http://shrwandeore.blogspot.in/

Friday, August 9, 2019

81 Bahujannama Bahishkar 28July19


बहुजननामा-81

ईव्हीएम बंदीचा एक मार्ग...... (EVM-6)
बहुजनांनो.... !
-1-
ईव्हीएम (EVM) बद्दल अनेक तक्रारी पुढे आल्यात, प्रिन्ट मिडिया मधून पुराव्यांसह बातम्या छापून आल्यात. निम्मेपेक्षाही जास्त मतदारसंघातील झालेले वोटींग व मशिनमधून बाहेर आलेले वोटींग यांची पडताळणी हजार ते दोन हजारांचा फरक दाखवते. माननीय शरद पवारांसारखे अनेक दिग्गज नेते सातत्याने ईव्हीएम विरोधात बोलत आहेत. बामसेफसारखी देशव्यापी संघटना गेल्या 5-6 वर्षांपासून सातत्याने आंदोलन करीत आहे. परंतू त्याचा परिणाम ना न्यायालयांवर होत आहे ना राहूल गांधींवर!
निवडणूक आयोगाचे तीनही मुख्य आयुक्त पत्रकार परिषदेत उघडपणे सांगत आहेत की, आमचा जीव धोक्यात आहे. सुप्रिम कोर्टाचे मुख्य न्यायधिश व इतरही न्यायधीश प्रचंड दहशतीखाली आहेत. माननीय न्यायधीश गोगईसाहेब यांच्यावर त्यांच्याच कार्यालयातील स्त्री कर्मचारीने लैंगिक छळाची लेखी तक्रार दाखल केली आहे. सरकारच्या विरोधात एक जरी गंभीर कृती वा सरकारविरोधात एकजरी निकाल गोगईसाहेबांनी दिला तर, गोगईसाहेब कोणत्याही क्षणी जेलमध्ये डांबले जाऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएम विरोधातील सर्व अपल्स त्यांनी तात्काळ फेटाळून लावलेले आहेत. याच दहशतीपोटी ते मराठा आरक्षणाला ‘स्टे’ देत नाहीत. मुंबई हायकोर्टातील बहुतेक सर्वच न्यायधिश मराठा दहशतीखाली आहेत.
ईव्हीएम विरोधात जनतेने कितीही आंदोलने केलीत तरी त्याचा परिणाम कोणावरही व कशावरही होणार नाही. कारण हा प्रश्न देशांतर्गत सुटणे अवघड आहे. देशातील सर्वच उच्चपदस्थ अधिकारी व नेते, सर्वच संवैधानिक संस्था व घटनात्मक पदाधिकारी मृत्युच्या भीतीने जीव मुठीत धरून सकाळी घराबाहेर पडत आहेत व संध्याकाळी त्वरीत घरी परतत आहेत. त्यामुळे इव्हीएमसारख्या महाघोटाळा आंतरराष्ट्रीय पातळीवरच सुटू शकतो. ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूका सुरू होण्याचे स्वप्न पाहणार्‍या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, ईव्हीएम बंद करण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग अमेरिका-इंग्लंड-युरोपमधून येतो. आंतरराष्ट्रीय बाजारात एखाद्या देशाची पत तेव्हाच सन्माननीय राहते, जेव्हा त्या देशात मुलभूत मानवी मुल्यांची बूज राखली जाते. त्यात पहिले मुल्य आहे लोकशाहीचे. शंकामुक्त, दहशतमुक्त व मोकळ्या स्वच्छ वातावरणात निवडणूका झाल्या तरच ती लोकशाही मानली जाते. ती तशी नसेल तर परदेशी गुंतवणुकीवर व व्यापारी देवाण-घेवाणीवर परिणाम होतो. एखाद्या देशात मोठ्या प्रमाणात बालकामगारांकडून उत्पादन करून घेतले जात असेल, तरी त्या उत्पादनावर आयात-निर्यात बंदी येत असते.

