http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, May 10, 2020

109 BahujanNama Pravah 10May20, Daily Lokmanthan


बहुजननामा-109
एकदिक्प्रवाही कुंठीतता व बहुदिक्प्रवाही मुक्तता
-1-
कॉम्रेड सतीश जोशी यांनी जातीअंतासाठी काय कार्यक्रम असू शकतो, असा सवाल करणारी व त्यावर सूचना मागविणारी दोन ओळींची एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्याला आता किमान दहा दिवस झाले असतील. त्यावर चर्चा करणार्‍या 4 कॉमेंट्स आल्यात आणी चर्चा थांबली. जात्यंतक महापुरूषांवर कोणतीही एक पोस्ट टाका, त्यावर 5 मिनिटात 15 कॉमेंट्स येतील. गेल्या आठवड्यात मी महामानव गौतम बुद्धांवर एक पोस्ट टाकली. कॉमेंट्सची संख्या नव्वदीच्या पार गेली! त्यात भावनिक उत्तेजनातून आलेल्या धार्मिक पोस्ट सर्वाधिक होत्या. 3-4 पोस्ट मूळ मुद्द्यांवर चर्चा करणार्‍या होत्या! तोच मुद्दा घेऊन त्याच पद्धतीची एक पोस्ट मी मार्क्सवादावर टाकली. 4 कॉमेंट्सच्या पलिकडे चर्चा अजूनही गेलेली नाही.
हे सर्व सांगण्याचा उद्देश हा आहे की, आपल्या बहुजन समाजाचा वैचारिक बुद्ध्यांक नेमका किती व कसा आहे, हे समजून यावे. अर्थात फेसबुकवरील चर्चा एकमेव बुद्ध्यांक ठरविणारी कसोटी नाही. सर्व भारतीय महापुरूषांवर अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख प्रकाशित होत असतात. त्यांची संख्या भारतीय विचार-क्षेत्रासाठी गौरवास्पद आहे. परंतू त्यांचे वाचन, त्यांची समिक्षा व त्यावरील चर्चा इतकी सिमित असते की, ती नसल्यातच जमा होते. याबाबत फेसबुकचे एक वैशिष्य नोंदवावे लागेल. फेसबुकवर व्यापक वैचारिक चर्चा होऊन प्रबोधनाचा ‘रेनैसन्स मुव्हमेंटचा दर्जा’ आपण गाठू शकतो! मात्र तो दर्जा आपण गठू शकत नाही, कारण आपण अजूनही पुरोगामित्वाच्या नावाखाली व्यक्तीपूजक आहोत, कट्टर धार्मिक आहोत व कट्टर जात-हितसंबंधी आहोत. म्हणजे ज्या सरंजामी मूल्यांचा विनाश करण्यासाठी युरोपमध्ये ‘यशस्वी’ रेनैसन्स मुव्हमेंट (Renaissance Movement) झाली, तीच सरंजामी मुल्ये आम्ही आमच्या ह्रदयाशी लावून धरली असल्याने वैचारिक चर्चा होऊच शकत नाही. कारण वैचारिक चर्चा घडवून आणणारा आमचा मेंदू आजही मध्ययुगीन अंधारातच वावरत आहे. आमच्या जातीचा महापुरूष, आमच्या धर्माचा महापुरूष हाच एकमेव सत्याचा प्रकाश देतो व तोच एकटा जगातले सर्व प्रश्न सोडवू शकतो, हा एकांगी एकदिक्प्रवाहवाद बहुजनसमाजाचा बुद्यांक वाढू देत नाही. जगातील ज्या ज्या राष्ट्रांनी वा ज्या ज्या कम्युनिटिजनी प्रगती केली आहे, त्याला कारण त्यांचा वाढता बुद्ध्यांक आहे. बुद्धयांक कुंठीत झाला की, नवे विचार, नवे नियोजन, नव्या योजना यांचा मार्ग अवरूद्ध होतो व जुनेच विचार, जुने नियोजन, जुन्या योजना व जुनी व्यवस्था कालबाह्य होऊनही आपल्या बोकांडी बसून आपल्याला ‘मागे’ नेते.
-2-
उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांना सोप्या-सोप्या गोष्टीही समजत नाहीत, कारण लो बुद्ध्यांक! म्हणून उदाहरण देतो.... युरोपमध्ये रेनेसन्स मुव्हमेंट झाली. या मुव्हमेंटचा मुख्य उद्देश जनतेच्या मनात बिंबलेली सरंजामी मूल्ये नष्ट करून त्या जागी नवी भांडवली मूल्ये रूजविणे. युरोपमधील तत्कालीन भांडवलदार वर्गाला आपल्या स्वतःच्या वर्गीय हितसंबंधांना व्यापक व मजबूत करण्यासाठी त्यांना या रेनेसन्स मुव्हमेंटचे नेतृत्व करावे लागले. युरोपातील भांडवलदार वर्गाने राजकीय क्रांती करून राजकीय सत्ता हस्तगत