http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, October 1, 2019

Letter to Baliram Sirskar from Shrawan Deore, 2 Oct 2019


माननीय आमदार बळीराम सिरस्कर यांना
प्रा. श्रावण देवरे यांचे अनावृत्त पत्र
 2 ऑक्टोंबर 2019
माननीय आमदार बळीरामजी सिरस्कर,
                                  सत्य की जय हो!

     आपण गेल्या 10 वर्षांपासून ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून भारिप-बहुजन महासंघात व वंचित बहुजन आघाडीत काम करीत आहात. पक्षातर्फे आपण आमदार म्हणून 10 वर्षे विधानसभेत बाजू मांडत आहात. माळी समाजाच्या व इतर ओबीसी कार्यक्रमात मी आपल्या पुरोगामी भुमिकेबद्दल अनेकवेळा गौरवोद्गार काढले आहेत. दलित व ओबीसी सामाजाला एकत्र जोडणारा दुवा म्हणून मला आपल्याबद्दल नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे.
     नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूकीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीने तिकीट नाकारल्याचे प्रसिद्धीमाध्यमातून कळले. आपण पक्षाचे एकमेव व विद्यमान आमदार असतांना आपल्याला तिकीट नाकारले गेले, याबद्दल आपणासकट समस्त ओबीसी बांधवांना वाइट वाटणे स्वाभाविक आहे. अशा दुखःद प्रसंगी आपण भावनिक व व्यक्तिगत होऊन काही चूकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाटते. म्हणून ओबीसी चळवळीतील एक कार्यकर्ता व आपला हितचिंतक म्हणून आपल्याला हे पत्र पाठविण्याचे धारिष्ट्य करीत आहे.
     तिकिट नाकारल्यानंतरही आपण निवडणूकीसाठी फॉर्म भरला आहे. म्हणजे आपण पक्षाविरोधात बंडखोरी करीत निवडणूक लढविणार, हे स्पष्ट झाले आहे. याबाबत मी आपणास एवढेच सांगू इच्छितो की, आपण पक्षाशी बांधील राहावे व संयम ठेवून निर्णय घ्यावेत. तुम्ही केवळ एक व्यक्ती नाहीत. तर ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून एक ‘शक्ती’ आहात. ही शक्ती पेशव्यांना मदतकारक ठरेल असा निर्णय घेऊ नका.
     आज महाराष्ट्रात पेशवा व सरंजाम या दोन जातींनी पुन्हा दुसर्‍यांदा युती केल्यामुळे पेशवाईचे पुनरूज्जीवन झालेले आहे. महाराष्ट्रासकट सर्व भारतातील दलित-आदिवासी-ओबीसी-अल्पसंख्यांकांना वेठबिगारीच्या खाईत लोटण्याचे काम सुरू झालेले आहे. जातीव्यवस्था नष्ट करणारे दलित-आदिवासी-ओबीसींचे पॉझिटिव्ह आरक्षण खतम केले जात आहे व जातीव्यवस्था मजबूत करणारे पेशवा-सरंजामदारांचे निगेटिव्ह आरक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या पेशवाईच्या संकटाला शह देण्यासाठी दलित-आदिवासी व ओबीसींनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. अशा कठीण समयी आपण केवळ व्यक्तीगत अन्यायाकडे न पाहता व्यापक व लांब पल्ल्याचा विचार करून दलित-ओबीसी ऐक्य अबाधित ठेवावे व त्यासाठी आपण पक्षविरोधी बंडखोरी करण्याचा निर्णय रद्द करावा. आपण असा निर्णय घेतला तर आपल्या ह्या त्यागाची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या त्यागातूनच क्रांतीची बीजे पेरली जातात व पुढच्या पीढीला प्रेरणा देत असतात. जात्यंतक चळवळीच्या इतिहासात आपण ‘त्यागमूर्ती’ म्हणून ओळखले जाल. वंचित बहुजन आघाडीत अनेक प्रामाणिक कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यापैकी अनेकांना तिकीट नाकारले गेले असेल. राजकारणात पक्ष नेत्वाकडून काही चूका होऊ शकतात. आजघडीला त्याचा बाऊ न करता या सर्व अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की, त्यांनीसुद्धा बंडखोरीचा विचार न करता पक्षासोबत राहून काम करावे व जास्तीतजास्त आमदार वंबआतर्फे निवडून आणावेत, ही विनंती.
     बळीराम जी, आपणही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकाल व त्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा करतो.  धन्यवाद!
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-



No comments:

Post a Comment