-2-
अशा परिस्थितीत जो पर्यंत भारतातील विरोधी पक्ष इव्हीएम घोटाळ्याबाबत बाहेरच्या देशांची खात्री करून देत नाहीत, तो पर्यंत ते बॅन होणार नाही. त्यासाठी एकच मार्ग आहे, आणी तो म्हणजे यानंतरच्या होणार्‍या ईव्हीएमवरील सर्व निवडणूकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला पाहिजे. निवडणूक लढवून स्वतःला बेइज्जत करून घेण्यापेक्षा निवडणूकीवर बहिष्कार टाकून स्वतःला ‘लढाऊ’ म्हणून तरी सिद्ध करा. त्यामुळे जनतेत तुमचे राजकीय वजन वाढेल. परंतू तरीही कॉंग्रेस ईव्हीएमविरोधात बोलायला तयार नाही. कारण कॉंग्रेसचे नेते आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत नाहीत. दारूण व लांछनास्पद पराभव दोनवेळा झाल्यावरही कॉंग्रेस नेते जर ईव्हीएम विरोधात काही बोलत नसतील तर, निश्चितच त्या मागे काही खास कारण असले पाहिजे. आणी ते खास कारण आहे पुढच्या विश्लेषणात.....
सर्वांची अशी खात्री आहे की, ईव्हीएम घोटाळा भाजप करतो आहे. भाजप नव्हे तर ‘मोदी-शहाच’ करीत आहेत. पण हे शंभर टक्के खोटे आहे. ईव्हीएम घोटाळा ‘मोदी-शहा’च करीत असतील तर मग, असा प्रश्न उपस्थित होतो कि, याच ईव्हीएमवर झालेल्या निवडकीत (2004 ते 2014) 10 वर्षे अल्पमताचे सरकार कसे आले? मायावतीजी व अखिलेश, नितीश वगैरेंची सरकारे कशी आलीत. बहुजननामाच्या मागील ईव्हीएम लेखांकात या मुद्द्यांची चर्चा मी केलेली आहे. ती मी येथे रिपीट करीत नाही. मात्र एक मुद्दा मी येथे ‘अर्धवट’ स्वरूपात स्पष्ट करू इच्छितो की, ईव्हीएम घोटाळा ना कॉंग्रेसचे लोक करीत आहेत, ना भाजपचे! या षडयंत्राची अभ्यापूर्ण आखणी करणे, प्रत्येक मतदारसंघाचा जात-धर्मनिहाय अभ्यास करणे, त्याची अमलबजावणी करण्यासाठी विशिष्ट प्रकारची माणसे तयार करणे, व त्या विरोधातील संभाव्य तक्रारींचा (छुपा) निपटारा करणे आदि अत्यंत उच्चस्तरावरील ‘प्लॅनिंग व ऍक्शन प्रोग्राम’ हे राजकीय पक्ष वा एखादा नेता करू शकत नाही. राजकारणात व निवडणूकात एकमेकांना संपविण्याची भाषा करणे हा एक चुनावी जुमलाच असतो. त्यामुळे ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ ही नरेंद्र मोदींची भाषा गावंढळपणाचे एक लक्षण आहे. अशी भाषा गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सहजपणे वापरली जाते. अशा प्रकारची भाषा नेहरूजी, इंदिराजी, वा अटलजींच्या तोंडात कधीच येणार नाही, कारण त्यांचे राजकारण शुद्ध व प्रगल्भतेचे होते.
अशा प्रगल्भ राजकारण्यांना आपले राजकारण शुद्ध व प्रगल्भ ठेवण्यासाठी काही चाणक्य-नीतीची ‘काळीकूट्ट पापे’ करावी लागतात. ही काळी कामे करण्यासाठी त्यांना काही माणसे नेमावी लागतात. काही संघटना निर्माण कराव्या लागतात व बदल्यात त्यांना ‘सुपारी’ द्यावी लागते. आता ही राजकीय सुपारी पैशांच्या स्वरूपात नसते तर, सत्तेतला ‘वाटा’ असतो. या सुपारी बहाद्दरांना काही काळासाठी दुय्य-तिय्यम स्तरावरची सत्ताही द्यावी लागते. अशी सत्ता मांडलिकत्वापेक्षाही हीन असते. बामसेफच्या भाषेत सांगायचे म्हणजे ‘पोस्ट दिली, पण पोझीशन नाही’. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांना पटतच नाही. कारण सांगणारा शुद्र आहे. सांगणारा ब्राह्मण असेल तर लगेच ‘मम’ म्हणून गुपचुप मान डोलावतो. आता उदाहरण पाहू....
