http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, May 5, 2019

69 BahujanNama Fukti gonda 5May19 Lokmanthan & Samar Dhule


बहुजननामा-69
ओबीसींमधील न्यूनगंड अर्थात
दये तीले कये नी फुकटी गोंडा घोये..!
बहुजनांनो!
खान्देशात अहिराणी भाषेत एक सुप्रसिद्ध म्हण आहे. ‘दये तीले कये नी फुकटी गोंडा घोये!’ या म्हणीचा स्पष्ट अर्थ असा आहे की, प्रत्यक्ष कष्ट करणार्‍यालाच कळते की, घाम गाळणे म्हणजे काय? बाकीचे निकम्मे लोक त्या दळण्यावर, त्या कष्टावर फुकाची भाषणबाजी करतात. गोंडा घोळणे म्हणजे चमकोगिरी करणे. भारतात जी जातीव्यवस्था आहे, तीचे यथार्थ चित्रण या म्हणीत (वाक्प्रचारात) आहे. कष्ट करणार्‍या, उत्पादन करणार्‍या जाती वेगळ्या, आणी त्याचे श्रेय घेऊन ते उत्पादन लुबाडणार्‍या जाती वेगळ्या! त्यासाठी या फुकट्या जातींना पोथ्या-पुराणांमधून भाकडकथा लिहाव्या लागतात व त्या भाकडकथा म्हणजेच धर्ममान्य-समाजमान्य शास्त्र होय, असे बिंबवावे लागते. त्यातूनच एक सिद्धांत प्रसवला- ‘नागरगठ्ठ्या तत्वज्ञानी असू शकत नाही.’ आणी कधीही नांगर हातात न धरलेल्या ऐतखाऊ-फुकट्या जातींनी स्वतःला तत्त्वज्ञानी म्हणून जाहीर केले, विश्वाचे नियंते म्हणून घोषित केले, पृथ्वीचेच काय, आम्ही तर देवांचेही मालक आहोत. कारण ‘‘ब्राह्मणाधिनम् मंत्र,  मंत्राधिनम् दैवत...म्हणजेच सर्व देव ब्राह्मणांच्या ताब्यात.’’ ब्राह्मणांच्या खिशात देव आणी देवांच्या खिशात तुमचे-आमचे सारे चराचर!
माणसाला असा नियंत्रित केल्यामुळे त्यातील माणूसपण वजा वजा होते व तो पुन्हा
होतो ‘पाळीव प्राणी’ म्हणजे बैल, गाय, म्हैस, हेला वगैरे वगैरे! राबराब राबायचं उत्पादन करायचं आणी फुकट्यांनी गोंडा घोळत ते पळवायचं!
माणसाला बैल किंवा म्हैस-हेला बनविण्यासाठी असाच आणखी एक सिद्धांत काम करतो. तो सिद्धांत म्हणजे- आज जे तुम्ही मिळवलेले आहे, ते तुम्ही नाही मिळविलेले, तुम्ही तर निमित्तमात्र आहात.  ‘‘तुम्हाला आज जे मिळालेले आहे ते तुम्हाला सगळं फुकट मिळाले आहे’’. या एका सिद्धांतामुळे दोन पक्षी मारले जातात. एक म्हणजे जे मिळालेले आहे, ते फुकटचे असल्याने त्याला काहीही किंमत नाही. आणी ज्यांना मिळालेले आहे ते ‘फुकटे’ असल्याने निकम्मेच आहेत. हा न्युनगंड निर्माण करून त्यांना एकूणच जगाच्या मानवी व्यवहारातून वजा करणे. जगाचे सामान्य व्यवहार म्हणजे मिळविण्यासाठी संघर्ष करणे व मिळाल्यावरही ते टिकविण्यासाठी संघर्ष करणे. संघर्ष करणे हे तर चराचर प्राणीमात्राचे नैसर्गिक मुल्य आहे. या सिद्धांतामुळे सर्वात जास्त नुकसान ओबीसींचे झालेले आहे, आजही होत आहे. मंडल आयोगाचेच उदाहरण घ्या! मंडल