http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, May 15, 2019

70 BahujanaNama MFA 12 May 2019 Lokmanthan


बहुजननामा-70
‘‘फुकटात कोणालाच काही मिळत नाही’’
     इति मार्क्स-फुले-आंबेडकर
बहुजनांनो!
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोयीसाठी भारतीय समाजाचे एकूण चार विभाग केलेत. एस्सी, एस्टी, ओबीसी व ओपन असे चार कृत्रीम विभाग केलेत. अर्थात जातीव्यवस्था कृत्रीम असल्याने तीला नष्ट करण्यासाठीचे कार्यक्रमही कृत्रीमतेच्या आधारवर असणार! माणूस जन्मतःच स्वतंत्र आहे, हा सिद्धांत मानवतेचा मुख्य आधार आहे. त्यामुळे समान संधी, समान प्रतिष्ठा मिळण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. परंतू काही कर्तृत्ववान व्यक्ती विशेषाधिकार गाजवायला लागतात आणी येथूनच सुरू होते विभागणी व उतरंडसुद्धा! ज्या कोणी व्यक्ती कर्तृत्ववान असतील त्यांनी केलेले विशेष कार्य हे सामाजिक संचिताचे फलित असते व म्हणून त्याच्यावर खाजगी मालकी स्थापन होऊ नये, अशी भुमिका घेऊन जन्माला आला ‘प्राथमिक साम्यवाद गणसमाज’! या समाजात विशेष कर्तृत्ववान म्हणून स्त्रीया असल्या व म्हणून तो स्त्रीसत्ताक समाज असला तरी पुरूष-दुय्यमता कठोर व जाचक नव्हती. समान वाटप हा या समाजाचा मुख्य आधार होता. त्यामुळे शोषण, विषमता वगैरे नव्हती. म्हणून त्याला प्राथमिक साम्यवादी गणसमाज म्हणतात.
     नांगर व पाळीव प्राण्यांच्या साहाय्याने शेती करण्याचे तंत्र पुरूषांनी शोधून काढताच स्त्रीसत्ता मावळत गेली व पुरूषसत्तेचा उगम झाला. उत्पादन संबंध बदलले, उत्पादनव्यवस्था बदलली, अर्थव्यवस्था बदलली, समाज रचनाही बदलली. मात्र सांस्कृतिक पाळेमुळे घट्ट असलेली मातृसत्ताक संस्कृती आजही जीवंत आहे. समता हा या संस्कृतीचा मुख्य आधार असल्याने विषमताग्रस्त समाजाला या मातृसत्ताक संस्कृतीची ओढ कायम राहणार आहे. औजारे व पाळीव प्राण्यांच्या साहाय्याने केलेल्या शेतीतून ‘वरकड उत्पन्न’ येताच समतेच्या शवावर शोषणावर आधरित विषमता उगम पावली. जगभरात ही शोषणाची व्यवस्था वेगवेगळे वर्गीय रूपे घेत स्थिरावली. भारतात मात्र ही विषमता वर्ण व जातीच्या मार्गाने प्रवास करीत स्थिरावली. अशा वर्णजातीव्यवस्थेला नष्ट करायचे तर समाजाचे विभाजन व संघटन नव्या कसोट्यांवर करावे लागते. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर विभाजन करून नव्या आधुनिक व क्रांतिकारक कसोट्यांवर संघटित करण्यातून जातीव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी हे विभाजन व संघटन अधिक परिणामकारक करण्यासाठी एस्सी, एस्टी, ओबीसी व ओपन असे चार विभाग पाडलेत. परंतू ही विभागणी सामाजिक शास्त्रावर उभी आहे. समान सांस्कृतिक व समाजिक हितसंबंधातून ही विभागणी केली गेली. प्रत्येक समाजघटकांचे वेगळेपण लक्षात घेऊनच ही विभागणी केली गेली आहे.