 भारतात ब्राह्मणी-वैदिकांची सत्ता कायम टिकून राहावी, म्हणून मंडल आयोग अमलबजावणी रोखली पाहिजे, असा ‘ऍक्शन प्रोग्राम’ आखला गेला. मंडल आयोगाला रोखण्यासाठी बाबरी मस्जीदचे-उध्वस्तीकरण घडवून आणणे गरजेचे होते. त्यासाठी भारताच्या भाग्यविधात्यांनी भाजप पक्षाची निवड केली व त्यांच्यावर रामरथ यात्रा वगैरेची जबाबदारी सोपवीली. भाजपात सर्वोच्च पदावर एक अडवाणी व दुसरे अटल बिहारी होते. रामरथ यात्रा व बाबरीभंजनाच्या कामाच्या बदल्यात ‘सुपारी’ म्हणून प्रधानमंत्रीपद मिळणार होते. बाबरीभंजनाचे पाप अडवाणींच्या माथ्यावर फोडायचे व त्या बदल्यात मिळणारे प्रधानमंत्रीपद अटलजींनी भोगायचे, असे ठरले. त्यामुळे रामरथाची व बाबरीभंजनाची जबाबदारी अर्थातच शूद्राकडे आली. परिणामी अटलजींची प्रतिमा ‘स्वच्छ व प्रगल्भ नेता’ म्हणून कायम राहीली. प्रधानमंत्री ब्राह्मणाला करायचे असेल तर तो ‘स्वच्छ व प्रगल्भच’ असला पाहिजे. बाबरी मशिद उध्वस्त करण्याचे खापर यशस्वीपणे अडवाणीजीवर फोडल्यानंतर त्यांचे ‘अवतार’ कार्य संपले व ते अडगळीत पडले, परंतू तत्पुर्वी अडवाणीजीना मेहनताना म्हणून काही महिन्यांसाठी ‘उपप्रधानमंत्रीपद’ द्यावे लागले. अर्थात ‘सुपारी’ म्हणून दिले गेलेले हे उपप्रधानमंत्रीपद त्यांच्या जातीय लायकीपेक्षा कितीतरी ‘जास्त’ होते. 1999 साली भाजप दिल्लीत सत्तेवर येत असतांना प्रधानमंत्री म्हणून अडवाणींचे नाव पुढे येणे शक्य नव्हते, कारण ते बाबरी-विध्वंसक, मुसलमानविरोधी व वंशवादी म्हणून जग-जाहर झालेले होते. त्यांच्याऐवजी कोणताही धार्मिक-जातीयवादी ‘दाग’ नसलेले शुद्ध व प्रगल्भ असलेले अटलबिहारी हे भाजपाचे पहिले प्रधानमंत्री बनलेत. ते या देशाचे प्रचंड लोकप्रिय प्रधानमंत्री ठरलेत, ज्यांच्या नावाने अनेक नवनव्या योजना जाहीर करण्यात येत आहेत. त्यांचे पुतळे उभे केले जात आहेत, त्यांचे फोटो लावले जात आहेत. भारतरत्न वगैरे सर्वोच्च पुरस्कार अटलजींना दिले जात आहेत. याच पद्धतीने सत्तरीच्या दशकातील कम्युनिस्ट-समाजवाद्यांचे मुंबई-ठाणे औद्योगिक पट्ट्यावरील ‘वर्गीय’ वर्चस्व व दलित चळवळीचे जातीय वर्चस्व कॉंग्रेसला धोकेदायक वाटत असतांना शिवसेनेची निर्मिती कशी व का झाली यावर मोठमोठ्या विचारवंतांनी अनेक लेख लिहिलेले आहेत व अनेक संशोधनात्मक ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. शिवसेनेला नियंत्रित ठेवण्यासाठी ‘मनसे’ची निर्मिती करणारे हेच लोक.
 थोडक्यात सांगायचे म्हणजे 2014 नंतर या देशात जे जे काही वाईट व घातक प्रकार झालेले आहेत व होत आहेत, त्यात 1) संविधान गुंडाळून ठेवणे, 2) एस्सी, एस्टी व ओबीसींचे आरक्षण निष्प्रभ करणे, 3) तेरा पॉईंट रोस्टर आणणे, 4) प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून ‘निती’ आयोग आणणे, 5) कामगारांच्या व शेतकर्‍यांच्या विरोधात धोरणे आखणे व त्यांची क्रूरपणे अमलबजावणी करणे, 6) चलनबदली (नोटबंदी?) करून सर्व देशी राष्ट्रीयकृत व परकीय कॉर्पोरेट बँकांमधील उच्चपदस्थ उच्चजातीयांना व क्रोनी भांडवलदारांना सरकारी तिजोरी खुलेआम लुटण्याचे स्वातंत्र्य देणे, 7) जात्यंतक लोकशाही क्रांतीचा कणा असलेल्या ओबीसींच्या कॅटेगिरीत जाट, पटेल, मराठा सारख्या सवर्ण जातींना घुसविणे व एकूणच ओबीसी आरक्षण व कॅटेगिरी नष्ट करणे, 8) आणी इतकी सगळी जनविरोधी कामे करूनही ईव्हीएमच्या मदतीने पुन्हा दुसर्‍यांदा दुपटीने जास्त बहुमत मिळवीत सत्तेवर येणे, वगैरे अशी बरीच प्रतिक्रांतीकारी पेशवाइची धोरणे अमलात आणण्यासाठी व त्या पापाचे खापर स्वतःच्या डोक्यावर फोडून घेण्यासाठी त्यांना कुणीतरी एक महापुरूष ‘प्रधानमंत्रीपदावर’ बसण्यासाठी पाहिजे होता. अट एवढीच होती की तो महापुरूष ‘ओबीसी’ कॅटेगिरीचाच असला पाहिजे, जेणे करून त्याच्या महान कार्यामुळे ओबीसी कायमचा गाडला जाईल. ते अशा महान पुरूषाच्या शोधात निघाले असतांना, त्यांना एक ‘ओबीसी’ महापरूष सापडला व त्याच्यासोबत बोनसमध्ये एक ‘वैश्य’ही मिळाला. वरील सर्व पापांचे खापर ओबीसी-वैश्याच्या जोडगोळीवर फोडले जात असतांना संघ-RSS हा शुद्ध, आदर्श व प्रगल्भ म्हणून कायम राहणार आहे.

