http://shrwandeore.blogspot.in/

Friday, October 16, 2020

124 BahujanNama Thakre Sarkar 15 Oct 20 Lokmanthan

 बहुजननामा-124

ठाकरे सरकार पाडणे हाच एककलमी कार्यक्रम!

-1-

      मराठा आरक्षणाची दिशा ही अभिजनविरोधी म्हणजे ब्राह्मणवादविरोधी होती, हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष माननीय प्रविणदादा गायकवाड यांनी दिनांक 20 सप्टेंबर 20 रोजी ‘Z-24 तास टिव्ही चॅनलला मुलाखत देतांना सांगीतले. ही भुमिका मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष माननीय पुरूषेत्तम खेडेकरसाहेबांनीच धोरण म्हणून मांडलेली होती. त्यामुळे मराठा सेवा संघाच्या तालमीतून जे अनेक अभ्यासू, संशोधक, वक्ते, लेखक व साहित्यिक निर्माण झालेत, ते सर्व ब्राह्मणी-अब्राह्मणी भुमिकेतूनच काम करीत होते. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील (शपा) यांची अनेक व्याख्याने संभाजी ब्रिगेडसाठी आयोजित करण्यात माझा स्वतःचा पुढाकार होता.


दलित+ओबीसी चळवळींनी मराठा सेवा संघाला व संभाजी ब्रिगेडला मनापासून भरघोस पाठींबा दिला. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडला दलित+ओबीसींचा पाठींबा मिळताच ‘मराठा’ नावाला एक पुरोगामी वलय प्राप्त झाले. सामाजिक चळवळीतून निर्माण झालेली शक्ती व उर्जा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वच क्षेत्रात प्रभाव गाजवित असते. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड हे पुरोगामी चळवळीतील परवलीचे शब्द झालेत. जेम्स लेन प्रकरणातील भांडारकर-फोड प्रकरणामुळे खेडेकरांचा महाराष्ट्रभर दबदबा वाढला. संस्थापक-अध्यक्ष म्हणून पुरूषोत्तम खेडेकर यांचं मंत्रालयातील वाढते वर्चस्व काही लोकांना खटकू लागलं. पश्चिम महाराष्ट्रातील काही क्षत्रिय-मराठा नेते भीडे-भटजींचे शिष्य असल्याने आगीत तेल ओतले गेले. खेडेकरांना त्यांची ‘तिरळे-कुणबी’ जात दाखवून देण्यासाठी ब्राह्मण+क्षत्रिय युतीने षडयंत्र रचले. खेडेकरांच्या घरी धाडी टाकून परकीय चलन जप्त करण्यात आले व त्यांच्यावर ‘फेरा’ ऍक्टखाली गंभीर गुन्हे नोंदले गेलेत. अर्थात हा फक्त ईशारा होता. हे सर्व घडले कॉंग्रेस पक्षाच्या मराठा मुख्यमंत्र्याच्या काळात! मात्र या षडयंत्राचे शिल्पकार होते भीडे-भटजी!

खेडेकरांना हा फक्त ईशारा होता, असे समजण्याचे कारण नाही! मराठा राज्यकर्त्यांच्या दृष्टीकोनातून तो ‘आपल्या’ माणसाला ईशारा असू शकतो, मात्र ब्राह्मणी लॉबीच्या दृष्टीकोनातून तो दुरदृष्टीचा आराखडा होता. 2014 ला केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचे पेशवा सरकार आल्यानंतर त्यांनी त्यांचा ब्राह्मणी अजेंडा राबवायला सुरूवात केली. पेशवाईच्या दृष्टीने त्यांचा सर्वात मोठा शत्रू ओबीसीच! हा ओबीसी मंडल आयोगाच्या पर्वापासून इतका ताकतवर झालेला आहे की, तो स्वतंत्र पक्ष व संघटना स्थापन करून ब्राह्मणी सत्तेला हादरे देत आहे. त्यामुळे ओबीसींचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांनी ओबीसींचे पक्ष, ओबीसींचे नेते व त्यांच्या सामाजिक चळवळी टार्गेट करायला सुरूवात केली. 2014 ला केंद्रात भाजपाचे सरकार येताच त्यांनी पहिला बळी घेतला ते लोकनायक गोपीनाथजी मुंडे यांचा! महाराष्ट्रात पेशवा सरकार स्थापन होताच दुसरा बळी घेतला तो भूजबळांचा! त्यानंतर खडसे, पंकजा, अशा सर्व ओबीसीतील दिग्गजांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवून त्यांना ‘निकामी’ बनवायचे काम जोरात सुरू झाले.

