http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, June 3, 2020

115 BahujanNama cream2 Lokmanthan 6June20


बहुजननामा-115

क्रिमी लेयरः साय कशी नासते? (भाग-2)
-1-
दूध जेव्हा थंडपणे एखाद्या भांड्यात पडलेले असते, तेव्हा त्याच्यावर साय (क्रिम) येत नाही. त्या दुधाला अग्नीवर ठेवल्यानंतर क्रिम वर येण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याचप्रमाणे पिढ्यांपिढ्या सुस्त पडलेल्या समाजाला सुरूवातीला उब मिळते, तेव्हा तो हळूहळू जागा होतो. नंतर ही उब आगीचे रूप घेते तेव्हा त्या समाजात प्रचंड घुसळण होऊन बाह्य व आंतरिक संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष जीवघेणा असतो. भारतात जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीत सुस्त पडलेल्या दलित+आदिवासी+ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी संतांच्या प्रदिर्घ परंपरेने अध्यात्मिक उब दिली. त्यानंतर तात्यासाहेब महात्मा फुले, शाहू राजे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाचा भडाग्नी देऊन जातीय जाणीवा जागृत केल्यात. या संघर्षातून शिक्षण व प्रतिनिधित्वासारखे हक्क मिळालेत. केवळ हक्क मिळवून चालत नाहीत. एखादा महापुरूष तुम्हाला ते मिळवून देऊ शकतो, परंतू ते हक्क उपभोगण्यासाठी जी किमान पात्रता लागते, ती कमविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पराकोटीच्या यातना सहन कराव्याच लागतात. अशा प्रदिर्घ यातनामय घुसळणमुळे शूद्रादिअतिशूद्र समाजातून क्रिम तयार झाले आहे.
हे क्रिम म्हणजे काय? तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या भाषेत सांगायचे तर ते
म्हणतात- ‘प्रत्येक जातीतून विद्वान निर्माण झाले पाहिजेत.’ कारण हे विद्वानच आपापल्या जातीचा शास्त्रशूद्ध अभ्यास करतील, जातीचा इतिहास व संस्कृती शोधून काढतील, त्यातून जातीचे दुःख व त्याचे निवारण करण्याचा मार्गही शोधतील. आपापल्या जातीचे प्रबोधन करून जनतेला सुशिक्षित बनवतील. शासन, प्रशासन, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रात प्रवेश करून आपल्या जातीला सक्षम बनवतील. आणी सर्वात शेवटी शुद्रादिअतिशूद्र जातीतील अनेक विद्वानांच्या मंथनातून जात्यंतक तत्वज्ञानाची निर्मिती होईल. त्या जात्यंतक तत्वज्ञानाच्या आधारावर लोकशाही मार्गाने देशाच्या राजकीय सत्तेत प्रवेश करतील. सत्ता हातात आल्यावर देशपातळीवर जात्यंतक प्रबोधनासाठी विद्यापीठांची निर्मिती हाती घेण्यात येईल. संसदेत जात्यंतक कायदे करतील, त्या कायद्याची कडक अमलबजावणीही करतील. अशा प्रकारे जातीव्यवस्था नष्ट करणारी लोकशाही क्रांती करतील. अशा प्रकारच्या क्रांतीसाठी जात्यंतक शिक्षण घेतलेला मध्यमवर्ग मोठ्या संख्येने निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी शिक्षण, प्रशासन व शासनात संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाचा (आरक्षणाचा) आग्रह धरला. मार्क्सनेही वर्गांतक क्रांतीतील मध्यम वर्गाचे हेच योगदान सांगीतलेले आहे. मार्क्स अशा मध्यमवर्गाला ‘पेटी-बुर्ज्वा’’ क्लास म्हणतो.