-3-  
चाणक्याने बौद्ध नंदराजाच्या विरोधात प्रतिक्रांती करण्यासाठी जाणीवपूर्वक ओबीसी-चंद्रगुप्तच का निवडला? अर्थातच प्रतिक्रांतीच्या पापाचे खापर फोडण्यासाठी! बदल्यात ‘सुपारी’ म्हणून चंद्रगुप्ताला काय मिळाले? अर्थातच ‘राजपद’ मिळाले. परंतू त्या काळातील महान वर्णांतक क्रांतीचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या जैन-बौद्ध तत्वज्ञानांचा प्रभाव जनतेच्या मनात घट्ट रूतून बसलेला होता. चंद्रगुप्ताला हाताशी धरून राज्यक्रांती एका दिवसात करता येणे सहज शक्य झाले. परंतू लोकांच्या मनात व हृदयात बसलेले जैन व बौद्ध तत्वज्ञान लोकांचा दैनंदिन जीवन-मार्ग बनलेले होते. बौद्ध व जैन विद्यापीठांनी समतेची ही महाप्रबोधनाची मोहीम जगभर नेलेली होती. त्यामुळे राज्यक्रांती एका दिवसात होऊ शकते, मात्र लोकांची विचारसरणी व जीवनसरणी बदलण्यासाठी तेवढ्याच तोलामोलाचे महाप्रबोधन (Renaissance) नव्याने करावे लागते. राज्यसत्तेच्या कायद्याने लोकांना बदलवण्याचे कार्य मर्यादितच असते. चाणक्याने अशा ब्राह्मणी बदलाची सुरूवात चंद्रगुप्तापासूनच केली. भर दरबारात चाणक्य हा राजे चंद्रगुप्ताला ‘वृषभ’ (बैल) म्हणून संबोधायचा! चाणक्याला राजपद (क्षत्रियत्व) हे दुय्यम करायचे होते व ब्राह्मणत्व सर्वोच्च प्रभुत्वशाली करायचे होते. आणी असे करणे म्हणजे बौद्ध-जैन तत्वज्ञानाच्या अगदी विरोधात होते. जैन-बौद्ध काळात वर्णव्यवस्थाच जर्जर झालेली असल्यामुळे ‘ब्राह्मण-समूह’ रसातळाला गेलेला होता. चाणक्याला ते धम्मचक्र उलटे फिरवायचे होते व पुन्हा ब्राह्मणवर्चस्व स्थापायचे होते. त्यासाठीच तर त्याने प्रतिक्रांतीकारक ब्राह्मणी राज्यक्रांती केली. या प्रतिक्रांतीचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडण्यासाठी चाणक्याला सक्षम शूद्र नेता पाहिजे होता. तत्कालीन वर्णांतक क्रांतीचा कणा असलेला शूद्र वर्ण ज्याला आज ओबीसी कॅटेगिरि म्हटली जाते, त्यातूनच प्रतिक्रांतीचा नेता निवडला जाणे गरजेचे होते. आजचा ओबीसी व त्याकाळचा शूद्र असलेला चंद्रगुप्त मौर्य याची निवड चाणक्याने केली. प्रतिक्रांती झाल्यानंतर चंद्रगुप्ताला ‘सुपारी’ म्हणून राजेपद दिले. परंतू आपल्याला मिळालेले राजेपद हे ब्राह्मणी प्रतिक्रांती केल्याच्या बदल्यात ‘सुपारी’ म्हणून मिळालेले आहे, हे चंद्रगुप्ताच्या लक्षात आले आणि त्याने लगेच ब्राह्मणी-वैदिक (हिंदू) धर्माला लाथ मारून जैन धर्म स्वीकारला. वैदिक-हिंदू ब्राह्मणांच्या विरोधात बंड करणे सोपे नव्हते. आपला जीव सुरक्षित राहावा म्हणून तत्कालीन ब्राह्मणविरोधी धर्माचा आश्रय घ्यावा लागायचा. चंद्रगुप्ताने ब्राह्मणविरोधी असलेल्या जैन धर्माची दिक्षा घेऊन आपला जीव वाचवला व त्याच्यासोबतच चाणक्याच्या ब्राह्मणी प्रतिक्रांतीचा पाडाव करून बौद्ध-जैनांच्या समतावादी क्रांतीचा ‘पाइक’ बनला.