आयोगमुळे ओबीसी जातींना आरक्षण व शिष्यवृत्ती वगैरे मिळायला लागल्यावर सर्व नॉन-ओबीसी हुशार जातीचे लोक हा ब्राह्मणी-सिद्धांत घेऊन ओबीसींवर अक्षरशः तुटून पडलेत. ‘ओबीसींनो! तुम्हाला मंडल आयोग फुकटात मिळाला. आमच्याच जातींने तुमच्यासाठी आंदोलने केलीत’ वगैरे वगैरे! आणी काही अतिहुशार ओबीसी लोक या सिद्धांताला बळी पडलेत. हुशार होण्यासाठी अभ्यास करावा लागतो, काम करावे लागते. मात्र अतिहुशार होण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, काम तर अजिबात करण्याची गरज नसते. अशा हुशार व अतिहुशार लोकांनी एकत्र येऊन ओबीसींच्या मनात एक न्युनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
असे हुशार लोक आपली हुशारी सिद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक ऐतिहासिक दाखले विसरतात, समकालीन घटनांचं विकृत विश्लेषण करतात व विशिष्ट समाजघटकाला टार्गेट करीत त्यांच्यात न्युनगंड निर्माण करतात. यासाठी एक उदाहरण देतो. महाराष्ट्रात 1989-91 चा काळ हा शिवसेनेच्या दहशतीचा काळ होता. आमच्यासारख्या अनेक ओबीसी कार्यकर्त्यांच्या सभा, बैठका शिवसैनिकांनी उधळल्यात. धमक्या वगैरे तर नित्याचीच बाब होती. शिवसेनत राहून बंड करणे म्हणजे जीव गमावणे, असा समज दृढ करणार्‍या प्रत्यक्ष घटनाही त्या काळात घडलेल्या होत्या. त्या काळात झालेल्या ओबीसी जागृतीचा ‘आधार’ घेत माननीय छगन भुजबळांनी 17 ओबीसी आमदारांना सोबत घेऊन बंड केले व शिवसेना उभी फोडली. यामूळे त्या काळात ओबीसी चळवळीला फार मोठे बळ मिळाले. अर्थात ओबीसी जागृतीचा ‘आधार’ त्या काळात नसता तर शिवसेनेविरूद्ध बंड करण्याचे धाडस भुजबळांनी केलेच नसते. ओबीसींचा तो आधार होता व आहे, म्हणूनच भुजबळ आज जीवंत दिसत आहेत. हे असे धाडस त्याकाळी कोणी नॉन-ओबीसी नेता करू शकला असता काय? उलट त्या काळी बरेच नॉन-ओबीसी नेते भाजपा-सेनेत जाण्यासाठी रांगा लावत होते. परंतु ओबीसींना न्युनगंडात ढकलून मंडल आयोगाचे श्रेय लाटणारे नॉन-ओबीसी हुशार मंडळी अशा घटनांचे विकृत विश्लेषण करतात. ‘भुजबळांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती म्हणून त्यांनी शिवसेना सोडली’, असे वरवरचे विश्लेषण करून आपली विद्वत्ता पाजळली जाते. राजकारणात महत्वाकांक्षा नसलेला एकतरी माणूस दाखवा. राजा होण्याची महत्वाकांक्षा नसती तर, छत्रपती शिवाजी स्वराज्य स्थापन करू शकले असते काय? गायीचं व डुकराचं मांस तोंडात घ्यावं लागतं, या एकमेव कारणासाठी बंड करणारा मंगल पांडे क्रांतीकारक व स्वातंत्र्यसेनानी ठरतो, पण ओबीसींसाठी बंड करणारे भुजबळ ‘महत्वाकांक्षी’ म्हणून हीन ठरविले जातात. हा ब्राह्मणी न्याय झाला.