     आदिवासींची जंगलांशी निगडीत असलेली संस्कृती समान असल्याने त्या कॅटेगिरीतील
सर्व जमाती समान सामाजिक हितसंबंधानी बांधलेली आहेत. त्यामुळे त्यांचे झालेले जमाती-जमातीतील विभाजन लुप्त होत जाईल व ‘आदीवासी’ म्हणून त्यांचे संघटन एकूणच जातीअंतासाठी उपयुक्त ठरेल. तीच बाब अस्पृश्य जातींबाबत आहे. त्यांचे समाज उतरंडीतील एक समान स्थान व त्याच्याशी निगडीत त्यांची समान संस्कृती त्यांना त्यांच्यातील जातीभेद विसरायला लावेल व समान हितसंबंधांपायी ते एस्सी (दलित) कॅटेगिरी म्हणून अधिकाधिक संघटित होत जातील. जातीअंतासाठी ही गोष्ट अपरिहार्य आहे.
     ओबीसी जातींच्या वस्त्या तर अगदी एकमेकाला खेटून असतात. कुठे माळीवाडा संपतो व कुठे कोळीवाडा सुरू होतो, हे कळतच नाही. शेती व व्यापाराशी निगडीत या सर्व जाती! त्यांचे सण उत्सवही एक सारखेच! कानबाई, श्राद्धपक्ष, शिमगा-होळी, नवरात्र वगैरे सर्व सण शेतीशी निगडीत म्हणजे ब्राह्मणविरोधी! हे सर्व सण-उत्सव ते एकत्र येऊन साजरे करतात. कानबाई सारख्या गणमातेच्या सणात हे सर्व ओबीसी एकमेकांच्या घरातील अन्न एकत्र गोळा करून खातात. गणसमाजातील कूलधर्म हीच त्यांची संस्कृती व तोच त्यांचा धर्म. जगातील पहिला समतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणजे कूलधर्म होय! दुधाचे नाते व रक्ताच्या नात्याने घट्ट विणलेला समाज म्हणजे ओबीसी कॅटेगिरी होय! जाणीवपूर्वक ‘गटबाह्य विवाही समाज’ म्हणून जगात मान्यता पावलेला हा ओबीसी समाज!
     या ओबीसी कॅटेगिरीची संस्कृती व इतिहास क्रांतीकारक आहे. बळीराजापासून सुरू झालेला त्याचा क्रांतीकारक प्रवास जातीअंत करूनच पुढे सरकणार आहे. प्राचिन काळातील, बौद्ध काळातील व मध्ययुगीन काळातील त्याचे क्रांतीकारकत्व आम्ही अनेकवेळा सिद्ध केले आहे. बहुजननामाच्या अनेक खेपा आम्ही त्यासाठी खर्ची घातल्यात. आधुनिक काळातील सामाजिक लढ्यातील व राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईतील उदाहरणे ताजी आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील रामास्वामी पेरियार, त्यागमुर्ती चंदापुरी, जननायक कर्पूरी ठाकूर, अमर शहीद बाबू जगदेव प्रसाद कुशवाहा, महामना रामस्वरूप वर्मा, कर्मवीर ऍड. जनार्दन पाटील अशी कितीतरी नावे सांगता येतील. शहीद कुशवाहा हे समाजवादी व कम्युनिस्टांच्या ब्राह्मण्याला लाथ मारून स्वतंत्र पिछडावर्ग संघटन सुरू करतात. ‘‘पिछडा पावे सौ मे नब्बे’’ अशी लोहियांच्याही पुढे जाणारी क्रांतीकारक घोषणा त्यांनी केली. ओबीसीतील या क्रांतीकारकाचा खून पांच लाख लोकांच्या सभेत भरदिवसा एका उच्चपदस्थ पोलीस अधिकार्‍याने गोळ्या घालून केला. एकदा नेहरू मंत्रीमंडळाची व दुसर्‍यांदा इंदिरा गांधींची राष्ट्रपतीपदाबाबतची ऑफर धुडकावून लावणारे ओबीसी नेते त्यागमुर्ती चंदापूरी क्रांतीकारकच म्हटले पाहिजे. ‘ओबीसींच्या चळवळीत इतका मग्न झालो की, लग्न करायचेच विसरून गेलो’, असे म्हणणारे एड. जनार्दन पाटील! ओबीसी सेवा संघाने त्यांना यथार्थपणे ‘‘कर्मवीर’’ पुरस्कार दिला.