ब्राह्मणी षडयंत्राचा पुढचा टप्पा होता ओबीसींचे आरक्षण मूळातूनच खतम करणे! त्यासाठी त्यांनी गुजराथमधून पटेलांना, उत्तर भारत पट्ट्यातून जाट, राजपूत व महाराष्ट्रातून मराठा वगैरे क्षत्रिय सरंजामदार जातींना चिथावणी देऊन ओबीसी व दलितविरोधी आंदोलने सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात या कामासाठी मराठा सेवा संघाचा वापर करण्याचे ठरले. भीडे-भटजीने हे काम दूरदृष्टीने आधीच करून ठेवलेले होते. ज्याप्रमाणे जेलची भीती दाखवून भुजबळांना टार्गेट केले गेले, त्याचप्रमाणे पुरूषोत्तम खेडेकरांनाही जेलची भीती दाखवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली. कट्टर ब्राह्मणविरोधी असलेल्या मराठा सेवा संघाच्या अधिवेशनांमध्ये कट्टर संघीस्ट असलेले नीतीन गडकरी व फडणवीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहायला लागलेत. त्यांच्या ब्राह्मणी मार्गदर्शनानुसार लाखांच्या मोर्च्यांचे नियोजन संघाने आखून दिले.

-2-

मराठा सेवा संघाच्या व संभाजी ब्रिगेडच्या विरोधात गरळ ओकणारा मनुवादी मिडिया अचानक मराठा आरक्षण, ऍट्रॉसिटी ऍक्ट वगैरे मुद्दयांवर रात्रंदिन बातम्या देऊ लागला, चर्चासत्रे आयोजित करू लागला. कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणाचे भांडवल करून राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. यात पुरोगामी विचारवंत व प्रतिष्ठीत मान्यताप्राप्त असलेले माजी न्यायधिश सावंत+कोळसेपाटील यांना मराठा मोर्च्यांच्या संयोजन समितीतून अपमानास्तपदरित्या हाकलून लावले. मराठा समाजाची सर्व सूत्रे संघ-प्रशिक्षित मराठा तरूणांकडे राहतील, याची काळजी घेतली गेली. एकेकाळी तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा वारसदार म्हणविणारा मराठा समाज संघ-भाजपाच्या आहारी कसा व केव्हा गेला याचा थांगपत्ता दिग्गज मुत्सद्दी म्हणविणार्‍या पवारसाहेबांनाही लागला नाही.

तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्रात सामाजिक घडी बसवून दिली होती. या सामाजिक घडीमुळेच मराठा जात 70 वर्षे बिनधास्तपणे राज्य करीत होती. ही घडी मोडून काढण्यासाठी संघ-भाजपाने मराठा सेवा संघाला हाताशी धरले. त्यासाठी फेरा एक्टखालील दाखल केलेले गुन्हे व जेलची भीती दाखविण्यात आली. संघ-भाजपाने आखून दिलेल्या आराखड्याप्रमाणे लाखांचे मोर्चे निघालेत आणी दलित+ओबीसी+मराठा जातींची सामाजिक घडी विस्कळीत होऊन पार मोडून काढण्यात आली. मराठ्यांचं राजकीय कंबरडे मोडल्यानंतर ओबीसींचं आरक्षण नष्ट करण्यासाठी मराठ्यांना SEBC आरक्षणाचं लॉलीपॉप दाखविण्यात आलं. त्यासाठी गायकवाड आयोगाचा फार्स करण्यात आला. लाखांचे मोर्चे काढून सामाजिक घडी विस्कळीत केल्याबद्दल मराठ्यांना SEBC 16 टक्के आरक्षणाची बक्षीसी मिळाली. त्यातून मराठा वोटबँक संघ-भाजपासाठी पक्की करणे व ओबीसींमध्ये अस्थिरता निर्माण करणे हा उद्देश होता.

मराठा वोटबँकेच्या पक्क्या भरवशावर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत ‘‘मी परत येइन, मी परत येईन’’ च्या वल्गना करण्यात आल्यात. मनुवादी मिडियाने फडणवीसच सत्तेवर येणार याची खात्री करून दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व दिग्गज सरंजामदार पटाटपट पेशवाईच्या जहाजात उडी मारून गेलेत. मात्र शरद पवारसाहेबांच्या मुत्सद्दीपणामुळे फडणवीसांच्या या वल्गना हवेत विरल्या. मराठ्यांना आरक्षण देऊनही मी परत मुख्यमंत्री होऊ शकलो नाही, याचे शल्य फडणवीसांना असणे स्वाभाविक होते. मराठा वोटबँकेने दगा दिला, अशी भावना फडणवीसांची झाली. पवारसाहेबांनी सूत्रे हातात घेतलीत आणी फडणवीसांच्या नाकावर टिच्चून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनविले. त्यानंतर ठाकरे सरकार पाडण्याचे बरेच प्रयत्न झालेत. रात्री, पहाटे, दुफारी, संध्याकाळी असे सर्व प्रयत्न फसल्यावर आता शेवटचा पर्याय म्हणून पुन्हा मराठा आरक्षणावरच भीस्त आली. मराठा वोटबँकेने दगा दिला तर मराठा आरक्षण काढून घेता आले पाहिजे, अशी व्यवस्था फडणवीसांनी आधीच करून ठेवलेली होती. मराठा आरक्षण देतांनाच कायद्यात अशा फटी ठेवण्यात आल्यात की जेणे करून सुप्रिम कोर्टाला सहजपणे ‘स्टे’ देता आला पाहिजे. त्याप्रमाणे सहज स्टे आला.

