http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, May 1, 2019

68 BahujanNama Niyati Nete 28 April 2019 Lokmanthan


अडुष्ठावी खेप ......!  
             ( दै. लोकमंथन, रविवार28 एप्रिल 2019च्या अंकात प्रसिद्ध )
 बहुजननामा-68
नियती आणी नेते
बहुजनांनो!
उद्योजक श्रीराम मुंडे यांची सुपुत्री दुर्गा व विष्णू यांचा आंतरजातीय विवाह 25 एप्रिलला पुण्यात संपन्न झाला. या विवाह समारंभात अचानक आमचे जुने मित्र भेटलेत. बीडचे माजी शेकाप आमदार जनार्दन तुपे हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी व्यक्तीमत्व. अगदी दिलखुलास वागणे, साधी राहणी. 25 वर्षानंतर आजही मला त्याच पांढर्‍या पायजमा, शर्टात दिसले. गळाभेट झाल्यावर चर्चा राजकीय विषयाकडे सरकली. निवडणूक निकालांचा अंदाज देतांना अनेक लोक काय-काय आकडे सांगतात त्याप्रमाणे मीही अंदाज व्यक्त करीत म्हणालो की, 150 ते 200 खासदार भाजप आघाडीचे निवडून येतील. त्यावर ते म्हणाले की, 150 च्यावर नाहीच! आमचा दोघांचा अंदाज जवळपास होता.
चर्चा पुढील प्रधानमंत्र्याच्या संभाव्यतेकडे वळली. 200 च्या आत जागा आल्यात तर मोदी प्रधानमंत्री होत नाहीत. गडकरींचे नाव पुढे येईल, परंतू पाठींबा कोण देईल? 2014 सालचा त्यांचा फॉर्म्युला हाच होता. गडकरींना पुढे करून विविध छोट्या राजकीय पक्षांचा पाठींबा मिळविण्याचा प्रयत्न होईल आणी तरीही संख्या 272 पर्यंत पोहोचत नसेल तर मायावतीजींच्या नेतृवाखाली ‘जातीअंतक’ आघाडीचे अल्पमताचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा भाजपात मोठी उलथा-पालथ होण्याची शक्यता आहे. विविध भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली अटक टाळण्यासाठी मोदी किमान निम्मे खासदार घेऊन बाहेर पडतील व बहनजींच्या सरकारला पाठींबा देऊ शकतील. आजवर कॉंग्रेस-भाजपाने सत्तेवर असतांना हेच राजकारण केले आहे. लालूजी, मुलायमजी, मायावतीजी, भुजबळ वगैरेंना याच दहशतीत ठेऊन सत्तेचे राजकारण होत आले आहे.
तुपेंनी माझ्या मुद्द्याला दुजोरा दिला. परंतू आर.एस.एस. ची कट्टरता अंगी मुरलेले
मोदी असे काही करतील, हे संभवत नाही. हे वरवर कितीही खरे वाटत असले तरी नियतीच्या कसोटीवर ते टिकत नाही. नियतीचा द्वंदात्मक प्रवाही मार्ग वारंवार हेच सिद्ध करतो की, सत्ताधारी वर्ण-जात-वर्गात फुट पडल्यावरच कोणत्याही परिवर्तनाची वाट मोकळी होत असते. बौद्ध काळात भिक्खूसंघप्रणित महाप्रबोधनाच्या लाटेत तत्कालीन राज्यकर्त्यांमध्ये फुट पडली. अनेक राजे जैन वा बौद्ध धम्माच्या आश्रयाला आलेत व त्यानंतरच वर्णांतक क्रांतीची वाट मोकळी झाली. आज पुरोगामी वा जातीविरोधी पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जात्यंतकचा साधा उल्लेख नसला, तरी नियतीच्या जाहीरनाम्यात जात्यंतक क्रांतीचा अजेंडा प्रथम क्रमांकावर आहे. प्रस्थापित सत्ताधारी जात-वर्गात दर दहा वर्षांनी फुट पडत असते, तेव्हा तेव्हा जात्यंतक चळवळ वाट मोकळी करीत पुढे सरकत असते.
1967 साली कॉंग्रेसमध्ये मोठी फुट पडली. इंडिकेट-सिंडिकेटच्या फुटीत मोठ्या प्रमाणात ओबीसी नेते खासदार आमदार झालेत व त्यातील काही मुख्यमंत्रीही झालेत. याच काळात लोहियांची ‘पिछडा पावे सौ मे साठ’ ही घोषणा बरीच जागृती करून गेली. कांग्रेसमध्ये दुसर्‍यांदा मोठी फुट पडली 1977 साली व त्यातून मंडल कमिशनची नियुक्ती झाली. मात्र त्याच्या अमलबजावणीची शक्यता दिसताच ते सरकार प्रयत्नपूर्वक पाडण्यात आले. सत्ताधार्‍यांतील 1989 च्या तिसर्‍या फुटीत मंडल आयोगाच्या अमलबजावणीची क्रांतीच झाली. आता फुटण्याची पाळी भाजपाची आहे. ती फुटली तरच पुढील जात्यंतकची वाटचाल गतिमान होईल. त्यासाठी परिस्थितीही जुळून येत आहे. 2019 च्या या सार्वत्रिक निवडणूकीत हँग पार्लमेंट येणे निश्चित आहे. भाजप आघाडीला 150-200 च्या दरम्यान अडकवणे व कॉंग्रेस आघाडीला 100 च्या आत रोखणे शक्य झाले तर ब्राह्मण-क्षत्रियांच्या या उच्चजातीय-वर्गीय आघाडीला 300 जागा मिळू शकतात. परंतु सत्ता स्थापण्यासाठी ते एकत्र येऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या एकत्र येण्यातच त्यांचा दोघांचा मृत्यु आहे. सत्ता टिकविण्यासाठी ते एकमेकांचा कधी उघड तर कधी छुपा पाठींबा ते घेतील. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी ते एकत्र येऊ शकत नाहीत, हेही तेवढेच सत्य आहे. दलित, आदिवासी व ओबीसींच्या विरोधात षडयंत्रे करतांना व ती षडयंत्रे यशस्वी करतांना ते उघडपणे एकमेकांना पाठींबा देतात. मंडलविरोधी कारवाया व बाबरी भंजनाच्या षडयंत्रात कांग्रेस भाजपा एकमेकांना उघडपणे पाठींबा दिलेला आहे. डावी, पुरोगामी, जातीविरोधी वा जात्यंतक आघाडी 200 जागांपर्यंत मजल मारू शकते. अशा वेळी मोदी हा एकमेव असा ‘फॅक्टर’ आहे की जो नियतीच्या गळाला लागू शकतो.
 पुरोगामी व जातविरोधी आघाडीत डावे, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू हे घटक यावेळी कॉंग्रेस-भाजपाकडे जाणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे पुरोगामी, डावे व जात्यंतक आघाडीला यावेळी सत्तेत येण्याची फार मोठी संधी आहे. आणि जर ती सत्तेत आली तर मोदी आपली अटक टाळण्यासाठी निश्चितच भाजपाला उभा फोडतील व 50-60 खासदार घेऊन ते जात्यंतक आघाडीला भक्कम करतील. मोदी जरी कट्टर आर.एस.एस. केडर असले तरी गेल्या 5 वर्षात आपला ‘बाहुले’ प्रधानमंत्री म्हणून झालेला वापर ते विसरणार नाहीत. ओबीसी-पिछडा म्हणून मते मांगतांना मागच्या 5 वर्षात ओबीसीविरोधात व एकूणच आरक्षणाविरोधात घेतलेले निर्णय आपल्या अपरोक्ष घेतले गेलेत व त्यामुळेच आपले सरकार पुन्हा सत्तेवर आले नाही, याची खद खद व्यक्त करण्यासाठी ते पक्ष फोडण्याचे महान कार्य निश्चित करतील.
चंद्रगुप्ताला चाणक्याच्या ब्राह्मणी जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याकाळी जैन धर्माचा आधार भक्कम होता. संत ज्ञानेश्वरांना ब्राह्मणी छळापासून मुक्ती करून घेण्यासाठी तत्कालीन अखिल भारतीय असलेला अब्राह्मणी नाथ धर्म स्विकारावा लागला. छत्रपती शिवरायांना ब्राह्मणी धर्माच्या कारावायांपासून मुक्त होण्यासाठी तत्कालीन अब्राह्मणी शाक्त धर्म उपयोगी पडला. मसिहा ठरलेल्या व्ही.पी. सींगांना ब्राह्मणी कॉंग्रेस सोडतांना तत्कालीन समाजवादी, ओबीसी व दलित नेते फार मोठे ‘‘आधार’’ वाटले. त्याचप्रमाणे आता संघ-भाजपाचे मुख्य शक्ती स्थळ ठरलेल्या ‘मोदी-शक्ति’ला संघ-भाजपाविरोधात बंड करण्यासाठी तुमचा आधार वाटावा, एवढ्या एका क्रांतीकारी कारणासाठी तरी तुम्ही सर्व डावे, पुरोगामी व जात्यंतक नेत्यांनी एकत्र यावे व रहावे सुद्धा!
मी नियती हा शब्द वापरलेला पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. परंतू मी तो  जाणीवपूर्वक वापरीत आहे. नेता म्हणजे पुढे नेणारा! पण आपल्या देशातील पुरोगामी व जातीविरोधी नेत्यांना पुढे जाणे माहीतच नाही. उधळलेल्या दिशाहीन घोड्यावर कसेबसे स्वार होणे व त्याला नियंत्रणात आणणे म्हणजे सत्तेवर बसणे, एव्हढेच त्यांना माहीत आहे. अभ्यास करून काही कार्यक्रम आखणे त्यातून धोरण, डावपेंच आखून जात्यंतकची निर्णायक लढाई उभारणे त्यांना माहीतच नाही. शत्रूने लढाई लादलीच तर ती सुरू होण्याआधीच तडजोडी करणे, तह करणे, गद्दारी-फितूरी करणे, असे सगळे धंदे यांना सूचतात. अशा वेळेस नियती यांच्या ढूंगणावर लाथ मारून त्यांना पुढे ढकलते. या ठिकाणी तुम्ही नियतीला ‘‘बदलती परिस्थिती’’ इतक्या मर्यादेपर्यंत समजू शकता. परंतू नियती म्हणजे नियतीच! तीला पर्यायी शब्द नाही.
नियतीच्या मनात काय आहे, हे ओळखून आपले डावे, पुरोगामी व जात्यंतक नेते करतील व आपले स्वंयभू नेतृत्व सिद्ध करतील. अशी अपेक्षा करू या! नियतीकडून ढुंगणावर लाथ खाण्याचे यावेळी तरी टाळतील, अशी आशा व्यक्त करून सर्वांना कडक जयजोती, जयभीम! सत्य की जय हो!!
     ------- प्रा. श्रावण देवरे
           Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
            Email- s.deore2012@gmail.com

Lokmanthan Link



No comments:

Post a Comment