-2-
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाच्या प्रभावामुळे विविध मागास जातीत असा मध्यम वर्ग वेगाने आकार घेत होता. त्याच प्रमाणे ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य या प्रस्थापित सत्ताधारी जातीतूनही शिक्षित उच्च व मध्यम वर्ग निर्माण होत होता. आपल्या हातून सामाजिक व आर्थिक सत्ता निसटून जात असल्याची रास्त भीती त्याच्या मनात घर करून बसली. म्हणून तो शांत बसणे शक्य नव्हते. त्यानेही जातीव्यवस्था भक्कम कशी होईल, यासाठी प्रयत्न सुरू केला. रा.स्व. संघ हे त्या प्रयत्नाचे मूर्त व प्रातिनिधिक स्वरूप होय. शूद्रादिअतिशूद्र जातीतून मध्यमवर्ग तयार होत असतांना तो क्रांतिकारी बनणार नाही, यासाठी या उच्चजातीय उच्च व मध्यम वर्गाने उपाय योजना सुरू केल्यात.
पहिली उपाय-योजना ही होती की, त्यांनी आपल्या ताब्यातील शिक्षणव्यवस्था पूर्णपणे वैदिक-ब्राह्मणवादी बनवीली! म्हणजे ‘ग’ गवताचा शिकविण्याऐवजी ‘ग’ गणपतीचा शिकविला गेला. भ-भटजीचा, य-यज्ञाचा शिकविला मात्र चूकूनही म-महात्मा फुलेचा, छ-छत्रपतीचा, ब-बळीराजाचा, भ-भन्तेचा शिकविला नाही. पहिल्या इयत्तेपासून सुरू झालेले ब्राह्मणी शिक्षण थेट पदवी-शिक्षणापर्यंत जाणीवपूर्वक ब्राह्मणी कु-प्रबोधनाने ओतप्रोत भरलेले आहे. शाळा-कॉलेजेस मधून जाती-द्वेषाचा खरा इतिहास शिकविण्याऐवजी हिंदू-मुस्लीम द्वेषाचा खोटा इतिहास शिकविला गेला. त्यामुळे शूद्रादिअतिशूद्र जातीतून जो शिक्षित मध्यमवर्ग तयार झाला तो जात्यंतक बनण्याऐवजी ब्राह्मणी छावणीचा बिन-पगारी शिपाई बनला. दुधावर ही अशी साय निर्माण होत असतांनाच तीला नासविण्याचा कार्यक्रम राबविला गेला.
परंतू, सत्ताधारी जितका जास्त ताकदवान तितका तो जास्त भित्राही असतो. एक सामान्य काळ्या माणसाचा मृत्यु सत्ताधार्‍याचा ‘काळ’ ठरतो व त्याला जीव मुठीत घेऊन बंकरमध्ये लपून बसावे लागते. वैदिक-ब्राह्मणांनी शूद्रादिअतिशूद्र जातीतील साय कितीही नासवली असली तरी अचानक एखाद्या घटनेचा स्फोट होऊन दुधाची रूटीन तापविण्याची प्रक्रिया बदलेल व त्यातून एखादा क्रांतिकारी विषाणू निर्माण होऊन हाहाःकार माजवून देईल, अशी भिती सतत वैदिक-ब्राह्मणांच्या मनात घर करून बसलेली असते. चार्वाक, बुद्ध, महावीर, फुले-शाहु-आंबेडकर, कांशिराम-व्हिपी सिंग असे महापुरूष प्रत्येक युगात जन्म घेतात व ब्राह्मणीव्यवस्थेला खिळखिळी करून सोडतात.
-3-
व्यक्तीमधील क्रांतिकारी वर्गजाणिवा वा जात जाणिवा कृत्रिम मार्गाने दडपून प्रस्थापित व्यवस्थेचे गुलाम बनविता येते. मात्र नेणीवेला कोणत्याही मार्गाने दडपून ठेवता येत नाही. कारण ती सुप्त असते. भांडवलशाहीचे अपत्य असलेला फिडेल कॅस्ट्रो अचानक साम्यवादी क्रांतीचा नेता बनतो व साम्राज्यवादी बलाढ्य अमेरिकेला सळो की पळो करून सोडतो. ब्राह्मणी कॉंग्रेसमध्ये घडलेले व्हिपी सिंग अचानक ‘‘ओबीसी डॉमिनेटेड’’ जनता दलाशी युती करतात व मंडल अमलबजावणीची क्रांती करतात. या मंडल क्रांतीमुळे राजकीयदृष्ट्या जागृत झालेला ओबीसी वैदिक ब्राह्मणांचे राजकारण 25 वर्षांपर्यंत खिळखिळे करून सोडतो.
शूद्रादिअतिशूद्र जातीतील मध्यमवर्गीय ‘साय’मधून राजकीय महत्वाकांक्षी व्यक्ती निर्माण होत असतात. त्यांना नेता बनवीले जाते. ते ब्राह्मणवाद्यांच्या नियंत्रणात राहावेत म्हणून अनेक उपाय-योजना आखल्या जातात. शूद्रादिअतिशूद्र जातीतून नेते निर्माण करणे ही वैदिक ब्राह्मणांची संवैधानिक मजबूरी आहे. त्या शिवाय त्यांचा पक्ष सत्तेवर येऊच शकत नाही. असे नेते व्हिपी सिंगांप्रमाणे हाताबाहेर जाउ नयेत म्हणून त्यांच्या सल्लागार मंडळात, नातेवाइक मंडळात किंवा मित्र-मंडळात किमान एकतरी संघी ब्राह्मण असतोच! तो या नेत्यावर सतत लक्ष ठेवून असतो व त्याला मिसगाईड करीत असतो. प्रमोद महाजन जिवंत असते तर लोकनेते गोपीनाथजी मुंडे ओबीसी जनगणनेसाठी लोकसभेत आक्रमक भाषण करू शकले असते काय, असा प्रश्न उपस्थित केला तर, तुम्हाला याचे सविस्तर उत्तर मिळेल. आपल्या सल्लागार मंडळातून सुनिल कर्वेला बाजूला सारून प्रा. हरि नरकेंचे मार्गदर्शन घेतले म्हणूनच भुजबळसाहेब ओबीसी जनगणनेसाठी आक्रमक भुमिका घेऊ शकलेत. मात्र या धाडसाबद्दल भुजबळ मुंडेंना वैदिकी-पेशव्यांनी काय शिक्षा  दिली, हे मी सांगण्याची गरज नाही. पूर्वी पुरोहिताच्या रूपाने दरबारात वावरणारा वैदिक-ब्राह्मण सतत राजाच्या मनात धार्मिक भीती निर्माण करीत होता व राज्याला नियंत्रणात ठेवत होता. जे राजे पुरोहिताचे ब्राह्मणी वर्चस्व झुगारून देत होते, ते क्रांतिकारी ठरलेत. बौद्ध राजे या कॅटिगिरीत मोडतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी, राजे संभाजी व छत्रपती शाहू महाराज या क्रांतिकारी वर्गात मोडतात.
कितीही प्रयत्न करून ‘साय’ नासवीली तरी तिच्यातून अधून-मधून एखादा क्रांतिकारी विषाणू निर्माण होतोच व तो ब्राह्मणी व्यवस्थेची मोडतोड करतोच! मंडल-ओबीसींच्या झटक्यातून सावरायला वैदिक ब्राह्मणांना किमान पाव शतक लागले. बौद्ध क्रांतीच्या झटक्यातून ब्राह्मणांना सावरायला 700 वर्षे लागलीत. त्यामुळे या शुद्राद्रिअतिशूद्रातून ही साय निर्माणच होणार नाही, अशी उपाययोजना करावी किंवा निर्माण झालेली साय दुधापासून पूर्णपणे वेगळी काढायची व तीचे जन्मदात्या समाजघटकाशी असलेली तीची नाळ तोडायची! या कु-सिद्धांतातून क्रिमी लेयर वगळण्याचे तत्व जन्मलेले आहे.
आता या तत्वामागे नेमके कोणते तर्कशास्त्र काम करते आहे व त्याची अमलबजावणी कशी होते, हे आपण पुढील बहुजनानामात पाहू या! तो तोपर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 2 जून 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 3 जून 20)
लेखकः--- प्रा. श्रावण देवरे
 Mobile – 88 301 27
270

No comments:

Post a Comment