-3-

मराठा आरक्षणाला स्थगिती आणणे, त्यातून मराठा मोर्चेवाल्यांना चिथावणी देणे व राज्यात पुन्हा अस्थिरता निर्माण करून उद्धव-सरकार पाडणे, हा आता एककलमी कार्यक्रम सुरू झालेला आहे. मराठा आरक्षणाची केस हायकोर्टातून सुप्रिम कोर्टात गेली तेव्हा मराठा आरक्षणाला ‘स्टे’ आला नाही, कारण तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. मात्र पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाने नवे षडयंत्र रचले. भाजपाने विनोद पाटलांना सांगून 5 न्यायधिशांच्या खंडपीठाकडे केस वर्गीकरण करण्यासाठी अर्ज केला. याचेच निमित्त साधून सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. वास्तविक स्थगिती द्यायची असती तर सुरूवातीलाच स्थगिती दिली असती. परंतू तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री असल्याने सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली नाही. मात्र पवारप्रणित ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी विनोद पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचे षडयंत्र भाजपाने यशस्वी केले. यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते की, न्याय-व्यवस्था संघभाजपाच्या खिशात आहे.

षडयंत्राचा दुसरा एक भाग पहा. भोसले-मेटे या भाजपाच्या मराठा-त्रिकूटाकडे मराठा आंदोलनाचे नेतृत्व जाणीवपूर्वक देण्यात आलेले आहे. या त्रिकूटाचे वैचारिक नेतृत्व खेडेकरांकडे आहे. पुरूषोत्तम खेडेकरांना जाणीवपूर्वक टिव्ही चॅनलसमोर आणून मराठा ओबीसीकरणाची मुलाखत द्यायला लावण्यामागे संघ-भाजपाचा मोठा हात आहे. त्यातून ओबीसीविरोधी मराठा भांडण लावणे व अराजकता निर्माण करण्याचा उद्देश आहे, हे कुणीही सूज्ञ माणूस समजू शकतो.

मराठा आरक्षणाला स्थगिती आणण्याचे षडयंत्र भाजपाने यशस्वी केले. मात्र त्याचे खापर ठाकरे सरकारवर फोडले जात आहे. भाजपाचे हे सर्व षडयंत्र पवारसाहेबांनी ओळखले, म्हणूनच त्यांनी भाजपाच्या ‘भोसले-मेटे’ त्रिकूटावर पलटवार करतांना सांगीतले की, ‘‘केंद्रात भाजपाचे सरकार आहे, पार्लमेंटमध्ये कायदा पास करून मराठा आरक्षण पक्के मजबूत झाले तर, जगातले कोणतेही सुप्रिम कोर्ट मराठा आरक्षणाला ‘धक्का’ लावू शकत नाही.’’ पवारसाहेबांच्या या तर्कसंगत व सुसंगत वक्तव्याला मिडिया प्रसिद्धी देत नाही. मात्र ‘आम्हाला आरक्षण नाही तर कोणालाच नाही’’ या मद्यधुंद फालतू बडबडीला भरपूर प्रसिद्धी दिली जाते.                       

अशा कठीण परिस्थितीत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीणदादा गायकवाड मोठ्या हिमतीने पुढे येतात व मराठ्यांची दलित-ओबीसीविरोधी संघर्षाची दिशा बदलवून तीला EWS ची जात्यंतक दिशा देण्याचा प्रयत्न करतात. प्रवीणदादा हे सत्यशोधक आहेत व स्वतः 96 कुळी मराठा असल्याने त्यांना आपल्या मराठाजातीच्या भवितव्याची चिंता असणे स्वाभाविक आहे. मात्र जे मराठा नाहीत, आणी तरीही ‘मराठा’ लेबल लावून मिरवित आहेत, अशा बाटग्यांना संघभाजपाने ‘दत्तक’ घेतलेले असल्याने मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. प्रविणदादाने पुढाकार घेऊन माननीय शरद पवारसाहेबांच्या अधयक्षतेखाली ‘‘मराठा-ओबीसी समन्वय गोलमेज परिषद’’ आयोजित करून मराठा आरक्षणाच्या चळवळीला क्रांतीकारक दिशा द्यावी. या कामात आम्ही ओबीसी-दलित नेते प्रवीणदादाच्या पाठीशी उभे राहू! मराठा आरक्षणाच्या नावाने उद्धव ठाकरे सरकार पडले तर पुन्हा पेशवाइचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुरोगामी म्हणविणार्‍यांनी पवारसाहेबांच्या व ठाकरेसाहेबांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

तुर्त येथेच थांबू या! पुढील मुद्दे पुढील बहुजननामात!!

      सत्य की जय हो!

 (लेखनः ऑक्टोंबरबर व प्रकाशनः दैलोकमंथन ऑक्टोंबर 2020)

                                           ------- प्राश्रावण देवरे
                                  
Mobile – 88 301 27270

ईमेलः- s.deore2012@gmail.com

 Blog ब्लॉग Link-  https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment