मैदानावर होता. उद्घाटक बाळासाहेब प्रकाश
आंबेडकर व अध्यक्ष भुजबळसाहेब होते. या समारोप सभेचा इतिवृतांत मी
तत्कालीन बहुजननामांमध्ये लिहीला आहे. त्या सभेला अपेक्षेप्रमाणे ओबीसी उपस्थित राहीले नाहीत, यावर मी एक
बहुजननामा लिहीला, त्याचे शिर्षक होते ‘‘माळ्यांनो! षंढ झालात का?’’ तेव्हा
केवळ शिव्या देऊन आम्ही स्वस्थ बसलो नाहीत. आपण अजून जास्त धडाडीने काम केले
पाहिजे, अशी प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा कामाला
लागलो. बैठका, मेळावे, धरणे आंदोलने, मोर्चे, व्याख्याने असा धडाका लावला. पायाला
भींग्री लावून महाराष्ट्र 3-4 वेळा पालथा घातला. ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती
स्थापन करून ओबीसीकरणाच्या मराठा-आरक्षणाविरोधात
जीवाची पर्वा न करता लढलोत. काहिही करून माळीसकट संपूर्ण ओबीसी समाजाला
फुले-मार्गावर आणलेच पाहिजे, यासाठी आम्ही जीव धोक्यात घालून मेहनत घेतली. या
आमच्या कष्टाचे फळ आम्हाला 29 नोव्हेंबर 2018 रोजीच्या आझाद मैदानावरील ओबीसी धरणे
आंदोलनात व 25 मार्च 2019 च्या आझाद मैदानावरील मोर्च्यात बर्यापैकी समाधानकारक
दिसले. हे झाले फुले मार्गावर येणे. परंतू माळी फुले महामार्गावर येणे म्हणजे काय, हे आपण समजून घेतले पाहिजे.
-2-
जातीचे कार्यक्रम, कॅटेगिरीचे कार्यक्रम घेऊन त्यांचे फुले-आंबेडकरी प्रबोधन
करणे, अशा कार्यक्रमांना जनजागृतीचे कार्यक्रम म्हणतात. हे कार्यक्रम स्व-जातीच्या नेतृत्वाखाली अथवा स्व-कॅटेगिरीच्या नेतृत्वाखाली
होत असतात. ब्राह्मण-क्षत्रिय-सरंजामदार-वैश्य या जातीतील व्यक्तीला
खालच्या जातींनी नेता मानणे, त्यालाच मते देणे व निवडून आणणे; ही झाली जातीय
गुलामगिरी! आणी आपल्याच जातीच्या नेत्याच्या सभेला जाणे, आपल्याच जातीच्या
माणसाला मते देणे, ही झाली जात-जागृती! आणी कनिष्ट जातीच्या पक्ष
नेतृत्वाखाली काम करणे याला म्हणतात, डिकास्ट होणे. जात्यंतक फुले मार्गावर
येण्यासाठी ही पहिली कसोटी आहे. सर्वात मोठी गोष्ट ही की, फुले-आंबेडकरी सत्यशोधक
विचारधारा स्वीकारून सर्व जातजमातीय व श्रमिक वर्गीय संघटन उभारणे व
जातवर्गस्त्रीदास्यअंतक समाज निर्मीतीसाठी कार्य करणे, याला म्हणतात फुले
महामार्गावर येणे.
अल्पस्वरूपात का
होईना परंतू माळी समाज आता फुले महामार्गावर येण्याची सुरूवात
झाली आहे.
माझ्यासारखे लहान-मोठे कार्यकर्ते जे काम करीत आहेत, त्यांच्या कष्टाला फळ येण्यास
सुरूवात झाली आहे. आमचे हे माळी समाजाबद्दलचे सर्व विश्लेषण वाचून मराठा सेवा
संघाच्या एका कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आली- ‘आमच्या मराठा समाजाने हेच काम 25
वर्षांपूर्वीपासूनच करीत आहे. मराठा सेवा संघाची (मसेस) स्थापनाच मुळी
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांवर झालेली आहे. मराठा सेवा संघाने मराठा जातीतून
अनेक पुरोगामी विचारांचे लेखक, वक्ते, संशोधक तयार केले. ते ब्राह्मणांवर व
त्यांच्या विचारांवर अक्षरशः तुटून पडतात. खेडेकर साहेबांच्या पुस्तकाच्या विरोधात
कोर्टात केसेस चालू आहेत. आम्ही भांडारकर फोडले, दादू कोडंदेव तोडला. ब्राह्मणशाही
नष्ट करण्याचे इतके आक्रमक कार्य मराठा व्यतिरिक्त दुसरी कोणतीही जात करीत नाही.’