अशा प्रकारे न्युनगंड ओबीसींमध्ये निर्माण करण्यात काही मंडळी यशस्वी झाल्याने आज ओबीसी आपल्यालाला मिळालेले आरक्षण वाचविण्यासाठी बाहेर पडत नाही. तो पूर्णपणे षंढ बनला आहे. अनाडी, निरक्षर ओबीसींबद्दल मी बोलत नाही. ओबीसी प्राध्यापक, ओबीसी डॉक्टर वगैरे अतिहुशार लोक इतके गेंड्याची कातळीवाले आहेत की, ते बायकोच्या कुशीत घरात बसून फेबु-व्हाट्सपवर बोटं घालत राहातात व तेथूनच ओबीसींना शहाणपणा शिकवितात. पण ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानावरच्या धरणे आंदोलनात गेले पाहिजे, मोर्च्याला गेले पाहिजे वगैरे यांच्या ध्यानी-मनीही नाही. आपण जाऊ शकत नसल्यास 2-4 बेरोजगार पोरांना रेल्वे-बसचे भाडे देऊन पाठविले पाहिजे, याचा तर ते स्वप्नातही विचार करू शकत नाही. औरंगाबादला ओबीसी प्राध्यापकांचा व्हाट्सप गृप आहे. व्हाट्सपवर हे एकमेकांना प्रचंड शहाणपाणा शिकविणार्‍या पोस्ट टाकतात. हे ओबीसी प्राध्यापक इतके हरामी आहेत की, ते गावातल्या गावात आयोजित केलल्या धरणे आंदोलनात आले नाहीत. बायकोच्या साडी खरेदीसाठी फुल रजा टाकणारे हे प्राध्यापक व डॉक्टर ओबीसी धरणे आंदोलनाकडे फिरकले सुद्धा नाहीत. ओबीसींमधला न्युनगंड घालविण्यासाठी त्यांना औबीसींमधील क्रांतिकारकां इतिहास सांगीतला पाहिजे. काही उदाहरणे देतो.
केवळ ओबीसीच नाही तर, सर्व कनिष्ठ जातींच्या आरक्षणासाठी 1925 ला कॉंग्रेस सोडणारे रामास्वामी पेरियार ओबीसीच होते. तत्कालीन ‘दादा’ असलेलल्या गांधीजींच्या समोर उभे राहून भर कार्यक्रमात जाहीरपणे कांग्रेसचा निषेध करीत पेरियारांनी बंड केले. तरीही ओबीसींचा हा संघर्ष लपवून ठेवीत ओबीसी कसे फुकटे आहेत, हीच रेकॉर्ड वाजवीत राहायची! एस्सी व एस्टी आरक्षण जरी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले असलं, तरी ते टिकविण्याचं काम एकमेव रामास्वामी पेरियार यांनीच केले. बाबासाहेबांनी दलित-आदिवासींना दिलेले आरक्षण एक वर्षही टिकलं नाही. संविधान लागू होताच एका वर्षाच्या आत (1951) सुप्रिम कोर्टात पिटीशन दाखल झाली व कोणतीही दिरंगाई न करता सुप्रिम कोर्टाने सर्व आरक्षणच असंवैधानिक ठरविले. कॉंग्रेसच्या केंद्रसरकारने तत्परता दाखवीत ताबडतोब संपूर्ण देशातले आरक्षण रद्दही करून टाकले. त्यावेळी संपूर्ण देशातून एकमेव रामास्वामी पेरियार यांनी ओबीसींचे तीव्र आंदोलन उभे केले. ओबीसींचे हे आंदोलन संपूर्ण देशभर पसरले तर देशातील ओबीसी जागृत होईल, या भीतीपोटी तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूंनी ताबडतोब घटना दुरूस्ती केली व दलित-आदिवासींचे आरक्षण वाचले. ओबीसींचा हा देशव्यापी पराक्रम सांगीतला तर तोंडाला लखवा मारला जाईल काय?