केली, मात्र जनतेने आपल्याला केवळ राज्यकर्ता म्हणून नव्हे तर आपली नवी भांडवली मुल्येही स्वीकारली पाहिजेत, तरच भांडवली लोकशाही क्रांती होईल व आपण कायमचे सत्ताधारी होऊ! भांडवलदांचे प्रतिनिधी वा त्यांचे राजकीय पक्ष केवळ ‘राज्यकर्ता’ असते, तर सरंजामी राजे त्यांची सत्ता केव्हाही उलथून टाकू शकतात व नवी भांडवली व्यवस्था फेकून देऊ शकतात. राज्यकर्त्याला ‘सत्ताधारी’ व्हायचे असेल तर, त्याला सांस्कृतिक क्रांती किंवा प्रतिक्रांती करावीच लागते, याचे भान युरोपियन भांडवलदारांना होते. म्हणून त्यांनी तत्कालीन वैचारिक-सांस्कृतिक रेनेसन्स मुव्हमेंटला राज्य-सत्तेचा पूर्ण सपोर्ट दिला व तेथे ती क्रांती यशस्वी झाली. भांडवली लोकशाही क्रांती यशस्वी झाल्यामुळे युरोपमधील अनेक राष्ट्रे प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेत व भारतासारखे अनेक मागासलेले देश तिसर्‍या जगात  राहून ‘मांडलिक’ बनलेत. रेनेसन्स मुव्हमेंटची दोन तत्वे आहेत. एक म्हणजे मानवी मेंदूला एकदिक्प्रवाहाच्या कैदेतून मुक्त करणे व दुसरे, त्याला अनेकदिक्प्रवाहाच्या मार्गी लावणे.
बदलत्या काळातील व्यवहार, त्यातून निर्माण होणार्‍या समस्या व त्यांची सोडवणून करून पुढे जाण्यासाठी माणासाच्या मेंदूला बहुदिक्प्रवाही व्हावेच लागते. युरापातील सरंजामशाहीच्या काळातील सर्व समस्यांची उत्तरे चर्चकडे असायची. चर्च जे सोल्युशन देईल, ते मनोभावे स्वीकारून लोक जीवन जगत होते. प्रसुतिवेदनाशमक (गुंगीचे) औषध देऊन बाळाला जन्म देणे निषिद्ध आहे, कारण ते प्रभूच्या ईच्छेविरूद्ध आहे. या एकदिक्प्रवाही विचारामुळे अनेक स्त्रिया प्रसुतिवेदना असह्य झाल्यामुळे मेल्यात! परंतू या पेक्षा वेगळे सोल्युशन असू शकते, असा विचारही तत्कालीन युरोपियन माणूस करू शकत नव्हता. मात्र रेनेसन्स मुव्हमेंटमुळे त्याचा मेंदू चर्चच्या गुलामीतून मूक्त झाला व त्याने प्रसुतिवेदनाशमक औषधाचा स्वीकार करून आपल्या स्त्रियांचे बाळंतपण सुखकर केले. वेदनाशमक औषधी कंपन्यांचा माल (प्रॉडक्ट) बाजारात मोठ्या प्रमाणात खपायला लागला, त्यांचा नफा वाढला व व्यापारही वाढला. या वाढलेल्या नफ्यातून त्यांनी काही हिस्सा रेनेसन्स मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांना दान दिला. अशा अनेक भांडवलदारी कंपन्यांनी आर्थिक मदत देऊन रेनेसन्स मुव्हमेंट वाढविली व मजबूत केली. भांडवली सत्ताधार्‍यांनी त्या मुव्हमेंटला राजकीय आश्रय दिला व भांडवली कारखानदारांनी आर्थिक आश्रय दिला. त्यामुळे युरोपममधील जनतेचा मेंदू एकदिक्प्रवाहातून मुक्त होऊन बहुदिक्प्रवाही विचार करून लागला. विचारवंत जनतेच्या समस्यांचे व घडलेल्या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी बायबलच्या बाहेर जाऊन अभ्यास करू लागलेत. पृथ्वी सपाट आहे की गोल, याचे उत्तर बायबलच्या बाहेर शोधू लागलेत. आकाशातील वीज देवाच्या ओरडण्यातून नाही, तर ढगांच्या घर्षणातून निर्माण होते व तीला विशिष्ट तारेतून प्रवाहीत केले तर ती आपली गुलाम होते, प्रकाश देते व उर्जाही देते. या सर्व बहुदिक्प्रवाही विचारातून युरोपात शास्त्रज्ञ जन्मण्याची लाट पसरली, नवनवीन हजारो शोध रोज लागू लागलेत, त्यातून औद्योगिक क्रांती झाली, भांडवली लोकशाही क्रांती झाली. परिणामी ते सर्व देश विकसित झालेत.