या मराठा
कार्यकर्त्याचे म्हणणे प्रथमदर्शनी लगेच पटते. परंतू जात्योन्नती आणी जातीअंत यांच्यातला
फरक ज्याला कळत नाही, असा सामान्य कार्यकर्ता भूलभूलैय्याला कसा बळी पडतो, त्याचे
उत्तम उदाहरण म्हणजे हा मराठा कार्यकर्ता होय! इतिहासाची साक्ष काढली तर नेमकी
दिशा उलटीच आहे. फार प्राचिन काळातील ब्राह्मण विरूद्ध क्षत्रिय सत्तासंघर्षाची
उदाहरणे मी देणार नाही. परंतु अगदी अलिकडची उदाहरणे पाहिली तरी या दोन उच्चवर्ण-जातीतील
सत्तासंघर्ष कसा मतलबी आहे, ते कळते. वर्ण-जातीव्यवस्था पक्की करून
ब्राह्मणशाहीचे वर्चस्व अधिकाधिक मजबूत करणे यासाठी या दोन्ही उच्चवर्ण-जाती सतत
सतर्क राहून काम करीत असतात.
तात्यासाहेब
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत अभावानेच एखादा मराठा होता. बहुतेक सर्व दिग्गज
मराठा हे टिळकांसोबत काम करीत होते, असे आपल्याला डॉ. य.दि. फडके सांगतात. सत्यशोधक
या जात्यंतक चळवळीत मोठ्या प्रमाणात शूद्रादिअतिशूद्र जाती व कामगार वर्ग काम करीत
होता. ही चळवळ याच स्वरूपात राजकीय क्षेत्रात उतरली असती तर निश्चितच जात्यंतक
राजकीय पक्ष म्हणून देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली असती. परंतू राजकीय
फायद्यापोटी या चळवळीत जसजसे मराठा-सरंजामदार प्रवेश करते झालेत, तसतसे मराठा
वर्चस्व वाढत गेले. परिणामी या चळवळीतून शूद्रादिअतिशूद्र हद्दपार होत गेलेत.
सत्यशोधक मराठ्यांनी टिळकांविरूद्ध व एकूणच ब्राह्मणांविरूद्ध आक्रमक भुमिका
घेतली. सत्यशोधक पक्ष स्थापन करण्याऐवजी ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला. या
भुमिकेमूळे त्यांचे राजकारणातील एकजातीय उपद्रव-मूल्य वाढले. त्यातून पुढे ब्राह्मण-मराठा
तह झाला. आणी नंतर हे सर्व सत्यशोधक-मराठे ‘सत्ता शोधत-शोधत’ ब्राह्मणी
कॉंग्रेसमध्ये जाऊन विलीन झालेत. 70 वर्ष ‘बहुजन’ नावाने सत्ता भोगणारे मराठे
आज भाजपामध्ये जाण्यासाठी पेशव्यांच्या दारी कसे रांगेत उभे आहेत, हे आपण आज पाहात
आहोतच.
-3-
तर मराठा सेवा
संघाच्या (मसेस) कार्यकर्त्याने उपस्थित केलेला मुद्दा हा होता की, स्थापनेपासूनच
म्हणजे गेल्या 25-27 वर्षांपासून मसेस ब्राह्मणशाहीविरोधात लिहीतो, बोलतो व लढतो
आहे. आणी माळी समाजाचा एक मेळावा झाला तर तो तुम्हाला क्रांतीकारक वाटतो. हे कसे,
असाही प्रश्न त्याने विचारला. मराठा समाजाची भुमिका कितीही पुरोगामी व क्रांतिकारक
वाटत असली तरी ती केवळ जातीचे उपद्रवमूल्य वाढवून जातीसाठी फायदा करून घेण्यासाठी
आहे, हे इतिहासात अनेकवेळा सिद्ध झाले आहे. तुम्ही जेव्हा ब्राह्मणांच्या विरोधात
बोलतात, तेव्हा तुमची भुमिका जात्योन्नतीची न ठेवता जातीअंताची हवी. जर ती तशी
असती तर तुम्ही इतर जातीतल्या पुरोगामी विचारवंत व लेखकांना सोबत घेतले असते. पण
असे होत नाही. आतापर्यंत जेवढी अधिवेशने मसेसची झालीत, त्यापैकी एखाद-दुसरा
अपरिहार्य अपवाद वगळला तर मसेस ने कधीही ओबीसी-दलित-आदिवासी विचारवंत-नेत्यांना
स्टेजवर घेतले नाही. मराठा आरक्षणाला आक्रमकपणे पाठिंबा देणार्या रामदास
आठवलेंपासून प्रदिप ढोबळेंपर्यंतच्या ओबीसी नेत्यांना कधीच कार्यक्रमपत्रिकेत
मानाचे स्थान मिळाले नाही. मात्र एकीकडे ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या आणी
दुसरीकडे ब्राह्मणांचे मुखंड व पेशवाईचे कारभारी असलेल्या गडकरी-फडणवीसांना
सन्मानाने प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर बोलाविले जाते. कार्यक्रमपत्रिकेतही
त्यांना सनमानाची वरची जागा मिळते.