मंडल आयोग लागू होण्यापूर्वी म्हणजे 1992 पूर्वी बहुतेक सर्वच राज्यात ब्राह्मण-क्षत्रिय मुख्यमंत्री होते. तामिळनाडूतील ओबीसी राज्य वगळता कोणत्याही राज्यात दलित-ओबीसी पक्ष अस्तित्वात नव्हते. देशपातळीवर मंडल आयोग लागू होताच जागृत झालेल्या ओबीसींनी आपले राज्यस्तरीय पक्ष स्थापन केले व ते सत्तेवर बसले देखील. बाबरी-भंजनाच्या पापात सामिल झालेल्या कॉंग्रेस-भाजपा या ब्राह्मणी पक्षांना आपापल्या राज्यातून उखडून फेकून दिले. हे केवळ ओबीसींमुळे घडले. त्यांच्या कार्याला सलाम करण्याएवजी त्यांना शिव्या देण्यातच धन्यता मानणारे लोक कधी सुधरणार?
आजवर या देशाचा प्रधानमंत्री फक्त ब्राह्मण क्षत्रियच होऊ शकत होता. जरी कोणी इकडचा तिकडचा झाला तर तो 5-25 दिवसातच घरचा रस्ता पकडायचा! 2014 ला ओबीसींच्या जागृत वोटबँकेच्या पार्श्वभूमीवर संघ-भाजपाने खोट्या ओबीसी-मोदींना पुढे करून निवडणूका भारी बहुमताने जिंकल्या. ओबीसींचे हे क्रांतीकरकत्व दलित-ओबीसी व डाव्या पुरोगामी पक्षांनी ओळखून जर आपापल्या पक्षांचे धोरण तयार केले असते व कामाला लागले असते, तर आज देशाला ‘खराखुरा ओबीसी’ प्रधानमंत्री मिळाला असता व त्याने बळीराजा-सम्राट अशोका-चंद्रगुप्ताप्रमाणे जातीअंतक क्रांतीची बीजे रोवली असती. पण एवढे शहाणपण कुठून यायचे? त्यापेक्षा शहाणपणाची गरज नसलेले शिव्या देण्याचे काम केले की, आपण आपोआपच पुरोगामी ठरतो.
एखाद्या व्यक्तीला दोस्त करायचे असेल तर त्यातील गुण-दोष ओळखून त्याच्यातील दोषांना कमी-कमी करीत गुणांना वाढवीत जाणे म्हणजे दोस्ती. पण नाही. आम्हीच फक्त पुरोगामी व आमच्या जातीचेच महापुरूष क्रांतिकारक! स्वजातीला कुरवाळणे व स्वजातीतील महापुरूषाचे उदात्तीकरण करण्यातच मग्न असलेल्या या जाती केव्हा रूळावर येतील?? आपल्या या अशा मुर्खपणामुळे ‘‘खरोखर बुद्धिवंत असलेली ब्राह्मण जात’’ आपल्याला महापुरूषांची स्मारके व जयंत्या-मयंत्यासारख्या ‘फालतू’ कार्यक्रमात बिझी ठेवतात. जयंत्या-पुण्यतिथ्यांना सरकारी तिजोरी मोकळी करतात. स्मारकांचे राजकारण करतात. कुणाचे स्मारक लंडनला तर कुणाचे स्मारक अरबी समुद्रात! त्यातच हे लोक खूश! आणी वर तोंड करून हे लोक ओबीसींना शहाणपण शिकविणार?
ओबीसींना शिकविण्याची गरज आहेच! पण काय शिकवायचे? ओबीसींचा क्रांतीकारक इतिहास सांगून त्यांच्यात विद्रोहाचे स्फुल्लींग पेटवायचे की त्यांना फक्त शिव्याच देऊन त्यांच्यात न्युनगंड निर्माण करायचा? ओबीसींना कडक शब्दात त्यांच्या चूका सांगणारे व शिव्या देऊन त्यांना वठणीवर आणणारे ओबीसी बुद्धीमान तयार केले पाहिजेत. खरे म्हणजे आज सगळ्या जाती-जमातीतील निर्बुद्दांना शिकविण्याची गरज आहे. एकमेकांच्या आरक्षणात घुसखोरी करणारे नालायक तर झोडून काढण्याच्या लायकीचेच! ‘‘संघ-भाजपाचे नाक’’ असलेल्या गडकरींना निवडून आणण्यासाठी आम्ही 18 लोकांनी कीती जीवाचा आटापिटा केला. जगातील ही एकमेव अशी लढाई आहे की, ज्यात शत्रूच्या सरदाराला अजिंक्य ठरविण्यासाठी आटापिटा केला गेला. ‘हे 18 निर्बुद्ध लोक केवळ आमच्या जातीचे आहेत, म्हणून त्यांना शिव्या देण्याचे काम नाही,’ असा दम मला दिला गेला. हे असे जातीप्रेम काय कामाचे? ज्याला खरोखर जातीअंताचे काम करायचे असेल, त्याला सर्वप्रथम आपल्याच जातीला जमके शिव्या देता आल्या पाहिजेत. डॉ. आ. ह. साळूखे यांना मी त्यांच्या घरी जाऊन म्हणालो होतो की, ‘मराठा समाजाला जागृत करायचे असेल, तर आधी तुम्हाला मराठा समाजाने केलेल्या घोडचूका कडक शब्दात कान पकडून सांगीतल्या पाहिजेत. मराठ्यांनी सत्यशोधक चळवळ कशी गैरमार्गाने ब्राह्मणांकडे गहाण ठेवली व त्याबदल्यात त्यांनी फक्त आपल्या 5-25 मराठा घरांण्यांसाठी ‘‘मांडलिक राज्य-सत्ता’’ कशी मिळविली, वगैरे अनेक गोष्टी कडक शब्दात शिव्या देऊन समजावून सांगीतल्या, तरच मराठा समाज सुधरेल! अन्यथा तुमच्यासारख्या विचारवंतांचा दुरूपयोग करून काही नेते आपली तुंबडी भरतील! आणि हे आज सत्य ठरले आहे! नाइलाजाने डॉ. साळूंखे सरांचे काम मला करावे लागते आहे. आणी त्यासाठी मी ‘मराठा-द्वेष्टा’ असल्याची किंमतही चूकवीत आहे.
वर्गव्यवस्थेचे प्रबोधन युरोपभर सहज पोहोचले व औद्योगिक क्रांती करून यशस्वी झाले. येथे भारतात या गल्लीतले प्रबोधन त्या गल्लीत जाऊ शकत नाही, कारण जातीच्या पोलादी भींती! यावरून किती लोकांना डोकी फोडावी लागली व किती लोकांची डोकी फुटली. अजूनही या पुढे या पोलादी जातींच्या भींतींवर किती डोकी रक्तबंबाळ होणार आहेत.
संपवतो एकदाचे! कारण कितीही प्रेमाने सांगा, शिव्या देऊन सांगा, पालथ्या घड्यावर पाणीच! कारण भारतीय माणूस ‘डोक्यावर पडलेला’ असल्याने त्याचे डोके म्हणजे पालथा घडाच! संपादकांचे फोन यायाला लागलेत. बहुजन नामा लवकर पाठवा म्हणून! बाकी उरलेले पुढच्या बहुजननामात! तरीही शेवटी हा पालथा घडा लवकर सुलथा होण्याच्या अपेक्षेत सर्वांना कडक जयजोती, जयभीम! सत्य की जय हो!!
     ------- प्रा. श्रावण देवरे
           Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
            Email- s.deore2012@gmail.com
Lokmanthan Link



No comments:

Post a Comment