जे युरोपमध्ये झाले तेच रशिया, चीन व जपानमध्ये झाले. चीनमधील बुद्धिस्ट नेते महाराष्ट्रातील बुद्धिस्टांप्रमाणे ‘कट्टर’ राहिले असते, तर काय चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली असती व तो देश आज महासत्ता झाला असता? जपानमधील बुद्धिस्ट नेते महाराष्ट्रातील बुद्धिस्टांप्रमाणे ‘कट्टर धार्मिक’ असते तर, काय जपान भांडवली राष्ट्रवादाने प्रेरित होऊन अणूबॉम्ब-संकटातून उभा राहिला असता? आज जपानने जी प्रगती साध्य केली आहे, ती बुद्धिस्ट म्हणून कि, भांडवली राष्ट्रवादी म्हणून? तीच बाब रशियाची! दुसर्‍या महायुद्धानंतरच बहुतेक सर्व राष्ट्रांच्या विकासाचा आलेख सुरू होतो. ज्या देशातील बहुसंख्य जनतेने वा त्यांच्या सत्ताधारी नेत्यांनी बहुदिक्प्रवाही विचार वा तत्वज्ञान स्वीकारले तेच बदलत्या काळाची आव्हाने पेलू शकलेत! चीनमध्ये ‘‘कार्ल मार्क्स की बुद्ध’’ असा वादविवाद झडलाही असेल, मात्र या वादावादीला त्यांनी कट्टरता चिकटू दिली नाही. चीनी जनतेची ‘बुद्धपूजा’ व ‘धम्मनिष्ठा’ त्यांच्या मार्क्सवादी क्रांतीच्या रस्त्यात कधीच आडवी आली नाही. चीनमध्ये साम्यवादी क्रांतीनंतर हुकूमशाहीची कट्टरता अपरिहार्यपणे वाढत गेली. परंतू माओने नंतर ‘शंभर फुले फुलू द्या’ ही टॅगलाइन देऊन बहुदिक्प्रवाही सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. संपूर्ण चीन घुसळून काढणार्‍या या क्रांतीने अवरूद्ध झालेल्या साम्यवादी क्रांतीची वाट मोकळी केली.
-3-
भारतात मात्र सर्वत्र कट्टर-ग्रस्तता दिसते. वैदिक, हिंदू, बौद्ध, जैन, लिंगायत, नाथ, शाक्त या सर्व अ-ब्राह्मणी व ब्राह्मणी धर्मांमध्ये कट्टरतेची शर्यत चालू आहे. मार्क्सवाद, समाजवाद, फुले-वाद, आंबेडकरवाद यांच्यातील वादावादी ‘कोण किती कट्टर आहे’ यावरच चालू असते. ही कट्टरतेची शर्यत तोच जिंकेल जो सर्वात जास्त कट्टर आहे. कट्टरतेच्या बाबतीत वैदिक ब्राह्मणांचा हात कोणीच धरू शकत नाहीत. त्यामुळे ते ही शर्यत सहजपणे जिंकलेत. परिणामी आज आपल्या देशाची सत्ता वैदिक ब्राह्मणांच्या हातात गेलेली आहे व ते आपल्या कट्टर ब्राह्मणी धर्माच्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार चालवित आहेत. वैदिक धर्माचे ब्राह्मण लवचिक आहेत, पण तरीही ते तुटत नाहीत, ते व्यवहारात तडजोड करतील पण तत्वज्ञानात तडजोड करणार नाहीत, ते सतत डावपेंच बदलत राहतील पण धोरणात स्थीर राहतील, ते झुकतील पण मोडणार नाहीत, ते खोटं बोलतील पण खोट्याला खरं करूनच दाखवतील! अशा या बहुदिक्प्रवाही ब्राह्मणवादाला तुम्ही कसे रोखू शकणार आहात, तुम्ही तर आपल्या डबक्यालाच जग समजतात!
कॉ. सतिश जोशी यांनी आवाहन केल्याप्रमाणे जातीअंताचा कार्यक्रम व्यापक व बहुदिक्प्रहाही चर्चा केल्याशिवाय कसा तयार होणार? केवळ जातीअंत नाही तर ‘जात-वर्ग-स्त्रीदास्य अंताचा कार्यक्रम हवा आहे. कॉ. जोशींच्या या पोस्टवर चारच लोक फिरकलेत, कारण जात-वर्गअंताच्या बहुदिक्प्रवाही चर्चेत आपल्या जातीचा महापुरूष, आपल्या धर्माचा महापुरूष, आपला ईझम लुळा पडेल की काय, अशी रास्त भीती सर्वांच्या मनात घर करून बसली असल्याने कृतीकार्यक्रमावर बहुदिक्प्रवाही चर्चा करायला सर्वच घाबरतात.
     चला! जयजोती जयभीमचा कट्टर नमाज अदा करतो व ‘‘सत्य की जय हो’’ चा जयघोष करून पुढच्या बहुजननामात भेटण्याची अपेक्षा धरतो.
       (लेखनः 9 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 10मे20)
    ------- प्रा. श्रावण देवरे
   Mobile – 88 301 270                     

 Blog ब्लॉग:- https://shrwandeore.blogspot.in/ 


No comments:

Post a Comment