कोण प्रमुख पाहुणा
यावर क्रांतिकारकता ठरत नाही, पण दिशा मात्र ठरते. तुमचा नेता
कोण, यावर
‘क्रांतीकारकता’ ठरते. नागपूरच्या माळी मेळाव्यात दिशा देणारा नेता गडकरी
असेल तर, ती निश्चितच ब्राह्मणवादी (प्रतिक्रांतीकारी) दिशा आहे. अरणच्या
माळी मेळाव्यात नेतृत्व स्थानी प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी होती. म्हणून
ती निश्चितच क्रातीकारी व ब्राह्मणशाहीविरोधी दिशा आहे. मराठा समाज तेव्हाच
क्रांतिकारी ठरेल जेव्हा तो प्रा. जोगेंद्र कवाडेंना नेता मानून रिपब्लिकन
पक्षाच्यासोबत राजकारण व समाजकारण करेल. भारतात कोणतीही एक जात क्रांतीकारक वा
प्रतिक्रांतीकारक होऊ शकत नाही. समान ध्येय-धोरण असलेल्या किमान दोन जाती एकत्र
आल्यात तरच क्रांती वा प्रतीक्रांती होते. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा पेशवाईची
प्रतीक्रांती व्हायची असते, तेव्हा तेव्हा ब्राह्मण-मराठा या दोन जातीच एकत्र आलेल्या
दिसतात. शूद्र व अतिशूद्र (स्पृश्य-अस्पृश्य) या दोन कष्टकरी ‘वर्ण-शक्ती’
एकत्र आल्यावरच वर्णांताची बौद्ध क्रांती व जैनक्रांती झाली. उत्तर प्रदेशात
(दलित) बसपाने कॉंग्रेस खतम केली होती व (ओबीसी) सपाने भाजप खतम केली होती. परंतू
जेव्हा या दोन्ही क्रांतीकारक शक्ती शत्रूभावी झाल्यात, तेव्हा पुन्हा भाजपने
प्रतिक्रांती करीत सत्ता बळकावली.
महाराष्ट्रात
मराठ्यांनी 1910 साली सत्यशोधक चळवळीचा व 1995 साली फुले आंबेडकरी वारसा यासाठी ‘‘उचलला’’
की, लोकशाहीतील राजकीय सत्ता केवळ दलित, आदिवासी व ओबीसींमुळेच मिळते. परंतू सत्ता
मिळाल्यावर तीचा सर्वात जास्त फायदा ब्राह्मणांना, वैश्यांना व आपल्या सरंजामदार
नातेवाईकांनाच करून देण्यात आला, असे डॉ. बाबा आढाव सिद्ध करतात. दलित, आदिवासी व
ओबीसींना तर आपल्या संवैधानिक हक्कांसाठी सतत लढत राहावे लागले. मोर्चे, धरणे,
लाठ्या खाणे व प्रसंगी छातीवर गोळ्या खाणे हाच त्यांचा गेल्या 70 वर्षांचा इतिहास
आहे. जर मराठ्यांनी तामिळनाडूतील ओबीसींप्रमाणे प्रामाणिकपणे बहुजन म्हणून राज्यकारभार
केला असता तर, आज मोठमोठ्या मराठा सरंजामदारांना भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून
भीखेची झोळी हातात घ्यावी लागली नसती.
या विषयाशी निगडीत
अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपण पुढील बहुजननामात चर्चा करीत राहू........तो
पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 29 सप्टेंबर व प्रकाशनः 30 सप्टेंबर 2019)
-------
प्रा.
श्रावण देवरे
Mobile
– 88 301 27 270
Blog
ब्लॉग
Email-
(महत्वाची
सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित
करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)




No comments:
Post a Comment