अपघाताने ब्राह्मणविरोधी बनलेल्या संत ज्ञानेश्वराला आपला जीव वाचविण्यासाठी ‘नाथ’ धर्माची दिक्षा घ्यावी लागली. नाथधर्म हा ज्ञानेश्वरांच्या काळात भारतभर पसरलेल्या ओबीसी-वर्चस्वाचा धर्म होता. शूद्र-ओबीसी जातीत जन्मलेल्या छत्रपती शिवरायांना व राजे संभाजींना ब्राह्मणांच्या छळापासून संरक्षण मिळविण्यासाठी व आपला जीव वाचविण्यासाठी अब्राह्मणी ‘शाक्त’ धर्माची दिक्षा घ्यावी लागली. आधुनिक काळात 1917-18 साली टिळकांनी मराठ्यांना राजकारणात (असेंब्लीत) येण्यासाठी मज्जाव केला होता. तत्कालीन ब्राह्मणांचा दरारा पाहता, टिळकांच्या दमबाजीने मराठ्यांची बोबडी वळलेली होती. असेंब्लीत निवडून येण्यासाठी मराठ्यांनी इंग्रजांकडे राखीव मतदारसंघ मागीतलेत. परंतू मराठ्यांना शेवटी ओबीसींच्या सत्यशोधक चळवळीला शरण यावे लागले. त्यानंतर ते असेंब्लीत निवडून यायला लागलेत. त्याकाळी ब्राह्मणविरोधात ओबीसींची सत्यशोधक चळचळ जोरात होती, म्हणूनच ब्राह्मणांना शह देण्यासाठी मराठ्यांना तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची दिक्षा घ्यावी लागली.
-4-
आज जर कम्युनिस्ट, समाजवादी, फुले-आंबेडकरवादी राजकारण जर ‘किमान जीवंत’ राहीले असते, तर निश्चितच मोदीसाहेब ‘सुपारी’ म्हणून मिळालेले पद त्यागून आपली 2024 नंतरची संभाव्य जेल टाळण्यासाठी संघ-RSS विरोधात बंड करतील व भाजपाचा एक मोठ्ठा तुकडा सोबत घेऊन ‘जात्यंतक’ राजकारणात सामील होतील. जे व्ही.पी. सिंगांनी केले, ते मोदी निश्चितच करतील. पण त्यासाठी आजचे आपले फाटक्या झोळीचे डावे-दलित-ओबीसी ‘तयार’ नाहीत, कारण त्यांचे ‘जात्यंतक-वर्गांतक राजकारण’ कोठेही शिल्लक नाही व जीवंतही नाही. सगळेच्या सगळे ‘‘मरून’’ पडलेले आहेत.
ईव्हीएम घोटाळ्यासकट सर्व पापांचे खापर फोडण्यासाठी RSS-संघाकडे एक ‘सक्षम शूद्र डोके’ आहे, तो पर्यंत ईव्हीएम बंद होणे नाही, त्यासाठी ईव्हीएमबंदीचा दुसरा मार्ग मी पुढील बहुजननामाच्या ईव्हीएम-7 लेखांकात सांगेन! तो पर्यंत https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवरील EVM-2019’ हे छोटे पुस्तक अवश्य वाचा. जय जोती, जयभीम... सत्य की जय हो!!!!
(लेखन दिनांक- 27 जुलै 2019 व प्रकाशन 28 जुलै 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग

 Email- 

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

No comments:

Post a Comment