परंतू मधल्या काळात या क्रांतीकारक समाजघटकाला न्युनगंडात घुसविण्याची चढाओढ लागली. त्याचे आशास्थान व स्फुर्तीस्थान ठरलेली सत्यशोधक चळवळ क्षत्रिय म्हणविणार्‍या मराठ्यांनी बळजोरीने आपल्या ताब्यात घेतली व 5-25 मराठा घराण्यांसाठी ‘मांडलिक’ राजकीय सत्तेच्या बदल्यात ब्राह्मणांकडे गहाण टाकली. तेथून ओबीसींच्या न्युनगंडाची सुरूवात झाली. त्यांचा क्रांतिकारक इतिहास दडपून टाकण्यात आला. क्रांतीकारक प्रेरणा देणारा भाद्रपदातील बळीराजाचा 15 दिवसीय सण श्राद्धपक्ष होता. त्याच भाद्रपदात गणपतीच्या 10 दिवसाच्या गणेशोत्सवाचे आक्रमण झाले आणी ओबीसी बळीराजाला विसरलेत. ऐन मंडल अंमलबजावणीच्या तोंडावर रामाच्या नावाने झालेले धार्मिक आक्रमण! मंडल अमलबजावणी सुरू झाल्यानंतर ओबीसींना ‘‘फुकटे’’ म्हणणार्‍यांनी तर कहरच केला. 5-50 दलितांचा एकदाच मोर्चा काढून मंडल अमलबजावणीचे श्रेय उपटणार्‍यांची संख्या वाढतच गेली. मार्क्स व फुलेआंबेडकरवादाचे एक साधे सूत्र आहे की, ‘फुकटात कोणालाच काही मिळत नाही.’ आणी शेजार्‍याच्या शेतात पेरून तुमच्या शेतात काहीच उगवणार नाही. प्रत्यकाला आपले शेत स्वतःच पेरावे लागते. शेजारी फारतर मदत करू शकतो. पण केवळ छटाकभर मदतीच्या नावाने एवढा गाजावाजा केला गेला की, खुद्द श्रम व त्याग करणारा मालकच उपरा झाला व फुकट्याही ठरविला गेला.
एस्सी, एस्टी, ओबीसी व ओपन हे घटक एकमेकांना मदत करू शकतात. एकमेकांच्या सुखदुखःत सहभागी होऊ शकतात. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांची सत्यशोधक चळवळ सर्वच शूद्रादिअतिशूद्रांची होती. त्यात तत्कालीन ओबीसी जातींचा मोठा भरणा होता. या क्रांतीकारक ओबीसींच्या पुढाकाराने अस्पृश्यांची चळवळ सुरू झाली. मात्र तीला तडीस नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनाच जन्म घ्यावा लागला. परंतू तत्कालीन ओबीसी नेत्यांनी अस्पृश्य चळवळीचे श्रेय कधीच लाटले नाही. आदिवासी चळवळ उभी करणारे का. गोदाताई परूळेकर व कॉ. कुमार शिरोळकरांसारखे कम्यनिस्ट ब्राह्मण व कॉ. शरद पाटील यांच्यासारखे मध्यम जातीय नेते होते. मात्र आज आदिवासी चळवळ स्वजमातींच्या नेत्यांच्या हातात आहे. या आदिवासी चळवळीचे श्रेय कुणीही नॉन-आदिवासी घेत नाही. मग ओबीसींच्याच बाबतीत असे का होते, याचा विचार केला पाहिजे. ओबीसी चळवळीचे श्रेय ओबीसीं नेत्यांना का दिले जात नाही, त्याचे श्रेय ‘केवळ मदत’ करणारेच कसे काय घेऊन जातात? दुसर्‍याच्या श्रमाचे श्रेय उपटणे, हा एक ब्राह्मणवादच नाही काय? असे फुकटचे श्रेय उपटणे जातीअंताच्या चळवळीला नुकसानदायक ठरले, त्याचे काय? दलित व ओबीसींनी त्याचे आत्मपरिक्षण करून सामंजस्य निर्माण केले पाहिजे की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नंतर शोधू या! वेळ खूप झाला आहे. उर्वरित भाग पुढील बहुजननाम्यात पाहू या, तो पर्यंत सर्वांना कडक जयजोती, जयभीम! सत्य की जय हो!
     ------- प्रा. श्रावण देवरे
           Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
            Email- s.deore2012@gmail.com
Link Lokmanthan

No comments:

Post a Comment